-->
समाधानकारक कामगिरी

समाधानकारक कामगिरी

मंगळवार दि. 04 सप्टेंबर 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
समाधानकारक कामगिरी
जाकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने पदकाच्या शर्यतीत एक पाऊल पुढे टाकले असून यंदा भारतीय चमूची कामगिरी समाधानकारक झाली आहे. 15 सुवर्ण, 24 रौप्य आणि 30 ब्राँझ अशी 69 पदके मिळवून भारतीय खेळाडूंनी 2010 मध्ये ग्वांगझू येथे केलेल्या आपल्या आधीच्या 67 पदकांच्या कामगिरीला मागे टाकले. त्याचबरोबर 1951 मध्ये भारतातच नवी दिल्ली येथे झालेल्या स्पर्धेत 15 सुवर्णपदकांच्या कामगिरीची बरोबरी साधली. पदक जिंकणारा प्रत्येक खेळाडू हा मैदानात मोठ्या जिद्दीने आपल्या स्वप्नपूर्तीपर्यंत पोचला होता. यातील कुणी खेळाडू बेरोजगार होता, कुणी हलाखीच्या परिस्थितीतून पुढे आला होता, तर कुणी अतिशय गरीबीतून संघर्ष करीत पदकापर्यंत पोहोचला होता. त्यांच्या या यशोगाथा प्रसिद्द होत आहेत, त्यावाचून त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. या आधीच्या तुलनेत भारतीय खेळाडूंची कामगिरी चांगलीच उंचावलेली आहे असेच म्हणावे लागेल. त्यामुळे आपण क्रीडा क्षेत्रात धीमे गतीने का होईना सकारात्मक पाऊल टाकीत आहोत. ऍथलेटिक्स, नेमबाजी, कुस्ती, टेबल टेनिस, बॅडमिंटन या खेळांत आपले खेळाडू चमकले. भारताच्या एकूण यशातील त्यांचा वाटा महत्त्वाचा होता. जाकार्तातील69 पदकांचे श्रेय हे फक्त त्या खेळाडूंनाच दिले गेले पाहिजे. कोणत्याही सरकारी पाठबळाशिवाय त्यांनी हे यश संपादन केले आहे. या खेळाडूंनी आपल्या कामगिरीने काही क्रीडा प्रकारात चीन, जपान या आशियातील दिग्गजांना मागे टाकले. टेबल टेनिससारख्या खेळांत मिळविलेले यश राष्ट्रकुल स्पर्धेप्रमाणेच कौतुकास्पद आहे. बॅडमिंटनमधील कामगिरीदेखील ऐतिहासिक ठरली; परंतु पी. व्ही. सिंधूचे विजेतेपदाच्या लढतीतील आणखी एक अपयश चटका लावणारे होते.
सुशील कुमार, साक्षी मलिक कुस्तीत अपयशी ठरत असताना बजरंग पुनिया, विनेश फोगट यांनी कुस्तीचे भविष्य सुरक्षित हाती असल्याची खात्री दिली. अपेक्षा उंचावून गेलेली मनू भाकर अपयशी ठरली; पण राही सरनोबतने दोन वर्षांनंतर मिळविलेले यश नोंद घेण्याजोगे ठरले. त्याचबरोबर शार्दुल विहान, सौरभ चौधरी, लक्ष्य शेरॉन असे नवे नेमबाजही दिले. द्युती चंद, स्वप्ना बर्मन, जिन्सन जिन्सॉन, हिमा दास, नीरज चोप्रा या ऍथलिट्सनी यातही भारतही मागे नाही, हे दाखवून दिले. यात 570 खेळाडू सर्वच्या सर्व 36 क्रीडा प्रकारांत सहभागी झाले होते आणि हाती 69 पदके आली. ही कामगिरी आतापर्यंतची सर्वोत्तम असली तरी, आपल्याला अजून मोठा पल्ला गाठावयाचा आहे हे विसरता कामा नये. आजपर्यंतच्या यशावर संतुष्ट न राहता एक पाऊल पुढे कसे पडेल, याचा विचार होण्याची गरज आहे. कबड्डीची हमखास म्हणून अपेक्षित धरलेली दोन सुवर्णपदके हुकली. तेथे फाजील आत्मविश्‍वास आपल्याला महागात पडला. आपल्याच देशातील एका प्रशिक्षिकेने बाहेर जाऊन इराणला विजेते बनवले. हॉकीमध्ये साखळी सामन्यातील गोल धडाका बाद फेरीत राखता आला नाही. पुरुष संघ उपांत्य फेरीतच गडबडला. त्यांना पाकिस्तानला हरवून ब्राँझपदक मिळविल्याचे एक समाधाल लाभले त्यातच काय ते समाधान. पाकिस्तान पदकाशिवाय राहिला यात आपण समाधान मानले. खरे तर क्रिडा स्पर्धांमध्ये अशा प्रकारचे राजकारण आपल्याला नको आहे. महिला संघ अंतिम फेरीपर्यंत पोचूनही सुवर्णपदकापासून दूर राहिला, हे मोठे दु:ख आहे. आता दोन्ही संघांना ऑलिंपिक प्रवेश कठीण झाला आहे. कॅनॉइंग, रोइंग, हँडबॉल, व्हॉलिबॉल, सायकलिंग, जिम्नॅस्टिक, जलतरण या खेळात आपल्याला बरेच काही शिकायचे आहे, हे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. बॉक्सिंगमध्ये अमित पंघलने ऑलिंपिक विजेत्यास हरवून आशा पल्लवित केल्या. अनेक खेळ न्यायालयाच्या पायर्‍या चढून एशियाडच्या वारीला पोचले. यात सेलिंगमधील श्‍वेता आणि वर्षा यांचे यश वगळता सर्व खेळात आपण पहिल्या फेरीचा अडथळा दूर करू शकलो नाही. भविष्यात संघ पाठविताना याचा विचार होणे आवश्यक आहे. या स्पर्धेतून विहान, हिमा, लक्ष्य, सौरभ, अमित यांच्यासारखेे अनेक खेळाडू नव्याने आपल्याला गवसले आहेत. या खेळाडूंवर आता पारितोषिकांची खैरात होईल, नोकरीची आश्‍वासने दिली जातील; पण या सगळ्यातून नेमके काय साधले जाते? त्यांच्यावर पारितोषिकांची खैरात जरुर करावी परंतु त्यांच्यातील गुणवत्ता कशी जपता येईल, याचा विचार प्रामुख्याने व्हायला हवा. त्यांना वैयक्तिक मदत करण्याची आवश्यकता आहेच शिवाय त्यांच्या खेळाच्या प्रगतीसाठीही मदतीची गरज आहे. ही मदत सरकारकडून अपेक्षित आहे. त्यासाठी उत्तम प्रशिक्षण वा उत्तम पायाभूत सुविधा पुरविणे ही प्राथमिक गरज आहे. त्यातून कामगिरीत सातत्य राखण्याकडे खेळाडू लक्ष देतील. सध्या आपल्याकडे क्रिकेट खेळाकडे सार्वंचेच लक्ष केंद्रीत झाल्याने अन्य खेळाकडे सरकारपासून ते सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे. आपम क्रिकेटचा फोकस बदलून जोपर्यंत अन्य खेळांवर लक्ष केंद्रीत करीत नाही तोपर्यंत या खेळांचा व खेळाडूंचा परिपूर्ण विकास होणार नाही. खेळाडू हे एका रात्रीत घडत नाहीत, तर ती वर्षानुवर्षाची तपस्या असते. ही तपस्या आपल्याला करावी लागेल. ऑलिंपिक दोन वर्षांनी होणार आहे, तिथेही उत्तम कामगिरी व्हावी, यासाठी आत्तापासून जोरदार प्रयत्न सुरु करण्याची आवश्यकता आहे.
------------------------------------------------------------------

0 Response to "समाधानकारक कामगिरी"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel