-->
आवाज कुणाचा? लाल बावट्याचा!

आवाज कुणाचा? लाल बावट्याचा!

रविवार दि. ०२ ऑगस्ट २०१५ च्या मोहोरसाठी लेख --
-------------------------------------------
आवाज कुणाचा? लाल बावट्याचा!
-----------------------------------
एन्टो- गेल्या ६८ वर्षाच्या वाटचालीनंतर शेकाप आता एका नव्या वळणावर येऊन ठेपला आहे. आपल्या डाव्या विचारसारणीशी कोणतीही तडजोड न करता विकासाचा ध्यास शेकापने घेण्याचे ठरविले आहे. या विचारसारणीशी सहमत असणार्‍या पक्षांना सोबत घेऊन एक नवा महाराष्ट्र घडविण्याचे स्वप्न, एक नवी उर्मी शेकापकडे आहे. आजच्या मेळाव्यात अशा प्रकारे शेकापच्या लाल बावट्याचा आवाज पुन्हा एकदा दुमदुमणार आहे. एक नवी पहाट यातून उगवणार आहे हे नक्की...
-------------------------------------------
शेतकरी कामगार पक्षाचा आज ६८ वा वर्धापन दिवस. यंदा अलिबागला समुद्रकिनारी उभारलेल्या भव्य मंडपात साजरा होईल. अलिबाग नगरीला जवळजवळ १५ वर्षानंतर वर्धापन दिनाचा कार्यक्रम साजरा करण्याचा मान मिळत आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी हे यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून येत आहेत. ठिकठिकाणाहून येणार्‍या पाहुण्यांच्या स्वागताला अलिबाग नगरी सज्ज झाली आहे. याचा अलिबागला मोठा आनंदही आणि उत्साही आहे. मात्र नुकतेच अलिबागच्या माजी महापौर नमिता नाईक यांचे अपघाती निधन झाल्याने एक दुखा:ची किनार प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात आहेच. नमिता नाईक यांच्या रुपाने शेकापचा अलिबागमधील लाल तारा निखळला आहे. या अधिवेशनात त्यांची आठवण आल्याशिवाय राहाणार नाही. गेल्या वर्षीचा वर्धापन दिनाच्या निमित्ताने पनवेल तालुक्यातील कामोठे येथे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यावर शेकापचे ज्येष्ठे नेते व माजी मंत्री मोहनभाई पाटील यांच्या निधनामुळे शोककळा पसरली होती. गेल्या वर्षी निवडणुकांसाठी शेकापला त्यांचे जुने निवडणुक चिन्ह खटारा पुन्हा मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह होता. दोन वर्षापूर्वी शेकापचा मेळावा प्रथमच मुंबईत षणमुखानंद या भव्य सभागृहात घेण्यात आला होता. त्यावेळी शेकापच्या लाल बावट्यांनी मुंबई भर पावसात लाल झाली होती. या अधिवेशनाच्या पाठोपाठ मुंबई महानगरपालिकेच्या पोट निवडणुकीत शेकापच्या महिला उमेदवार विजयी झाल्या आणि मुंबई महानगरपालिकेत शेकापचा लाल बावटा फडकला. मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवकाची ताकद ही एखाद्या आमदाराशी तुल्यबळ असते. कामाकणाने  शेकापची ताकद वाढत चालली आहे. शेकाप आपला डावा विचार कायम ठेवीत विकासाचे राजकारण करीत आला आहे. गेल्या वर्षात विधानसभेच्या झालेल्या निवडणुकीत शेकापने आपली ताकद कायम राखली. अपवाद फक्त आमदार विवेकभाई पाटील यांच्या पराभवाचा. अशा प्रकारचे पराभव अनेकदा शेकापने पचविले आहेत. अनेक पराभवातूनच शेकाप उभा राहिला आहे. पूर्वी ज्याप्रमाणे शेकाप राज्यव्यापी एक आक्रमक पक्ष म्हणून राज्यात ठसा उमटवून होता, ती प्रतिमा शेकापला पुन्हा मिळण्यासाठी ऐक एक पावले टाकली जात आहेत. नवीन पिढी शेकापच्या साथीला आहे. त्याचबरोबर रायगड जिल्ह्यातील पिढ्यान पिढ्या पक्षासोबत असलेली कुटुंबे आहेत ती पक्षाची मोठी ताकद आहे. पक्षाने नव्याने कात टाकून उभारी घेत असताना नव्या माध्यमांना आपलेसे करुन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. शेकापने आपल्या वेबसाईटचे उद्घाटन केले होते. त्यानंतर प्रमुख नेत्यांच्या वेबसाईट सुरु करुन सोशल मिडियामध्ये पक्षाने प्रवेश केला. केंद्रात नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीत सोशल मिडियाची ताकद दाखवून दिल्याने आपल्यालाही आगामी निवडणुकीत आक्रमक प्रचार करण्यासाठी सोशल मिडिया वापरावा लागणार आहे, हे वास्तव शेकापने स्वीकारले आणि त्यादृष्टीने वाटचाल सुरु केली. गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत सोशल मिडीया एक महत्वाचे प्रचार माध्यम ठरले. गेल्या ६८ वर्षाच्या इतिहासात शेकापने अनेक पराजय जसे पाहिले तसेच विजयश्रीही खेचून आणलेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत शेकाप अग्रभागी होता. त्यानंतर शेतकरी, कामगार व कष्टकर्‍यांच्या प्रत्येक चळवळीत शेकाप आघाडीचा शिलेदार म्हणून या वर्गाच्या बरोबीने राहिला आहे. १९५२ साली शंकरराव मोरे यांच्या नेतृत्वाखाली २८ आमदार निवडून आले होते. आजवर राज्य विधानसभेच्या इतिहासात सर्वाधिक म्हणजे २१ वेळा विरोधी नेतेपद शेकापकडे राहिले आहे. शेकापला भाई दाजीबा देसाई, उद्धवराव पाटील, कृष्णराव धुळप, नारायण नागू पाटील, अण्णासाहेब गव्हाणे, विठ्ठलराव हांडे, एन.डी. पाटील यांच्या नेतृत्वाची एक जाज्वल्य परंपरा शेकापला लाभली आहे. १९४८ साली स्वातंत्र्यानंतर कॉँग्रेसच्या भांडवली विचारसारणीच्या नेत्यांशी न जुळल्यामुळे समाजवादी विचार रुजविण्यासाठी कॉँग्रेसमधील काही नेत्यांनी बाहेर पडून शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केली. त्यावेळी स्वातंत्र्यपूर्व काळापासून जागतिक युध्दापासून कम्युनिस्टांनी केलेल्या चुका सुधारुन समाजवादी विचार रुजविण्यासाठी शेकापने जे व्रत हाती घेतले ते आजपर्यंत. गेल्या काही वर्षात केवळ आपल्या देशातच नाही तर जगातीक पातळीवर डाव्या पक्षांची ताकद क्षीण झाली असली तरी शेकापने आपली ताकद रायगड जिल्ह्यात कायम राखली आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे शेकापने आपली नाळ आम जनतेशी अजून घट्ट जोडली आहे. ग्रामपंचायत पासून ते जिल्हापरिषद ते विधानसभा व लोकसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांचे जाळे विणण्यात आले आहे. हेच कार्यकर्ते पक्षाची मोठी ताकद ठरले आहेत. गेल्या चार वर्षांपूर्वी आमदार भाई जयंत पाटील यांच्याकडे पक्षाच्या सरचिटणीस पदाची सुत्रे आली आणि पक्षाने कात टाकली. रायगड जिल्ह्यात समाजातील प्रत्येक घटक मग तो कष्करी आसो किंवा व्यापारी असो किंवा तरुण त्याला पक्षाने आपल्याशी बांधून ठेवले आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिकवेळा निवडून जाण्याचा म्हणजेच ५० वर्षे आमदार राहिल्याचा विक्रम गणपतराव देशमुख यांच्या नावावर आहे. गणपतरावांसारखे असे अभ्यासू नेते, कार्यकर्ते शेकापमध्ये मोठ्या संख्येने आहेत. गेल्या दोन वर्षात भाजपासारख्या उजव्या शक्तींनी डोके वर काढले व सत्ताही काबीज केली आहे. अशा वेळी समाजात सलोखा राखणे व देशात सर्वधर्मसमभावाचे वातावरण टिकविणे ही मोठी जबाबदारी डाव्या विचारांच्या पक्षांवर येऊन ठेपली आहे. ग़ेल्या ६८ वर्षाच्या वाटचालीनंतर शेकाप आता एका नव्या वळणावर येऊन ठेपला आहे. आपल्या डाव्या विचारसारणीशी कोणतीही तडजोड न करता विकासाचा ध्यास शेकापने घेण्याचे ठरविले आहे. या विचारसारणीशी सहमत असणार्‍या पक्षांना सोबत घेऊन एक नवा महाराष्ट्र घडविण्याचे स्वप्न, एक नवी उर्मी शेकापकडे आहे. आजच्या मेळाव्यात अशा प्रकारे शेकापच्या लाल बावट्याचा आवाज पुन्हा एकदा दुमदुमणार आहे. एक नवी पहाट यातून उगवणार आहे हे नक्की.

Related Posts

0 Response to "आवाज कुणाचा? लाल बावट्याचा!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel