
देशातील वाढता मध्यमवर्गीय...
21 मार्च मोहोरसाठी चिंतन
देशातील वाढता मध्यमवर्गीय...
आपल्या देशात गेल्या काही वर्षात मध्यमवर्गीय कुटुंबाच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. एकूणच देशाच्या दृष्टीने ही सकारात्मक बाब म्हटली पाहिजे. गेल्या वर्षीचा हुरुन इंडिया तर्फे संपत्ती अहवाल जो प्रसिध्द झाला आहे त्यात मध्यमवर्गांच्या जोडीने देशात एक नवमध्यमवर्ग उदयास आल्याचे नमूद करण्यात आले आहे. म्हणजे आपल्याकडे नवश्रीमंतांच्या जसा एक वर्ग आहे त्याच धर्तीवर हा नवमध्यमवर्गीयाचा उदय झाला आहे. सध्या देशात सुमारे ३५ कोटींहून जास्त संख्येने मध्यमवर्ग आहे. त्यात विविध आर्थिक स्थराप्रमाणे उपगट करता येतील, परंतु सरासरी मध्यमवर्गांची संख्या ३५ कोटी गृहीत धरली तरी संपूर्ण अमेरिकेची लोकसंख्या तेवढी भरते. म्हणजे आपल्याकडे चांगल्या प्रकारे दरमहा खर्च करणाऱ्यांची एक मोठी बाजारपेठ आणि आकडेवारीत सांगायचे झाल्यास अमेरिकेएवढीच उपलब्ध आहे. याच बाजारपेठेकडे अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या नजरा आहेत. आज एवढ्या मोठ्या संख्येने मध्यमवर्गीय आपल्या शेजारच्या चीनमध्येही नाही. आज आपल्याकडील मध्यमवर्गीयांच्या जीवावर अनेक मोठ्या बाजारपेठा विकसीत झाल्या आहेत. अर्थातच त्यातून रोजगार निर्मीतीही झाली आहे. त्यामुळे मध्यमवर्गीयांच्या या भारतीय बाजारपेठेला जागतिक स्थारावरील कंपन्या महत्व देतात. असो, आता यातही एक नवा गट उदयास आला आहे. या गटातील लोक दरवर्षी सुमारे २० लाख रुपयांची बचत करु शकतात. अशी नवमध्यमवर्गीय कुटुंबे देशात सहा लाख ३३ हजार आहेत. आपल्या देशात दोन टक्क्यांच्या हाती ७० टक्के संपत्ती केंद्रीत झाल्याचे आकडेवारी सांगते. परंतु हे दोन टक्के लोक म्हणजे अतिश्रीमंत वर्गातील आहेत. त्यात अंबानी, अदानींपासून असलेले उद्योगपती, पूर्वीश्रमीचे राजे-महाराजे, वडिलोपार्जित करोडोच्या असलेले संपत्तीचे वारस व त्यांच्या जोडीला बौध्दीक संपत्तीच्या जोरावर झालेले आय.टी. उद्योगातील नवउद्योजक, सी.ई.ओ. यांचा समावेश आहे. आपल्या देशाच्या लोकसंख्येचा विचार करता यांचीही संख्या तीन-चार कोटींच्या घरात भरेल. परंतु त्यातील एक वेगळा गट काढता येईल व ज्यांचा गर्भश्रीमंत असा उल्लेख करता येईल अशी देशात केवळ ३० कुटुंबे आहेत. तर त्या तुलनेत मोठ्या संख्येने पाच लाखांच्या घरात उत्पन्न असलेला मध्यमवर्गीय देशात सुमारे सहा कोटींच्या संख्येने आहे. यातही झपाट्याने गेल्या काही वर्षात वाढ झाली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे देशात सव्वा चार लाख लोक कोट्याधीश या वर्गात मोडतात. त्यातील ५६ हजार लोक हे केवळ महाराष्ट्रात आहेत. देशातील कोट्याधीश जास्त संख्येने राहात असलेले महाराष्ट्र हे आघाडीचे राज्य ठरले आहे. श्रीमंतीचे हे विविध गट आपल्याकडे प्रामुख्याने आर्थिक उदारीकरण सुरु झाल्यापासून बदलल आहेत. स्वातंत्र्यानंतर आपल्याकडे श्रीमंत लोक होते. त्यात देशातील बडे भांडवलदार व वडिलोपार्जित मालमत्ता असलेले लोक होते. मात्र त्याकाळी मध्यमवर्ग ही संकल्पना अगदीच लहान होती. या वर्गातील लोक अत्यंत कमी होते. त्याकाळी असलेला मध्यमवर्ग हा चाळीत राहाणारा होता. नोकरपेशातील हा वर्ग आपल्या पगारात जेमतेम संसार करीत असे. त्याकाळी असलेल्या कष्टकऱ्यांमध्येही त्यांचा समावेश नव्हता किवा त्याकाळच्या श्रीमंतांमध्येही त्यांचा समावेश होणे अश्यक्य होते. मात्र या दोघांमधील एक मधला गट म्हणून तो मध्यमवर्गीय. पु.ल.च्या बटाट्याच्या चाळीत त्याचे योग्य वर्णन केले आहे. परंतु आर्थिक उदारीकरण सुरु झाले आणि आपल्या देशातील आर्थिक स्थरांची उतरांड बदलू लागली. देशात मध्यमवर्ग झपाट्याने वाढू लागला. यात प्रामुख्याने सुशिक्षित कुटुंबांतील नवरा-बायको नोकरीला लागल्याने त्यांच्या घरात उत्पन्नाचे साधन वाढले. बँक, विमा यांच्या राष्ट्रीयीकरणानंतर तेथे नोकरीला असलेल्या नोकरांचा मध्यमवर्गीयात समावेश होऊ लागला. सुशिक्षीतांच्या घरातील मुले चांगली शिकली होती. त्यांतील काहींनी विदेशात जाण्याचे ठरविले तर काहींनी देशात राहून चांगल्या पगाराच्या नोकऱ्या धरल्या. एकूणच मध्यवर्गीयाने आपल्या कष्टाने आपला विकास करुन घेतला. ९१ पासून सुरु झालेले आर्थिक उदारीकरण व त्याअगोदर एक दशक राजीव गांधींच्या काळात सुरु झालेले संगणकीकरण यात मध्यमवर्गीय आपली कात टाकू लागला. देशात संगणकीकरणाचे युग सुरु झाल्यावर नारायणमूर्ती, शिव नाडर, अझीम प्रेमजी यांच्यासारख्या अनेकांनी आपल्या बौध्दीक संपत्तीच्या जोरावर पैसा कमविला आणि श्रीमंतांच्या यादीत नवश्रीमंत म्हणून मानाचे स्थान मिळविले. त्याकाळी पैसा कमविण्यासाठी तुमच्या आर्थिक भांडवलाची गरज भासे. परंतु आता बौध्दीक संपत्तीच्या जिवावर पैसे कमविणाऱी एक नवी पिढी जन्माला आली. त्याने तर आपल्याकडील सर्व चित्रच पालटवले. आय.टी. उद्योगातील या कंपन्यांनी देशात मोठी रोजगार निर्मीती केली व त्याचबरोबर अनेकांना मध्यवर्गीयांच्या रांकेत ढकलले. यात आय.टी. अभियंत्यापासून ते कॉल सेंटरमध्ये काम करणारे अनेक जण आले. ९० व २००० साली जर आय.टी. उद्योग नसता तर या करोडो लोकांना रोजगार कुठून मिळणार होता आणि मध्यमवर्गीयही कसा वाढला असता हा सवालच होता. खरे तर या मध्यमवर्गीयांनी राजीव गांधींचे आभार मानावयास हवेत. परंतु पुढे चालून हाच वर्ग कॉँग्रेसचा कट्टर विरोधक झाला आणि नरेंद्र मोदींना सत्तेवर आणण्यात याच वर्गाचा मोठा वाटा आहे. आता आपल्याकडील या मद्यमवर्गीयात नवमध्यमवर्गीय असा एक नवा उपगट जन्माला आला आहे. त्यानुसार, नवमध्यमवर्गीय ही मध्यमवर्गीयांची पुढची पायरी म्हटली पाहिजे. कोरोनाने अनेकांना देशोधडीला लागले, मात्र या वर्गानेच कोरोना आटोक्यात येतोय हे पाहिल्यावर मर्सिडीज खरेदी केल्या. कोरोनातील घसरलेल्या आलिशान घरांच्या किमतीचा फायदा घेण्यासाठी याच वर्गाने फायदा उचलला. मुंबईत आज करोडो रुपयांचे फ्लॅट विक्रीला दिसतात. याची खरेदी कोण करतो असा सर्वसामान्यांना प्रश्न पडतो. परंतु हाच वर्ग याची खरेदी करीत आहे. आपल्या देशातील सुमारे विविध सधन आर्थिक गटातील सुमारे ४० कोटी लोक चांगल्या आर्थिक स्थितीत आहेत ही देशाच्या अर्थकारणाच्या दृष्टीने चांगली बाब म्हटली पाहिजे. मात्र आपल्याकडील एकूण १३० कोटी जनतेपैकी अजूनही अर्धी जनता एकवेळ जेवते याची खंत वाटते.
0 Response to "देशातील वाढता मध्यमवर्गीय..."
टिप्पणी पोस्ट करा