-->
चलो रोहा!

चलो रोहा!

शुक्रवार दि. 02 ऑगस्ट 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
----------------------------------------------
चलो रोहा!
महाराष्ट्रातील डाव्या चळवळीतील मोठा भाऊ असा ज्याचा उल्लेख केला जातो त्या शेतकरी कामगार पक्षाने आपल्या स्थापनेची 72 वर्षे पूर्ण केली आहेत. स्वातंत्र्य लढ्याची पार्श्‍वभूमी लाभलेला राष्ट्रीय कॉग्रेसच्या खालोखाल जुना पक्ष शेकापच आहे. शेकापच्या स्थापनेच्या निमित्ताने पक्ष सदस्यांचा मेळावा आज रोहा येथे आयोजित करण्यात आला आहे. डावी चळवळ आता संपली, असे म्हणणार्‍यांना चोख उत्तर या आधिवेशनाच्या रुपाने देण्यात येणार आहे. नव्या जोमाने आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला पक्षाच्या नेत्यांपासून ते कार्यकर्ते आता लागतील. शेकापचा आजवरचा इतिहास रोमहर्षक व विविध राजकीय घडामोडींनी भरलेला आहे. 3 ऑगस्ट 1947 रोजी आळंदी येथे जमलेल्या काँग्रेसमधील कार्यकर्त्यांनी काँग्रेसअंतर्गत शेतकरी कामगार संघ स्थापना करण्याची घोषणा केली. त्यावेळी देशात आलेल्या सत्तेचा प्रयोग भांडवलदार आणि जमीनदार निश्‍चितपणे स्वत:च्या हितासाठी करतील आणि ज्या शेतकरी, कामगार आणि कष्टकर्‍यांनी असीम त्याग करुन आणि प्रसंगी प्राण्याची आहुती देऊन स्वातंत्र्य मिळविले त्यांना वार्‍यावर सोडतील अशी भीती असल्याचा इशाराही त्यावेळी देण्यात आला होता. त्यासाठी समाजवादी भूमिका स्वीकारुन काम करण्याची घोषणाही संघाने केली होती. काँग्रेसअंतर्गत सुरु असलेल्या या चळवळीने काँग्रेसच्या पुढार्‍यांमध्ये अस्वस्थता निर्माण होणे स्वाभाविक होते. त्यांनी संघाच्या कामात वेगवेगळ्या पद्धतीने व्यत्यय आणण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळे काँग्रेसअंतर्गत शेतकरी संघाने काँग्रेसचा त्याग करुन 1948 मध्ये भारतीय शेतकरी कामगार पक्षांची स्थापना केली. त्यानंतर 1950 मध्ये दाभाडी येथे पक्षाचे अधिवेशन घेण्यात आले आणि या अधिवेशनात पक्षाची भूमिका निश्‍चित करण्यात आली. पक्षाने शास्त्रीय समाजवादाचा आणि मार्क्सवाद-लेनिनवादाचा अंगीकार केला. यात पक्षाने राजकीय व आर्थिक असे विविध ठराव संमत करुन तत्कालीन स्थितीवर आपली भूमिका तर स्पष्ट केलीच त्याबरोबर पक्षाच्या कार्यपद्धतीबद्दलही सखोल भूमिका मांडली गेली. चांगल्या कार्यकर्त्यांशिवाय पक्षाच्या कामाला मार्क्सवादी अवस्थेचे स्वरुप येत नाही आणि मार्क्सवादी पक्षात काम केल्याशिवाय कार्यकर्ते तयार होत नाहीत. मार्क्सवादी पक्षाची पहिली आवश्यक गोष्ट योजनाबद्धता ही आहे. पक्षाच्या कोणत्याही सभासदाने किंवा सेलने करावयाचे काम नेहमीच योजनाबद्ध असले पाहिजे. लहर वाटली म्हणून एखादी गोष्ट करणे याला मार्क्सवादी म्हणत नाहीत. ती मध्यवर्गीय अपप्रवृत्ती आहे. ती झाडून टाकण्याचा आपण अत्यंत कसोशीने प्रयत्न केला पाहिजे. थोडक्यात पक्षाची कार्यपद्धती, विचारसरणी कशी असेल आणि कार्यकर्ता कसा असावा यासंबंधीचे विश्‍लेषण यामध्ये करण्यात आलेले आहे. दाभाडी प्रबंध म्हणून पुढे हा सारा दस्ताऐवज प्रसिद्धीला आला. पक्षाची स्थापना झाल्यानंतर पहिल्याच चार-पाच वर्षात पक्षाला अनेक तडाखे बसले. पक्षांतर्गत आणि वैयक्तीक वाद उफाळून आले. शेतकरी, कष्टकरी आणि कामगारांच्या हिताची भाषा करणार्या या पक्षाला नख लावण्यासाठी अनेक बाह्यशक्ती कार्यरत होत्या. आतमध्ये राहूनही पक्षाचा पाया खिळखिळा करण्याचे उद्योग काहींनी सुरु केलेे. पण पक्ष आणि विचारांवर निष्ठा असणार्‍या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बाह्य-अंतर्गत विरोधकांचे सर्व प्रयत्न हाणून पाडले. अंतिमत: दाभाडीच्या भूमिकेचा विजय झाला. त्यानंतरच्या वाटचालीतही पक्षाने अनेक चढ-उतार पाहिले. यश-अपयशाचे गोड-कडू अनुभव घेतले. पक्षाचे आता काय होणार अशी भीती व्यक्त केली जावी अशीही परिस्थिती निर्माण झाली; पण प्रत्येक वेळी तावून-सुलाखून निघालेला शेकाप निर्धाराने पुढे चालत राहिला. 1952 साली शंकरराव मोरे यांच्या नेतृत्वाखाली 28 आमदार निवडून आले होते. आजवर राज्य विधानसभेच्या इतिहासात सर्वाधिक म्हणजे 21 वेळा विरोधी नेतेपद शेकापकडे राहिले आहे. भाई दाजीबा देसाई, उद्धवराव पाटील, कृष्णराव धुळप, नारायण नागू पाटील, अण्णासाहेब गव्हाणे, विठ्ठलराव हांडे, एन.डी. पाटील यांच्या नेतृत्वाची एक जाज्वल्य परंपरा शेकापला लाभली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून जागतिक युध्दापासून कम्युनिस्टांनी केलेल्या चुका सुधारुन समाजवादी विचार रुजविण्यासाठी शेकापने जे व्रत हाती घेतले ते आजपर्यंत. गेल्या काही वर्षात केवळ आपल्या देशातच नाही तर जगातीक पातळीवर डाव्या पक्षांची ताकद क्षीण झाली असली तरी शेकापने आपली ताकद रायगड जिल्ह्यात व राज्यातील काही भागात कायम राखली आहे. शेकापच्या या सात दशकांच्या प्रवासात कित्येक आले, सत्ता उपभोगून गेलेही; पण कार्यकर्ता त्यांच्याबरोबर गेला नाही. तो पक्षाबरोबरच राहिला. कार्यकर्त्यांची पक्ष आणि विचारांवरील ही अढळ निष्ठाच पक्षाला नवी उभारी देत गेली. शेकापबरोबर स्थापन झालेले अनेक पक्ष वादळात सापडल्यानंतर तग धरु शकले नाहीत. शेकाप मात्र आजही ताठ मानेन उभा आहे. मार्क्सवादी-लेनिनवादी भूमिकेमुळेच पक्ष अधिकाधिक एकजिनसी एकविचारी बनला. विचारांच्या भक्कम पायावर उभ्या राहिलेल्या शेकापने आपल्या कार्याची दिशाही नक्की केलेली असल्याने असंख्य कार्यकर्ते लाल झेड्यांखाली एकत्र आले. शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगारांचे हितरक्षण करण्याचे आणि लोकशाही हक्काचे राजकारण, समाजकारण स्विकारुन पक्षाने वाटचाल केली आहे. या वाटचालीत पक्षाने अनेक आंदोलने केली, लाखो लोकांना न्याय मिळवून दिला, विविध सामाजिक प्रश्‍नांना वाचा फोडली यांची मोजदाद करणे अवघड आहे. पक्ष जनतेबरोबर राहिला, पक्षाने जनतेचा विश्‍वास संपादन केला. नाशिक आधिवेशनात आमदार भाई जयंत पाटील यांच्याकडे पक्षाचे सरचिटणीसपद आल्यापासून पक्षात तरुणाईचे एक नवे वारे संचारले. पक्षातील जुन्या जाणत्या नेत्यांना सोबत घेऊन जात जयंतभाईंनी तरुणांना पक्षात खेचले आहे. यातून पक्षाची ताकद कणाकणाने वाढत गेली आहे. आजवर पक्षाची सोलापूर, दाभाडी, सांगली, लातूर, शेगाव, नाशिक, मोमिनाबाद, पंढरपूर, पोयनाड, सांगली, कोल्हापूर, अलिबाग, तुळजापूर, काटोल, परभणी, नाशिक, औरंगाबाद अशी आधिवेशने झाली आहेत. या प्रत्येक आधिवेशनात त्या त्या काळाशी निगडीत राजकीय, आर्थिक ठराव करुन पक्षाने त्याची अंमलबजावणी करीत वाटचाल केली आहे. गेल्या वर्षात देशात अनेक वादळे आली. मोदी सरकार पुन्हा सत्ते आले. त्यानंतर कर्नाटकातील लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार भाजपाने पाडले व तेथे आपली सत्ता स्थापन केली. अशा प्रकारे लोकशहाीचा गळा घोटण्यात आला आहे. त्याचबरोबर देशात तयार करण्यात आलेल्या माहितीच्या अधिकाराच्या कायदा सौम्य करण्याच्या दिशेने या सरकारची पावले पडत आहेत. भाजपने गेली पाच वर्षे केवळ धार्मिक-जातीय विद्वेषाचे आणि सामाजिक दुफळी माजवण्याचे राजकारण केले आहे. आता विधानसभा निवडणुका आगामी काळात येत असताना हे त्यांचे राजकारण अधिक वेग घेणार आहे. ज्या प्रकारे धाकदापटशहा दाखवत कॉँग्रेस व राष्ट्रवादीचे आमदार भाजपाने फोडले आहेत ते पाहता राजकारण आता अतिशय खालच्या थराला नेण्याचे काम सध्याचे राज्यकर्ते करीत आहेत. ही लोकशाहीवरील मोठा आघात ठरावा. देशातून विरोधी पक्षच हद्दपार करण्याचे कारस्थान रचले जात आहे. भाजप आणि शिवसेना यांना वगळून उर्वरित पुरोगामी, लोकशाहीवादी आणि डाव्या पक्षांची महायुती महाराष्ट्रात आकार घेताना दिसत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यासारख्या भांडवलदारांची तळी उचलणार्‍या पक्षांशी आपले मतभेद असणे स्वाभाविक आहे परंतु भाजप शिवसेनेचे राजकारण शेकापचे प्रेरणास्थान असलेल्या फुले, शाहू, आंबेडकरी विचारधारेला सरळसरळ छेद देणारे आहे म्हणून त्यांचा बिमोड करणे आवश्यक ठरते. बहुजनवादी विचारधारेच्या आधाराने महाराष्ट्रातील समस्त शेतकरी, कष्टकरी जनतेची लढाई लढणे हे भविष्यातील खरे आव्हान आहे.
-----------------------------------------------------------------

0 Response to "चलो रोहा!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel