-->
खालापूरमध्ये नवी पहाट

खालापूरमध्ये नवी पहाट

संपादकीय पान मंगळवार दि. ०२ ऑगस्ट २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
खालापूरमध्ये नवी पहाट
शेतकरी कामगार पक्षाचा आज ६९ वा वर्धापन दिवस. यंदा खालापूर येथे हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. खालापूरच्या नवीन स्थापन झालेल्या नगरपंचायतीची निवडणूक शेकापने एकहाती जिंकली व तेथे शिवानी जंगम पहिल्या नगराध्यक्ष म्हणून स्थान्नापन्न झाल्या. खालापूर गेल्या काही वर्षात झपाट्याने बदलले आहे. आता खालापूरचे भविष्य येथील मतदारांनी शेकापच्या हाती दिले आहे. भविष्यात खालापूर नगरी ही स्मार्ट सिटी झाल्याशिवाय राहाणार नाही, अशा प्रकारचे विकासाचे राजकारण शेकाप करीत असल्याचा संदेश या मेळाव्याच्या निमित्ताने देण्यात आला आहे. काणाकणाने  शेकापची ताकद वाढत चालली आहे. शेकाप आपला डावा विचार कायम ठेवीत विकासाचे राजकारण करीत आला आहे. गेल्या वर्षात विधानसभेच्या झालेल्या निवडणुकीत शेकापने आपली ताकद कायम राखली. पूर्वी ज्याप्रमाणे शेकाप राज्यव्यापी एक आक्रमक पक्ष म्हणून राज्यात ठसा उमटवून होता, ती प्रतिमा शेकापला पुन्हा मिळण्यासाठी ऐक एक पावले टाकली जात आहेत. नवीन पिढी शेकापच्या साथीला आहे. त्याचबरोबर रायगड जिल्ह्यातील पिढ्यान पिढ्या पक्षासोबत असलेली कुटुंबे आहेत ती पक्षाची मोठी ताकद आहे. पक्षाने नव्याने कात टाकून उभारी घेत असताना नव्या माध्यमांना आपलेसे करुन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. शेकापने आपल्या वेबसाईटचे उद्घाटन केले होते. त्यानंतर प्रमुख नेत्यांच्या वेबसाईट सुरु करुन सोशल मिडियामध्ये पक्षाने प्रवेश केला. केंद्रात नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीत सोशल मिडियाची ताकद दाखवून दिल्याने आपल्यालाही आगामी निवडणुकीत आक्रमक प्रचार करण्यासाठी सोशल मिडिया वापरावा लागणार आहे, हे वास्तव शेकापने स्वीकारले आणि त्यादृष्टीने वाटचाल सुरु केली. गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत सोशल मिडीया एक महत्वाचे प्रचार माध्यम ठरले. गेल्या ६८ वर्षाच्या इतिहासात शेकापने अनेक पराजय जसे पाहिले तसेच विजयश्रीही खेचून आणलेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत शेकाप अग्रभागी होता. त्यानंतर शेतकरी, कामगार व कष्टकर्यां च्या प्रत्येक चळवळीत शेकाप आघाडीचा शिलेदार म्हणून या वर्गाच्या बरोबीने राहिला आहे. १९५२ साली शंकरराव मोरे यांच्या नेतृत्वाखाली २८ आमदार निवडून आले होते. आजवर राज्य विधानसभेच्या इतिहासात सर्वाधिक म्हणजे २१ वेळा विरोधी नेतेपद शेकापकडे राहिले आहे. शेकापला भाई दाजीबा देसाई, उद्धवराव पाटील, कृष्णराव धुळप, नारायण नागू पाटील, अण्णासाहेब गव्हाणे, विठ्ठलराव हांडे, एन.डी. पाटील यांच्या नेतृत्वाची एक जाज्वल्य परंपरा शेकापला लाभली आहे. १९४८ साली स्वातंत्र्यानंतर कॉँग्रेसच्या भांडवली विचारसारणीच्या नेत्यांशी न जुळल्यामुळे समाजवादी विचार रुजविण्यासाठी कॉँग्रेसमधील काही नेत्यांनी बाहेर पडून शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केली. त्यावेळी स्वातंत्र्यपूर्व काळापासून जागतिक युध्दापासून कम्युनिस्टांनी केलेल्या चुका सुधारुन समाजवादी विचार रुजविण्यासाठी शेकापने जे व्रत हाती घेतले ते आजपर्यंत. गेल्या काही वर्षात केवळ आपल्या देशातच नाही तर जगातीक पातळीवर डाव्या पक्षांची ताकद क्षीण झाली असली तरी शेकापने आपली ताकद रायगड जिल्ह्यात कायम राखली आहे. गेल्या वर्षीच्या वर्धापन दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या माकपचे सरचिटणीस सिताराम येचुरी यांनी त्याबद्दल शेकापचे कौतुक आपल्या भाषणात केले होते. याचे महत्वाचे कारण म्हणजे शेकापने आपली नाळ आम जनतेशी अजून घट्ट जोडली आहे. गेल्या पाच वर्षांपूर्वी आमदार भाई जयंत पाटील यांच्याकडे पक्षाच्या सरचिटणीस पदाची सुत्रे आली आणि पक्षाने कात टाकली. रायगड जिल्ह्यात समाजातील प्रत्येक घटक मग तो कष्करी आसो किंवा व्यापारी असो किंवा तरुण त्याला पक्षाने आपल्याशी बांधून ठेवले आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिकवेळा निवडून जाण्याचा म्हणजेच ५० वर्षे आमदार राहिल्याचा विक्रम गणपतराव देशमुख यांच्या नावावर आहे. गेल्या दोन वर्षात भाजपासारख्या उजव्या शक्तींनी डोके वर काढले व सत्ताही काबीज केली आहे. अशा वेळी समाजात सलोखा राखणे व देशात सर्वधर्मसमभावाचे वातावरण टिकविणे ही मोठी जबाबदारी डाव्या विचारांच्या पक्षांवर येऊन ठेपली आहे. रायगड जिल्ह्यावरील आपली पकड शेकापने घट्ट केली आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे पनवेलमधील १५ ग्रामपंचायतीपैकी ११ ठिकाणी शेकापचा लाल झेंडा फडकला. गेले वर्ष दुष्काळाचे होते. परंतु तेथील जनतेला मदत करण्याचे व कायम दुष्काळमुक्ती करण्यासाठी शेकापने पावले उचलली. औरंगाबाद येथे आयोजित केलेला शेतकर्‍यांचा मोठा मोर्चा शेकापची तेथील वाढती ताकद सांगून गेला. तसेच पैठण तालुक्यातील दावरवाडी येथे नदीचे केलेले खोलीकरण व रुंदीकरण तेथे दुष्काळमुक्तीच्या कामासाठी उपयोगी पडणार आहे. तसेच मराठवाडा विद्यापीठातील ६०० विद्यार्थ्यांना दुष्काळ संपेपर्यंत पक्षातर्फे दोन वेळचे जेवण देण्यात आले. राज्यातील कोणत्याही पक्षाने आजवर असे काम केले नसावे. आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांसमवेत यंदावी दिवाळी शेकापच्या कार्यकर्त्यांनी साजरी केली. या शेतकर्‍यांच्या घरातील अंधार दूर करण्याचा केलेला हा एक स्तुत्य उपक्रम होता. अलिबागमधील रायगड बाजाराच्या नूतन वास्तूची उभारणी अनेकांचा विरोध डावलून करण्यात आली आहे. यामुळे अलिबागकरांना मुंबईसारख्या एखाद्या शहरातील मॉलमध्ये शॉॅपिंग केल्याचा अनुभव मिळत आहे. त्याचबरोबर मुंबई-गोवा मार्गाचे चौपदरीकरण मार्गी लागण्यासाठी आंदोलन, नैना प्रकल्पाच्या विरोधात महामोर्चा, पनवेल येथे झोपडपट्टीवासियांच्या पुर्नवसनासाठी मोर्चा अशी विविध आंदोलने करुन लोकांना न्याय मिळवून देण्यात आला. रायगडचा आत्मा असलेल्या कबड्डीच्या महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनवर सहकार्यवाहपदी शेकापचे तरुण नेते आस्वाद पाटील यांची झालेली निवड पक्षाला नवीन उमेद देणारी ठरणार आहे. ग़ेल्या ६९ वर्षाच्या वाटचालीनंतर शेकाप आता एका नव्या वळणावर येऊन ठेपला आहे. आपल्या डाव्या विचारसारणीशी कोणतीही तडजोड न करता विकासाचा ध्यास शेकापने घेण्याचे ठरविले आहे. या विचारसारणीशी सहमत असणार्‍या तसेच फुले, आंबेडकर, शाहू महाराजांच्या विचार रुजविणार्‍यांना सोबत घेऊन एक नवा महाराष्ट्र घडविण्याचे स्वप्न, एक नवी उर्मी शेकापकडे आहे. आजच्या मेळाव्यात अशा प्रकारे शेकापच्या लाल बावट्याचा आवाज पुन्हा एकदा दुमदुमणार आहे. एक नवी पहाट यातून उगवणार आहे हे नक्की.
-----------------------------------------------------------

0 Response to "खालापूरमध्ये नवी पहाट"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel