
कसोटीचा काळ
कसोटीचा काळ
27 April Edit
दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन संपायला अजून एक आठवडा शिल्लक असताना लोकांची चलबिचल सुरु झाली आहे. अनेकांना असे ठाम वाटते की, लॉकडाऊन आता उठविले जाईल. परंतु सध्या जी आकडेवारी प्रसिध्द होत आहे ती पाहता लॉकडाऊन उठणे अशक्य दिसते. तसेच घाईघाई करुन उठविणेही धोकादायक ठरणारे आहे. त्यामुळे सध्याचा काळ हा अतिशय संवेदनाक्षम असला तरी मोठा कसोटीचा आहे. संदेनाक्षम यासाठी की, लोक आता घरी बसून कंटाळले आहेत, जे मजूर परगावातले आहेत व ज्यांना घरी जाता आलेले नाही ते घरी जाण्यासाठी उत्सुक आहेत, त्यांच्यातील चलबिचल वाढली आहे. त्यांची स्थिती तर पारच वाईट आहे, ना रोजगार ना पुरेसे अन्नधान्या खायला अशा स्थीतीत ते जिवन जगत आहेत. परंतु अशा स्थितीतही सावधानगिरी बाळगली जाणे गरजेची आहे. शनिवारची आकडेवारी पाहता एकाच दिवशी सर्वाधिक रुग्ण म्हणजे 811 सापडले आहेत. तसेच मुंबई, पुणे, अहमदाबाद यासारख्या मोठी लोकसंख्या असलेल्या शहरातील धोका वाढला आहे. मुंबईत धारावीसारख्या झोपडपट्टीत जिकडे लोकसंख्या घनदाट आहे तिकडे कोरोनाग्रस्तांची संख्या वाढणे हे सर्वात धोकादायक ठरणारे आहे. देशाची स्थिती पाहता कोरोनाग्रस्तांची संख्या 25 हजारांवर पोहोचली आहे. त्यात पाच हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 800 लोकांचा मृत्यू झाला आहे. आपल्या लोकसंख्येशी तुलना करता ही आकडा नियंत्रणात आहे. म्हणजे आपल्याला लॉकडाऊन केल्याचे अनेक फायदे मिळत आहेत, परंतु सध्याच्या काळात लोकांचा धीर सुटल्यामुळे हे लॉकडाऊन घाईघाईने उठविणेही शहाणपणाचे ठरणारे नाही. कारण लॉकडाऊनमुळे प्रसार थांबतो तसेच प्रशासनाला आरोग्यविषयी पर्यायी व्यवस्था करण्यास वेळ मिळतो. खरे तर यापेक्षा स्थिती आपण चांगली राखू शकलो असतो, मात्र आपल्याकडे कोरोना संबंधी गैरसमज व खोटी अपेक्षा तसेच लॉकडाऊनला केलेला विलंब यामुळे सध्याची स्थिती आली आहे. आपल्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अनेक जण छातीठोकपणे सांगत होते की, आपल्याकडील जीवनपध्दती, आहारशैली, वाढता उन्हाळा यामुळे कोरोनाचा फैलाव होणार नाही. मात्र यासंबंधीचे त्यांचे सर्व दावे फोल ठरले आहेत. कोरोना ज्या गतीने थंड असलेल्या स्वीर्झरलँडसारख्या देशात फैलावला त्याच गतीने आपल्याकडे उन्हाळ्याचे दिवस असूनही पसरला आहे. आपण 24 मार्चपासून लॉकडाऊन सुरु केले. विदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची तपासणी मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात सुरु केली. हे जर सर्व अगोदर एक महिना सुरु केले असते तर त्याचा कोरोना नियंत्रणासाठी मोठा उपयोग झाला असता. सर्वात महत्वाचे म्हणजे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च या भारतीय संशोधन संस्थेने कोरोनाचा जागतिक पातळीवर धोका वाढू लागल्यावर भारतात कोणते उपाय योजले पाहिजेत त्याचा एक विस्तृत अहवाल सादर केला होता. यात त्यांनी जे स्थलांतरीत मजूर आहेत त्यांना सर्वात प्रथम त्यांच्या गावी सोडणे तसेच अन्नपाण्याची व्यवस्था सुरळीत ठेवणे या बाबी अगोदर पाहून लॉकडाऊनच सुरु करावे असे म्हटले होते. मात्र मोदी साहेबांनी लॉकडाऊन करताना या कोणत्याही बाबींचा विचार केलेला नाही. आपल्याकडे देशात असलेल्या 417 जिल्ह्यात कोणती खबरदारी घेणे गरजेचे आहे तसेच 15 कोटी मजुरांना त्यांच्या घरी सोडल्यावर त्यांची अन्नपाण्याची कशी व्यवस्था करावी याचा तयार केलेल्या कौन्सिलच्या आलेखाचा विचारच झाला नाही. त्याचबरोबर पंतप्रधानांची सर्व विरोधी पक्ष नेत्यांना तसेच सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी विचारविनियम करुन निर्णय घेणे गरजेचे होते. तसे काहीही न करता अचानकपणे 22 मार्चचा एक दिवसाचा बंद व त्यानंतर 24 मार्चपासून लॉकडाऊन करण्याची घोषणा करण्यात आली. या त्यांच्या कृतीत एकाधीकारशाहीचे दर्शन झाले. राहूल गांधींनी 12 फेब्रुवारी रोजी मोदींना पत्र लिहून या रोगाच्या धोक्याचा इशारा दिला होता. मात्र कोणत्याच विरोधी पक्षाचे एकायचे नाही, उलट त्यांची खिल्ली उडवायची हे धोरण असल्याने राहूल गांधीचे हे पत्र विचारात घेतले गेले नाही. उलट मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या तीन दिवसीय दौरा आटपून घेण्यात आला. त्यानंतर मध्यप्रदेशातील कॉँग्रेसचे सरकार पाडून तेथे भाजपाचे सरकार स्थापन केल्यावर लॉकडाऊनचे काम सुरु झाले. खरे तर मेडिकल कौन्सिलच्या सल्ल्यानुसार जर मोदींनी काम केले असते तर सध्याची भीषण परिस्थिती उदभवली नसती. कदाचित लॉकडाऊन लवकर सुरु झाले असते तर तीन-चार आठवड्यात संपलेही असते व एवढ्यात जीवनमान पूर्वपदावर येण्याची प्रक्रिया सुरुही झाली असती. परंतु आपल्या हातातून वेळ निघून जातेय असे दिसल्यावर लगेचच उपाययोजनांची घाई करण्यात आली आणि सध्याच्या कठीण काळातही टाळ्या, थाळ्या वाजविण्याचे व दिवे लावण्याचे इव्हेन्टस करण्यात आले. सध्याच्या स्थितीत केरळने उत्कृष्ट काम केले आहे. त्यांनी कोणतेही विशेष केंद्र सरकारकडून सहकार्य नसतानाही कोरोनाला पूर्णपणे ताब्यात ठेवले आहे. देशात सर्वात पहिला रुग्ण केरळातच सापडला होता. मात्र आता तेथे राज्य सरकारच्या प्रशासकीय कौशल्यामुळे कोरोनाला त्यांनी आटोक्यात ठेवले आहे. असे असतानाही केंद्र सरकारने केरळच्या कार्यावर चुप्पी केली आहे, कारण तेथे विरोधी पक्षाचे सरकार आहे. सध्याच्या कठीण काळातही केंद्र सरकार राजकारण करुन विरोधी पक्षांचे सरकार असलेल्या राज्यांची अर्थकोंडी करु पाहात आहे. सध्याचे सरकार जनतेच्या हिताचे फार काही करणार नाही, जनतेने तशी अपेक्षाही ठेऊ नये. सरकारने केलेल्या चुका सध्या जनतेल्या काही काळ भोगाव्या लागणार आहेत. त्यातून लॉकडाऊन लांबणे हे ओघाने आलेच.
0 Response to "कसोटीचा काळ"
टिप्पणी पोस्ट करा