-->
संपादकीय पान बुधवार दि. १८ जानेवारी २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
---------------------------------------------------------
महाराष्ट्राचे आबा
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री, माजी गृहमंत्री आर.आर. उर्फ आबा पाटील यांचे कर्करोगाने निधन झाले आणि उभ्या महाराष्ट्राला आश्‍चर्याचा धक्का बसला. गेल्या तीन महिन्यांपूर्वी त्यांना कर्करोगाने गाठले, त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. आता लवकरच आबा बरे होऊन पुन्हा झपाटल्यासारखे कामाला लागतील असे वाटत असतानाच त्यांच्यावर काळाने झडप घातली. आर आर  पाटील म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक स्वच्छ आणि तळागाळातून वर आलेलं व्यक्तिमत्व. आर आर पाटील यांच्या जाण्यानं एक सच्चा कार्यकर्ता हरपला आहे. रावसाहेब रामराव  पाटील उर्फ आर आर पाटील यांना लोक प्रेमाने त्यांना आबा म्हणत. तीच होती त्यांची खरी ओळख. आबा अखेरपर्यंत आबाच राहिले त्यांनी आपला आबासाहेब होऊ दिला नाही हेच त्याचं वेगळेपण होतं. आबांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी नेहमीच कामगार, कष्टकरी, शेतमजूर यांच्या बाजूने राजकारण केले. अर्थातच असे करण्यामागे एक कारण होते ते म्हणजे त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात ही शेतकरी कामगार पक्षातून झाली होती. त्यामुळे त्यांचा विचार करण्याचा दृष्टीकोन हा नेहमीच कामगार, कष्टकर्‍यांच्या हिताचा राहिला. यातूनच त्यांनी सत्तेत असताना नेहमी पुरोगामी निर्णय घेतले. सर्वसामान्यांचे नेते म्हणून नेहमीच त्यांची प्रतिमा होती आणि तीच त्यांनी कायम टिकवली.  जिल्हा परिषद सदस्य ते सहा वेळा आमदार, ग्रामविकास मंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असा सत्तापदांचा प्रवास करुनही आबा शेवटपर्यंत आबाच राहिले. १६ ऑगस्ट १९५७ ला सांगली जिल्हातील तासगाव तालुक्यातील अंजनी गावात जन्मलेल्या आर पाटलांनी कमवा आणि शिका हा मंत्र जपत श्रमदान करत शिक्षण घेतलं. शाळकरी वयातच प्राचार्य पी बी पाटील यांचं मार्गदर्शन आबांना लाभले. पुढे सांगलीतल्याच शांतीनिकेतन महाविद्यालयातून ते बीए झाले. त्यानंतर त्यांनी एलएलबीही केले. गरिब शेतकरी कुटुंबातल्या या होतकरु तरुणाचे नेतृत्वगुण सुरवातीला हेरले ते वसंतदादा पाटलांनी. कोणतीही राजकीय पाश्वभुमी नसतांनाही मनाला भिडणारी भाषणशैली, स्वच्छ प्रतिमा आणि समाजासाठी काही करण्याची जिद्द यांच्या जोरावर आबा पाटलांनी राजकारणात वाटचाल सुरु केली. वसंतदादांबरोबरच यशवंतराव चव्हाण यांचीही प्रेरणा आर आर पाटील यांना होती. आर आर पाटील हे पहिल्यांदा १९७९ साली सावळज मधून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. १९७९ ते १९९० पर्यंत ते  जिल्हा परिषद सदस्य होते. मग १९९० ते २०१४ या काळात ते सतत  विधानसभेवर निवडून आले. तासगाव मतदार संघातून कॉंग्रेस पक्षाच्या तिकिटावर आबा १९९० साली पहिल्यांदा विधान सभेवर निवडून आले. आर आर पाटील हे १९९५ साली कॉंग्रेसच्या तिकिटावर दुसर्‍यांदा आमदार झाले. तेव्हा भाजप-सेनेचं युती सरकार सत्तेत होतं. राजकीय आयुधांचा वापर करत आबांनी त्यावेळी विधानसभा दणादून सोडली आणि सत्ताधारी भाजप-सेनेला कोंडीत पकडले. अभ्यासू आणि स्वच्छ आमदार अशी सार्थ ओळख आबांनी निर्माण केली. नंतर शरद पवारांसोबत आबांनी कॉंग्रेस सोडत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला तो १९९९च्या सुमारास. याच काळात शरद पवार यांचे विश्वासू आणि कट्टर समर्थक अशी आर आर पाटील यांची ओळख निर्माण झाली. आबांनी २००४, २००९ आणि २०१४ ची आमदारकीची निवडणूक अटीतटीनं लढत जिंकली. सुरवातीला तासगाव आणि नंतर कवठेमहांकाळ मतदारसंघाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं. आमदारकीबरोबरच त्यांची मंत्रीपदाची कारकिर्दही गाजली. आर आर पाटील  यांना कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये सुरवातीला ग्रामविकास मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. गाडगे महाराज स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबवून आर आर पाटील यांनी आपली वेगळीच ओळख निर्माण केली. पुढे राज्याचं गृहमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपदही त्यांनी जबाबदारीनं सांभाळलं.  मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्‌यानंतर त्यांच्या काही वक्तव्यांनी वाद झाले आणि आबांना गृहमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपदही सोडावं लागलं. पण आबांची स्वच्छ प्रतिमा कायम राहिली. गृहमंत्री असतांना डान्सबार बंद करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेऊन आबांनी अनेक संसार सावरले. डान्स बार बंद करण्याच्या निर्णयाला विरोधही झाला पण आबा ठाम राहिले. गृहमंत्रीपदाच्या काळात त्यांनी राबवलेलं महात्मा गांधी तंटामुक्त अभियानही अभिनव ठरले. गाडगेबाबा, महात्मा गांधी, यशवंतराव चव्हाण यांच्यापासून प्रेरणा घेत गरीब शेतकरी कुटुंबातले आर आर पाटील सत्तेच्या राजकारणात राहूनही साधेच राहिले. साधेपणा हेच त्याचं वैशिष्ठ होते. याच साधेपणातून ते तळागाळातल्या  कार्यकर्त्यांशी संवाद साधत. सत्ता येते आणि जाते पण सोबत राहतात ती जोडलेली माणसं हे आर आर पाटील यांनी  आपल्या कृतीतून दाखवून दिलं. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाची जबाबदारीही त्यांनी  समर्थपणे सांभाळली. कार्यकर्त्यांशी संवाद साधत पक्ष वाढवला. सत्ता आली की सत्तेची गुर्मीही येते याची अनेक उदाहरणं महाराष्ट्रानं पाहिली. पण आबा यालाही अपवाद ठरले. आबा सत्तेची एक एक पायरी चढत गेले पण त्यांच्यएा कुटुंबानेही आबांप्रमाणेच आपला साधेपणा टिकवून ठेवला. पत्नी सुमन, मुलगा रोहित आणि मुलगी स्मिता, आई भागिरथी यांनी वागण्या-बोलण्यात सत्तेचा दर्प येऊ दिला नाही. आबांचे एक भाऊ सुरेश हे गावाकडे शेती बघतात. तर दुसरे भाऊ राजाराम पोलीस दलात आहेत. आबा गृहमंत्री असतांना आबांचे भाऊ राजाराम पाटील पोलीस दलात कुठलाही बडेजाव न करता सेवा बजावत होते. हे कुटुंब आबांप्रमाणेच साधचं राहिलं हे विशेष. एक वेगळा राजकारणी... महाराष्ट्राला या राजकारण्याकडून मोठी अपेक्षा होती. समाजासाठी अजून खूप काही करण्यापूर्वीच मृत्यूनं आर आर पाटील यांना गाठलं आणि एका समंजस नेतृत्वाचा अकाली अस्त झाला...
------------------------------------------------------------------------


0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel