-->
संपादकीय पान--अग्रलेख--२ नोव्हेंबर२०१३च्या अंकासाठी--
--------------------------
भविष्यवेधी उष:कालाची आशा
------------------------------------
दिवाळी म्हणजे आशा, आकांक्षा वृध्दींगत करणारा दिव्यांचा, प्रकाशाचा सण. आपल्या मनात असलेले दुख:, निराशा क्षणभर विसरुन आपण हा सण साजरा करतो. यामागे भावना असते ती आगामी चांगल्या भविष्यवेधी कालखंडाची, उष:कालाची. असा हा सण साजरा करीत असताना आपल्या मनात नेहमी आनंदच असतो. शेतकरी खुषीत असतो कारण या काळातच पीक चांगलेच बहरुन आलेले असते. कष्टकर्‍यांच्या कष्टाचे चीज झालेले असते. कामगार आपल्या वर्षाची पुंजी एकत्र करुन नवीन वस्तू खरेदी करतो, भविष्याची तरतुद करण्यासाठी सोन्याची खरेदी करतो. अशा प्रकारे दिवाळीत आपण आनंदाचे क्षण जगत असताना वर्षात आलेल्या कडू आठवणी विसरता येत नाहीत. अगदी याबाबतचे ताजे उदाहरण द्यायचे झाल्यास उत्तरप्रदेशातील मुझफ्परनगरमध्ये झालेल्या दंगली. यातून अनेकांचे जीवन उध्दवस्त झाले आहे. त्याअगोदर अडीच-तीन महिन्यांपूर्वी उत्तराखंडमध्ये पावसाने थैमान घातले, गावेच्या गावे वाहून गेली. लोकांची मने आणि डोळे या हाहाकाराने थिजली, भावनाहीन झाली. मदतीचा ओघ सा-या देशातून येत होता; पण खरंच तेवढी मदत तिथपर्यंत पोहोचत असेल का? त्यांच्याकडे ना अन्न शिजवायला भांडी राहिली ना अंगावर घालायला दुसरा कपडा, ना झोपायला जागा. समाज जागृत होऊन मदत करत होता, पण आकाशच फाटलेय तिथे ठिगळ किती ठिकाणी लावणार? उदरनिर्वाहाचे साधनच गेलेल्या त्या लोकांचे उघड्यावर पडलेले जीवन आणि उघड्यावर पडलेले संसार जिथे फोडणीला तेल नाही, चूल पेटवायला रॉकेल नाही, तिथे दिव्यात घालायला तेल येणार तरी कुठून! संसाराची विस्कटलेली घडी बसवायला किती दिवस जातील कुणास ठाऊक! त्यांच्याकडेदेखील छोटी मुले असतीलच. आपल्याला हा आनंद उपभोगता येत नाही म्हणून काही अश्रू ढाळतील. काही कामाला लागतील. कशी बरं करतील साजरी या वर्षाची दिवाळी? विदर्भातील शेतक-यांच्या आत्महत्येने त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले. आपल्या पश्चात कुटुंबाचे काय हाल होतील याचा जराही विचार न करता धडाधड मृत्यूला कवटाळणा-या त्या शेतक-यांच्या घरात या दिवाळीत किती पणत्या पेटतील? आणि पेटल्या तरी त्यांना लगेचच लक्ष्मी प्रसन्न होईल? कशी होईल त्यांच्या घरची दिवाळी? दिवाळीच्या स्वागतासाठी आकाशाच्या दिशेने दिवा सोडताना आपण तो नेमका कोणासाठी लावत आहोत? याची जाणीव आपल्याला राहिली आहे का? जिथे आधीच प्रकाशाचे साम्राज्य आहे, तिथे आणखी झगमगाट करण्यात काय अर्थ आहे? मग अंधार नेमका आहे कुठे? नसेल तर दिवा लावायचाच कशासाठी? किंबहुना अंधार कोठे आहे याचा विचार करण्याइतकीही वेळ आपल्याकडे राहिलेला नाही किंवा जाणीवपूर्वक त्याचा विचार आपल्याला करायचा नाही. ही वस्तुस्थिती आहे. दिवाळीच्या या प्रकाशात अंधाराची चर्चा कशाला? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. मुंबईसारख्या महानगरात तर सतत आकाशदिव्यांचा झगमगाट असतो, पण दिवाळीच्या दिवसांत सर्वत्र आकाशदिव्यांच्या रांगा उजळल्या असतानाच लालबत्तीच्या भेसूर प्रकाशाआड ओथंबलेल्या अश्रूंचा ओलावा कधी कोणाला जाणवतो? त्या जव्हार मोखाड्याच्या पाड्यांवर कुपोषणाचे संकट कायम असते. तिथल्या निष्पाप जीवांना प्रकाशाचा खरा अर्थ सांगण्याची हीच वेळ आहे. असे आपल्याला कधीच कसे वाटत नाही? राजाला रोजच दिवाळी असते आणि दीनदुबळ्यांसाठी रोजच शिमगा असतो त्यांच्या वाट्याला वर्षातून किमान एक दिवस प्रकाशाचा किरण पसरावा यासाठी आपल्या संवेदना कधीच कशा हेलावत नाही?
एका टोकाला चंगळवादाचा कळस गाठला जात असतो. दुसरीकडे याकडे अचंबित आणि हतबलपणे पाहणारे गरीब, अश्राप जीव दिसत असतात. शेजारच्या अंधाराचे भान आपल्याला नसते. एखाद्या घरात जन्माला आलेला जीव कोडकौतुक, अभ्यंगस्नान करीत असतो, पण   येरवड्यातील बालग्रामममध्ये वेगवेगळ्या कारणाने वस्तीला असलेल्या निराधार मुलांना लाडू, करंजी मिळते, पण पालकांचे कौतुक त्यांच्या वाटाला कोठे येते? या दीपावलीत लक्ष दिव्यांच्या ज्योतीचे तेज उधळीत दीपावलीचे आगमन व्हावे आणि सृष्टीलाच चैतन्याचे स्वप्न पडावे, अवघ्या भूतलावर आनंदाच्या रंगाचीच बरसात व्हावी, त्याप्रमाणे मनामनाचे कोपरे या आनंदसरींनी न्हाऊन निघावे. दैनंदिन व्यापातापांचा क्षणभर विसर पडून मांगल्याच्या पदकमलांनी अंत:करण निर्मल व्हावे. कोणा दु:खितांच्या काळजावर या आनंदाची फुंकर मारावी. दुभंगलेली मने सांधण्यासाठी दिवाळीच्या महाउत्सवाचे सुंदर निमित्त व्हावे आणि खरच ही दिवाळीसुद्धा वर्षातील तीनशे पासष्ट दिवस सुख-दु:खाच्या पाठशिवणीचा आणि थंडी, वारा, ऊन, पाऊस, प्रतिकूलता या सगळ्याचा सामना केल्यानंतरच येते कारण दिवाळी प्रत्येकाचा मनातील आशादीप चिरकाल प्रकाशमान करण्यासाठी येते. अशा प्रकारे एकीकडे अंधार असताना या जगात काही प्रकाशमान बाबीही घडत असतात. यातील उत्तम उदाहरण द्यायचे झाल्यास रायगड जिल्ह्यातील अलीबाग तालुक्यातील होंडावाडी या आदीवासी वस्तीवर आलेली लाईट. उभ्या आयुष्यात त्यांनी या वस्तीत कधी लाईट पाहिली नव्हती. पार जंगलात असलेल्या या वस्तीत कधी लाईट पोहोचेल असे त्यांना वाटलेही नव्हते. परंतु यंदाची त्यांची दिवाळी ही झगमगाटात झाली आहे. या वस्तीवरील प्रत्येकाचे आयुष्य प्रकाशमान झाले आहे. असा प्रकाश प्रत्येकाच्या आयुष्यात येऊदेत हीच दिवाळीच्या निमित्ताने आशा व अपेक्षा.
----------------------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel