-->
संपादकीय पान गुरुवार दि. १८ डिसेंबर २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------
मानवतेला कलंक
विविध संस्कृती व विचार प्रवाहांचा संगम असलेल्या तसेच भगवान गौतम बुध्दांनी जिकडे वास्तव्य केले त्या पेशावरमध्ये काल तालिबान्यांनी हिंसाचार केला ही घटना म्हणजे मानवतेला कलंक आहे. खुदाई खिदमतगारांची अहिंसा चळवळ ज्या पेशावरमध्ये जन्माला आली त्याच शहरात धर्ममार्तंडांनी हिंसाचार करुन शंभराहून जास्त कोवळ्या जीवांना कंठस्नान घातले ते पाहता जगाची मान शरमेने खाली झुकली. धर्मव्देषाचे भूत व कट्टरपंथीयांचा उन्माद एकदा का कुणाच्या डोक्यात स्वार झाला की तो बेभान होऊन कोणत्याही थराला जातो हे आपल्याला पाकिस्तानातील या घटनेने दाखवून दिले आहे. ज्या पाकिस्तानने तालिबान्यंाना आश्रय दिला, अफगाणिस्तानच्या माध्यमातून रशियाचा बदला घेण्यासाठी ही शक्ती पोसली आता तीच शक्ती त्यांच्या विरोधात उभी ठाकली आहे. वर्षानुवर्षे द्वेषाचे धर्मकारण व राजकारण केले की काय वाट्याला येते याचा अनुभव सध्या अनेक देश घेत आहेत. दोन दिवस अगोदरच ऑस्ट्रेलियाने असाच प्रकार अनुभवला. ऑस्ट्रेलियातील अतिरेक्यांची तयारी तालिबान्यांइतकी नव्हती म्हणून तेथील ओलीस बचावले. पण कट्टरता दोन्हीकडे सारखीच होती. पाकिस्तानने तर गेली कित्येक वर्षे कट्टर धर्मांधतेला आपलेसे केले आहे. अफगाणिस्तानात रशियाविरुद्ध लढण्यासाठी अमेरिकेने अफगाण तालिबान्यांना पोसले. तालिबान्यांनी भारताचे विमान पळवले तेव्हा अमेरिकेने बोटचेपी भूमिका घेतली होती. अमेरिकेचा पैसा व शस्त्रे वापरून पाकिस्तानने तालिबानी घडवले आणि त्यांचा भारताविरुद्ध वापर सुरू केला. पुढे हे अस्त्र अमेरिकेवरच उलटले आणि बुश यांना अफगाणिस्तानवर हल्ला करावा लागला. तेथील तालिबान सरकारचा पराभव झाला असला तरी त्यांना हुसकावून लावणे अमेरिकेला जमले नाही. पाकिस्तानने ते होऊही दिले नाही. कारण भारताविरुद्ध पाकला हेच अस्त्र वापरायचे होते. अफगाणिस्तानात लोकशाहीच्या माध्यमातून खरे जनतेचे प्रतिनिधत्व करणारी राजवट आणणे अमेरिकेला जमले नाही व ओबामा यांनी तेथून सैन्य काढून घेण्यास सुरुवात केली. त्याबरोबर पुन्हा तालिबान्यांनी डोके वर काढले. पाकची त्याला फूस होती. दहशतवादाचे हे अस्त्र पाकिस्तानवर यापूर्वी अनेक वेळा उलटले आहे, पण तेथील राज्यकर्ते शहाणे होण्यास तयार नाहीत. पाकिस्तानची जडण घडणच धर्मावर आधारित झाली असल्याने अन्यधर्मीय राष्ट्रांशी मोकळ्या परस्परसंबंधांचा पाकला तिटकारा आहे आणि भारताप्रमाणे प्रगतिशील नेतृत्व व विचारधारा, लोकशाही तेथे कधीच रुजली नाही. जपान, जर्मनीसारखी राष्ट्रे अमेरिकी पैशावर मोठी झाली, पाकिस्तानला तसे का जमले नाही याचे उत्तर त्या राष्ट्राच्या संस्कारामध्ये आहे. यामुळे आजही तेथे कोवळी मुले बळी पडली असली तरी परिस्थिती फारशी बदलणार नाही.उलट परिस्थती आणखीनच विदारक होत जाणार आहे. इम्रान खानसारख्या नेत्याने तर निषेध व्यक्त करताना तालिबानचे नाव घेण्याचेही टाळले. लष्करी तळावर थेट हल्ला करण्यापेक्षा शाळेवर भेकड हल्ला करून पाकिस्तानी लष्कराला इंगा दाखवण्याचा डाव तालिबानी खेळले. यामुळे पाक लष्कराचे डोळे उघडून तेथे दहशतवादाविरुद्ध मोहीम सुरू होईल असे समजणे भाबडेपणाचे ठरेल. मानवी जीवनाची किंमतच जेथे शून्य आहे तेथे असे कितीही हल्ले झाले तरी राज्यकर्ते फारसे बदलत नाहीत. समाजात थोड्या लाटा उठल्या तरी त्या लवकरच विरून जातात व पुन्हा एकदा जगात, विशेषत: भारतात, दहशतवाद फोफावण्याचा विडा उचलणारे नवे तरुण घडवले जातात.पाकिस्तानचे हे वास्तव लक्षात घेऊन भारताला वाटचाल करावी लागणार आहे. लष्कराला अद्ययावत करणे ही त्यातली पहिली पायरी. यापूर्वीच्या राजवटीत सर्वाधिक दुर्लक्षित क्षेत्र लष्कराचे राहिले व पाकिस्तानही आपल्याप्रमाणेच दहशतवादाचा बळी ठरत असल्याचा कळवळा मनमोहनसिंग घेत राहिले. आता मात्र नरेंद्र मोदींची कसोटी ठरणार आहे. महत्त्वाची बाब आहे ती अंतर्गत सुरक्षा, म्हणजेच पोलिस यंत्रणा, अतिशय सक्षम व कर्तव्यदक्ष करण्याची. इसिस या धोकादायक संघटनेची पाळेमुळे भारतात वेगाने पसरत आहेत व सिमीप्रमाणे या संघटनेचे अनेक सिक्रेट सेल्स गावोगाव तयार होतील. त्यांना रोखण्यासाठी गुप्तचर यंत्रणेवर खर्च करून अद्ययावत तंत्रज्ञानाची जोड द्यावी लागेल. मुंबईवरील हल्ल्यासाठी आपण पाकिस्तानला जबाबदार धरू शकलो ते अमेरिकेने पुरवलेल्या तंत्रज्ञानामुळे. त्याचबरोबर दहशतवादाला धार्मिक रंग देऊन त्याचे राजकारण करण्याचा घातक खेळ सर्व पक्षांनी थांबवला पाहिजे. मोदी यांच्या विजयामुळे अस्वस्थ झालेल्या राजकारणी व बुद्धिमंतांबरोबर हिंदुत्ववादीही हा खेळ खेळत आहेत. मोदींनी त्यांना वेसण घातली पाहिजे. तंत्रज्ञानातील अद्ययावतता व अखंड सावधता याच दोन शस्त्रांनी दहशतवादाशी लढता येऊ शकते ही मन की बात मोदींनी देशाला समजावण्याची गरज आहे. तालिबान्यांना भस्मासूर हा पाकिस्तानने पोसला मात्र आता तो त्यांच्याच बोकांडी बसला आहे. हा हिंसाचार भविष्यात पाकिस्तानचे तुकडेही पाडू शकतो. परंतु पाकिस्तानचे तुकडे पडणे म्हणजे काही भाग तालिबान्यांच्या ताब्यात जाणे. अर्थातच हे भारताला परवडणारे नाही. कारण असे झाल्यास तालिबानी भारताच्या आणखी जवळ येणार आहेत. पेशावरपासून दिल्ली केवळ ८०० कि.मी. अंतरावर आहे. त्यामुळे भारत सरकारने यापासून बोध घेऊन आपल्या देशात सुरक्षा व्यवस्था कडक करण्याची आवश्यकता आहे. आपल्याकडे सहा वर्षापूर्वी पाक अतिरेक्यांचा हल्ला झाला त्यानंतर देशातील सुरक्षा व्यवस्था वाढविण्याच्या केवळ गप्पा झाल्या. मात्र प्रत्यक्षात काहीच उतरले नाही. सध्या जगाला अतिरेकी कारवायांनी त्रस्त केले आहे आणि अशा घटना होणारच असे गृहीत धरुन आता आपण त्यावर उपाययोजना केली पाहिजे. धर्मांधशक्ती आता कोणत्याही थराला जाऊन हल्ला करु शकतील, हे पेशावरमधील हल्याने जगाला दाखवून दिले आहे.
-------------------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel