-->
गुजरात निकालाचा अन्वयार्थ...

गुजरात निकालाचा अन्वयार्थ...

रविवार दि. 24 डिसेंबर 2017 च्या मोहोरसाठी लेख -- 
------------------------------------------------
गुजरात निकालाचा अन्वयार्थ...
------------------------------------
एन्ट्रो- गुजरातची निवडणूक ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती, त्यामुळे त्यांनी मतदारांकडे मताची झोळी पसरविताना गुजराती अस्मितेचे कार्ड वापरले. अर्थातच त्याचा फायदा होणार हे ओघाने आलेच. मात्र त्याचबरोबर 22 वर्षाच्या आपल्या राजवटीबद्दल स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त करीत भाजपाला 99वरच रोखले. तर कॉग्रेसला 80 पर्यंत चांगली बढत दिली. त्याहून सर्वात महत्वाचे म्हणजे कॉग्रेसची सत्ता जरासाठी हुकली आहे. कारण कॉग्रसेच्या सुमारे 20 जणांचा पराभव हा दोन हजार मतांपेक्षा कमी मतांनी झाला आहे.
-------------------------------------------
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या गुजरातच्या निकालाने भारतीय जनता पक्षाला सत्तेत पुन्हा आणले असले तरी मतदारांना गृहीत धरु नये असा संदेश मात्र जरुरु दिला आहे. त्याचबरोबर कॉग्रेसच्या नवीन नेतृत्वाचे स्वागत करीत त्यांना वेटींगवर राहाण्याचा सल्ला दिला आहे. गुजरातची निवडणूक ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती, त्यामुळे त्यांनी मतदारांकडे मताची झोळी पसरविताना गुजराती अस्मितेचे कार्ड वापरले. अर्थातच त्याचा फायदा होणार हे ओघाने आलेच. मात्र त्याचबरोबर 22 वर्षाच्या आपल्या राजवटीबद्दल स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त करीत भाजपाला 99वरच रोखले. तर कॉग्रेसला 80 पर्यंत चांगली बढत दिली. त्याहून सर्वात महत्वाचे म्हणजे कॉग्रेसची सत्ता जरासाठी हुकली आहे. कारण कॉग्रसेच्या सुमारे 20 जणांचा पराभव हा दोन हजार मतांपेक्षा कमी मतांनी झाला आहे. 150 जागा जिंकण्याचा दावा करणार्‍या भाजपाचे हे स्वप्न काही पूर्णत्वास गेलेले नाही. त्यामुळे हा भाजपाचा विजयातील पराभवच ठरावा. गेल्या तीन वर्षात अपयशाने ग्रासलेल्या कॉग्रेससाठी हा एक शुभशकून ठरावा अशीच स्थीती आहे. पक्षाध्यक्ष राहूल गांधी यांनी या निवडणुकीसाठी आपल्या जीवाचे रान केले होते. त्यांनी हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी, अल्पेश ठाकोर या पाटीदार, दलित, आदिवासी नेत्यांची मोट बांधली व त्यातून काँग्रेस पक्षाला कसे बळ लाभेल हे पाहिले. त्यांचा हा प्रयोग शंभर टक्के यशस्वी झाला नसला तरीही भाजपाला व पंतप्रधानांना तेथे घाम आणला, हेच त्यांचे मोठे यश ठरावे. कारण 150 जागा जिंकण्याचा निश्‍चय करुन पंतप्रधानांसह सर्व केंद्रीय मंत्रिमंडळ त्यांनी गुजरातमध्ये उतरविले होते, त्यासाठी संसदेचे अधिवेशन लांबविले, पाकिस्तानला विनाकारण या राजकारण खेचले, हार्दिक पटेलची बनावट सी.डी. बाजारात आणून त्यांची बदनामी करण्यात आली. परंतु ही लढाई राहूल गांधी यांनी पटेल, ठाकोर व मेवाणी या तरुणांना एकत्र घेऊन जोमदारपणे लढविली आणि भाजपाच्या नाकी नऊ आणले. यातून एक नक्की झाले की, कॉग्रेसमुक्त भारत हे भाजपाचे स्वप्न काही भविष्यात पूर्ण होणार नाही. राहूल गांधी व कॉग्रेस पक्षाला सत्तेच्या चाव्या मिळाल्या नाहीत हे मान्य, मात्र त्यांनी पराभव हा देखील योध्याच्या स्वरुपात स्वीकारला आहे. सध्याच्या पराभवाच्या मालिका झेलत असताना कॉग्रेससाठी पराभवातील हा विजय ठरावा अशी स्थीती आहे. गुजरात हे मुळात व्यापारी व उद्योजकांचे माहेर घर असलेले राज्य आहे. येथील व्यापार्‍यांचे अर्थकारण नोटाबंदी व जी.एस.टी.मुळे बिघडले होते. ज्यावेळी अर्थकारण बिघडते त्यावेळी राज्याची सर्वच घडी बिघडते आणि त्यामुळेच हा समाज मोठ्या प्रमाणावर सरकारवर नाराज होता. मात्र जी.एस.टी.चा दर कमी करुन नरेंद्र मोदींनी निवडणुकीची व्यूहरचना आखली होती. येथील पटेल समाजातील मोठा घटक सधन आहे, या समाजात अनिवासी बांधव मोठ्या संख्येने आहेत, मात्र हे एकीकडे वास्तव असताना येथील विषमताही मोठी आहे. त्यामुळेच या समाजातील राखीव जागांच्या प्रश्‍नांची मागणी होत होती. आपल्याकडे जसे मराठ्यांना आरक्षण पाहिजे आहे, तीच स्थीती या समाजात आहे. आज हा समाज मोठ्या प्रमाणावर कॉग्रेसच्या मागे उभा राहिला आहे. तसे पाहता ही निवडणूक गुजरातच्या प्रश्‍नांवर लढविली जाण्यापेक्षा मोदींनी अस्मितेच्या प्रश्‍नावर लढविली. लोकसभा निवडणुकीत बर्‍याच वेळा चर्चेत आलेल्या गुजरात मॉडेलची येथे फारशी चर्चा झालीच नाही. कारण हे मॉडेल म्हणजे भाजपाच्या प्रचाराचा एक भास आहे. हा मॉडेलची आकडेवारी कशी फसवी आहे हे अनेकदा प्रसिध्दही झाले आहे. त्यामुळे गुजराती माणसांचे याकडून लक्ष विचलीत करण्यासाठी मोदींनी ही निवडणूक गुजराती अस्मितेकडे वळविली. गुजरात मॉडेल जे आज दाखविले जाते ते शहरी भागात डोळ्यात भरते, मात्र गुजरातच्या ग्रामीण भागाचे पायाभूत प्रश्‍न हे सोडविले गेलेले नाहीत. रस्ते, पाणी, मोदींना अपेक्षित असलेले घरोघरी शौचालय हे ग्रामीण भागात नाही आहेत. त्यामुळेच आपली नाराजी व्यक्त करीत ग्रामीण भागातील जनतेने कॉग्रेसला मोठ्या प्रमाणात हात दिला आहे. शहरी भागात मात्र नेमके उलटे चित्र दिसते. येथे भाजपाला मतदारांचा मोठा पाठिंबा मिळाला आहे. आता भाजपाची मतांची टक्केवारी घसरली आहे तर कॉग्रेसची वाढली आहे. कॉग्रेसच्या दृष्टीने ही जमेची बाजू ठरावी. खरे तर गेल्या 22 वर्षात कॉग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने गुजरातकडे फारसे लक्ष दिले नाही. हिंदुत्वाची ही प्रयोगशाळा होत असताना उदारपणाने काहीसा काणा डोळाच केला, त्याचा फायदा भाजपाने उठविला व आपले चांगलेच बस्तान मांडले. अगदी दंगलीच्या काळात व त्यानंतर सेक्युलर भूमिका घेऊन तेथील आपल्या कार्यकर्त्यंना जे पाठबळ दिले पाहिजे होते ते दिले गेले नाही. जर कॉग्रेसने एक प्रबळ विरोधी पक्ष म्हणून गेल्या दहा वर्षात काम केले असते तर आज वेगळे चित्र दिसले असते. इथून पुढे चांगली मेहनत घेतल्यास पुढील पाच वर्षांनी कॉग्रेस आता सत्ता काबीज करण्याचे स्वप्न पाहू शकते, असाच या निकालाचा अर्थ काढता येऊ शकेल. 
पुढील वर्षी मेघालय, नागालँड, त्रिपुरा, कर्नाटक, राजस्थान आणि मिझोराममध्ये विधानसभा निवडणुका येऊ घातल्या आहेत. या निवडणुकांमध्ये विजय मिळविण्याचे आव्हान काँग्रेस नवनिर्वाचीत अध्यक्ष राहुल गांधी यांच्यापुढे आहे. विजयासाठी व्यूहरचना आखून ती तळापर्यंत पोहोचवण्यासाठी अमित शहांनी गुजरातमध्ये आधीपासून यंत्रमा उभारली होती. मतदानादिवशी मतदारांना मतदानकेंद्रापर्यंत आणण्याची व्यवस्था चोख ठेवली. परिणामी राहूल गांधी, हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी आणि अल्पेश ठाकोर या तरूण रक्ताच्या विरोधकांना ते रोखू शकले. गेल्या तीन वर्षात कॉग्रेसला याच मोदी व शहांच्या जोडीने घायकुतीला आणले आहे. एक तर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत असताना सर्व प्रकारची जातिय समिकरणे जुळवून आणण्यात हे दोघे पूर्णपणे तयार आहेत. नोटाबंदी व जीएसटीच्या मुद्द्यांवर भाजप वारंवार अडचणीत आला आहे. भाजपाचा हा फ्लॉप शो होत असताना निवडणुकीची गणिते मात्र त्यांनी बेमालूमपणाने जुळवून कॉग्रेससमोर कडवे आव्हान तयार केले आहे. मोदींनी गुजरातमध्ये 50 सभा घेतल्या, त्यावर भले टीका झाली, अख्खे मंत्रिमंडळ राज्यात उरविले, परंतु शहांच्या स्टॅस्टीजीमुळे पराभव होता-होता वाचला. आज कॉग्रेसला तरुण नेतृत्व लाभले आहे. परंतु राहूल गांधींना अशा प्रकारची रसद पुरविणारे व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन लोकांपुढे जाणारे लोक आजूबाजूला ठेवण्याची आवश्यकता आहे. राहूल गांधींचा विचार करता त्यांच्या घराण्याची परंपरा व इतिहास ही त्यांच्यासाठी मोठी जमेची बाजू ठरणार आहे. घराणेशाहीचा कितीही आरोप केला तरी देशातील जनतेने गांधी-नेहरु घराण्यातील प्रत्येक व्यक्तीला आजवर स्वीकारले आहे. परंतु आता कॉग्रेसला सर्वांना सोबत घेऊन जाताना पारंपारिक राजकारणाच्या बरोबरीने जाऊन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचाही अवलंब करावा लागणार आहे. आता कॉग्रेसला राहूल गांधींच्या रुपाने तरुण अध्यक्ष सापडल्यामुळे हे त्यांना लवकर अवगत होऊ शकते. गुजरातमध्ये त्यांनी याची सुरुवात काही प्रमाणात केली आहे. परंतु त्याचे जाळे भविष्यात येऊ घातलेल्या राज्य विधानसभेच्या निवडणुकीत आत्तापासून विणावे लागेल. तरच गुजरात निवडणुकीच्या निमित्ताने मिळालेली उभारी टिकू शकते. कॉग्रेसच्या आजवर झालेल्या नुकसानापेक्षा अजून काही नुकसान होऊ शकत नाही. त्यामुळे आता काँग्रेसला भविष्यात होणारा फायदा हा राहूल गांधींसाठी फायद्याचाच ठरु शकतो. मोदी सरकारचा फोलपणा व बोगस घोषणा ते लोकांना कशा प्रकारे पटवून सांगतात, यावर त्यांच्या भविष्यातील यश अवलंबून असेल.
-------------------------------------------------------------------

0 Response to "गुजरात निकालाचा अन्वयार्थ..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel