-->
करोनाचा धसका जगाला

करोनाचा धसका जगाला

रविवार दि. 23 फेब्रुवारी 2020 च्या अंकासाठी चिंतन - 
-----------------------------------------------
करोनाचा धसका जगाला
------------------------------------
चीनमध्ये करोना व्हायरस सुरु झाल्याची बातमी 31 डिसेंबरला आली आणि त्याचे गांभीर्य फारसे कोणाला वाटले नाही. यापूर्वी आलेल्या सार्सप्रमाणेच हा संसंर्गजन्य रोग असावा व काही काळात आटोक्यात येईल असा अंदाज होता. परंतु आता दोन महिन्यानंतर हा रोग काही फारसा आटोक्यात येत नाही असेच दिसत आहे. आतापर्यंत 29 देशांत तो पसरला आहे. केवळ एकट्या चीनमध्येच सुमारे दोन हजार जणांचा मृत्यू झाला. 70 हजारांहून जास्त लोकांना संसर्ग झाला आहे. चीनसह अनेक देश या रोगाशी दोन हात करण्याचा प्रयत्न करत आहेत. चीनशी असलेला जगाचा संपर्क जवळपास तुटल्यात जमा आहे. चीनमध्ये कोरोनामुळे 78 हजार उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. 1.30 कोटी रुपयांची तिकिटे परत करण्यात आली आहेत. मेलबॉर्नहून निघालेल्या तेथील चीनी लोकांनी सुरुवातीला जाण्यासाठी केलेली बुकिंग रद्द केली व त्याजागी सर्व मदतीसाठी औषधे पाठविण्यात आली. तेथून निघालेले एक विमान संपूर्ण रिकामे होते व प्रत्येक सीटवर मदतकार्याचे बॉक्स होते. एकूणच चीनमध्ये जाणे व येणे देखील जगातील सर्वांचेच बंद झाल्यात जमा आहे. आता संसर्ग होण्याचे प्रमाण घटले आहे तसेच मृत्यूंचे प्रमाणही मंदावले आहे. त्यामुळे आता येत्या काही दिवसात सर्व आटोक्यात येईल असे दिसत आहे. चीन जरी दोन हजार जण मृत्यू पावल्याचे सांगत असला तरीही ही संख्या जास्त असावी असा जगाचा अंदाज आहे. काहींच्या मते हा आकडा वीस हजारांच्याहून जास्त आहे. चीनच्या पोलादी भींतीआडून वास्तव समजणे अशक्य असले तरीही चीन जो आकडे देतोय त्यापेक्षा हा आकडा निश्‍चितच जास्त असावा यात काही शंका नाही. आजवर सुमारे 12 हजार जण या संसर्गातून बरे होऊन घरी परतल्याचे चीनी अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे. आता तुलनेने संसर्गाची प्रकरणे घटली आहेत. मात्र गेल्या 50 दिवसांत काय घडले? त्याला रोखण्यासाठी कसे प्रयत्न झाले? वुहानच्या सी-फूड बाजारातून संसर्ग सुरू झाला. जपान, कोरिया, थायलंडपर्यंत गेला. 21 जानेवारीला अमेरिकने सर्वात प्रथम या रोगाला पुष्टी दिली. आता तर चीनच्या वुहान शहराला सीलबंद केले आहे. 30 जानेवारीला जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आरोग्यविषयक आणीबाणी जाहीर केली. जगभरातील देशांनी चीनसोबतच हवाई संपर्क थांबवला. 2 फेब्रुवारीला चीनबाहेर फिलीपाइन्समध्ये पहिला मृत्यू झाला आणि जगाला पुन्हा एक हादरा बसला. आजच्या घडीला चीनमध्ये 76 कोटींहून जास्त लोक घरात कैद झाले आहेत. अनेक जण घरातूनच काम करीत आहेत. परंतु प्रत्येकाला काही घरातून संगणकावर काम करणे शक्य नाही. त्यामुळे अनेक कंपन्यांचे उत्पादनाचे कामकाज ठप्प झाले आहे. यामुळे चीनच्या अनेक औषध कंपन्या बंद पडल्या आहेत. त्यामुळे, हे निमित्त काढून चीनवरच अवलंबून असलेल्या भारतीय औषध कंपन्यांनी किमती वाढवल्या. चीनकडून होणारा पुरवठा थांबल्यामुळे भारतात पॅरासिटामॉलच्या किमतींमध्ये 40 टक्के वाढ झाली आहे. बॅक्टेरिया इंफेक्शनवर उपचारासाठी वापरल्या जाणार्‍या अ‍ॅण्टीबायोटिक अ‍ॅझिथ्रोमायसिनची किंमत तर 70 टक्क्कयांनी महागली आहे. हीच गत राहिल्यास येणार्‍या काळात औषधींच्या किमती आणखी वाढण्याची भीती आहे. एकाच देशातून आयात करण्याचे किती धोके आहेत हेच यावरुन आपल्याला स्पष्ट जाणवते. आपले गेल्या तीन वर्षांपासून चीनवर अनेक कच्च्या उत्पानाच्याबाबतीत विसंबून राहण्याचे प्रमाण वाढले आहे. अ‍ॅक्टिव फार्मासिटिकल्स इंग्रीडियंट्स (एपीआय)च्या आयतीसाठी भारत चीनवर खूप विसंबून आहे. कुठल्याही औषधी तयार करण्यासाठी एपीआय हा सर्वात महत्वाचा घटक असतो. डिरेटोरेट जनरल ऑफ कमर्शियल इंटेलीजेंस अँड स्टॅटिस्टिक्सनुसार, 2016-17 मध्ये भारताने एपीआय घटक आयात करण्यासाठी 19 हजार 653.25 कोटी रुपये खर्च केली. यातील 66.69 टक्के माल चीनमधून आयात झाला. 2017-18 मध्ये भारताने 21 हजार 481 कोटी रुपयांची आयात केली. त्यामध्ये चिनी मालाचे प्रमाण वाढून 68.36टक्क्यांवर पोहोचले. 2018-19 या काळात एपीआय आणि बल्क ड्रग्स आयात करण्यासाठी भारतीय औषध कंपन्या आणि कारखान्यांनी 25 हजार 552 कोटी रुपये खर्च केले. भांडवल आणि आर्थिक कारणांमुळे भारत चीनकडून एपीआय आणि मोठ्या प्रमाणात बल्क औषधी आयात करत आहे. उत्पादनाला येणार्‍या खर्चाच्या तुलनेत चीनकडून एपीआय आणि बल्क औषधी मागवणे भारतीय औषध कंपन्यांसाठी फायद्याचे ठरते. चीनमध्ये एपीआय उत्पादनासाठी येणारा खर्च भारताच्या तुलनेत 30 टक्के कमी असतो. भारतात एपीआय प्रॉडक्शन युनिट असतानाही केवळ 30 टक्के उत्पादन घेतले जात आहे. तर उर्वरीत 70 टक्के पुरवठा चीनकडून केला जातो. भारतामध्ये एपीआय उत्पादनावर नफा खूप कमी असल्याने भारतीय औषध कंपन्या चीनकडूनच एपीआय आयात करत असतात आणि भारतात औषधांचे उत्पादन करून दुसर्‍या देशांना पाठवतात. चीनच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाल्याने केवळ आपल्यालाच नाही तर जगाला फटका बसला आहे. कारण चीनची अर्थव्यवस्ता ही मोठ्या प्रमाणावर उत्पादन करुन जगात निर्यात करणारी आहे. त्यामुळे अगदी लहान मुलांची खेळणी असोत किंवा आयफोन चे उत्पादन असो जगात याचा तुटवडा आता भासू लागला आहे. येत्या महिन्याभरात जर चीनमधून निर्यात होण्यास प्रारंभ झाला नाही तर जगातील अनेक देशात अभूतपूर्व टंचाई होऊ शकते. मुंबईत सध्या सुरु असलेल्या कोस्टल रोडचेही काम रखडणार आहे, कारण त्याच्या बोगद्यांसाठी चीनी मशिनरी आयात होणार होती. आता ही मशिनरी येऊ शकत नाही. त्यामुळे हे काम देखील रखडणार आहे. अशा प्रकारे अनेक कामांना खीळ बसणार आहे. करोनाला आळा घालण्याचे काम युद्पातळीवर हाती घेण्यातआ ले आहे. चीनने केवळ दहा दिवसात एक हजार बेडचे व त्यानंतर पुढील दहा दिवसात बाराशे बेडचे हॉस्पिटल उभे करुन चीनी लोक किती राक्षसी प्रकारे काम करु शकतात हे त्यांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे तशाच प्रकारे या संसर्गाला आळा घालण्याचे काम सुरु आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांनी या कामी कोणत्याही देशाची सक्रिय मदत घेतलेली नाही. त्यामुळे चीन यावर मात करेल यात काही शंका नाही. परंतु ते कधी साध्य करतील हाच यक्ष प्रश्‍न आहे.
-------------------------------------------------------

0 Response to "करोनाचा धसका जगाला"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel