-->
संपादकीय पान मंगळवार दि. ६ मे २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
-------------------------------------
जुनाट विचार व पंरपरेतून आपण बाहेर कधी येणार?
---------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा गावात एका दलित तरुणाची हाल हाल करून अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची संतापजनक घटना पुढे आली आहे. यासंबंधीत आरोपींना पकडण्यात आले असले तरी अशा घटना घडतातच कशा हा खरा आपल्या प्रगत समाजापुढील प्रश्‍न आहे. काळाच्या ओघात बदलत्या अर्थकारणाच्या रेट्यामुळे समाज बदलल्याचे वरवर दिसत असले तरी आजही जन्माने मिळणा-या खोट्या श्रेष्ठत्वाच्या खुळचट कल्पनांचा पीळ किती पक्का आहे, यासंबंधीचे वास्तव पुन्हा एकदा पुढे आले आहे. अनेकांच्या मनातील जात अजून गेलेली नाही, अशा शेकडो घटना देशात घडतात. पुरोगामी म्हणवणारा महाराष्ट्रही त्याला अपवाद नाही, हे खर्डा येथील घटनेने पुन्हा दाखवून दिले आहे. हजारो वर्षे जातिव्यवस्थेचे फायदे उपभोगणार्‍या उच्च वर्गाचे श्रेष्ठत्व पूर्णपणे पोकळ असल्याचे महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि समतेच्या शोधातील अनेक समाजसुधारकांनी त्यांच्या लेखनातून, कृतीतून दाखवून दिले. पण त्या वर्गातील अनेकांना ते मान्य झाले नाही. स्वातंत्र्य मिळाल्यावर शिक्षणाचा प्रसार वेगाने झाला. सगळ्या जातींमधील लोक शिकू लागले, प्रगती करू लागले. आपण उच्च जातीतील आहोत आणि म्हणून श्रेष्ठ आहोत, असे या उच्च जातीतील वर्गाचे म्हणणे असते. उच्च जातीत जन्म घेण्यात आपले काही कर्तृत्व नाही आणि ते असे कोणाच्या हातातही नाही. काही दिवसांपूर्वी नगर जिल्ह्यातच मेहतर समाजातील तिघांचा अशाच मानसिकतेतून खून करण्यात आला होता. खर्ड्यातील घटनेत अमानुष मारहाणीमुळे मरण पावलेला नितीन आगे हा केवळ सतरा वर्षांचा होता. त्याचा दोष एवढाच, की त्याने कथित वरच्या जातीतील मुलीवर प्रेम केले. हा काही गुन्हा नव्हे. पण गढी, वाडे केव्हाच जमीनदोस्त झाले तरी त्याच मानसिकतेत वावरणा-यांना हा गुन्हा वाटतो. त्यामुळेच त्यांनी स्वत:च कायदा हातात घेऊन नितीनला संपवले. सकाळी साडेसात वाजल्यापासून दुपारी साडेतीन वाजेपर्यंत नितीनला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन मारहाण करण्यात येत होती. तरीही गावातील कुणालाही हस्तक्षेप करून नितीनचा जीव वाचवावा, असे वाटले नाही. गावात पोलिस चौकी आहे. पोलिसांनाही या अमानुष मारहाणीची खबर लागली नाही, हे मान्य होण्यासारखे नाही. या सगळ्यांमध्ये कुणीही हस्तक्षेप न करण्यामागे दोन कारणे आहेत. पहिले म्हणजे, यांना असाच धडा शिकवला पाहिजे, अशी सुप्त भावना काहींच्या मनात असते, त्या भावनेने त्यांना अडवले आणि दुसरे कारण म्हणजे, या वर्गाची प्रचंड दहशत. त्यामुळे गावात राहायचे तर कशाला उगाच वैर ओढवून घ्या, अशी सर्वसामान्यांची भावना असते. मुळात नितीनने काही गुन्हा केला असेल तर त्याला न्यायव्यवस्थेसमोर उभा करण्याचा पर्याय होता. पण आम्हीच आमचे राजे आणि आमचीच न्यायव्यवस्था अशा गुर्मीत वावरणारे इथला कायदा आणि व्यवस्थेला जुमानत नाहीत. अशा घटना घडल्या की संतापाची लाट निर्माण होते. घटनेचा निषेध करण्यात येतो. मोर्चे निघतात. दलित, आदिवासी, मागासवर्गीय यांच्या हक्कांचे आणि अधिकारांचे रक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते सरकार आणि शासनव्यवस्था या घटनेकडे कशी पाहते, हे फार महत्त्वाचे आहे. दुर्बलांना आधार वाटणारी आणि गुंडापुंडांना त्यांची जागा दाखवणारी व्यवस्था निर्माण करणे, हे तिचे काम आहे. मात्र आज दुर्बलांना वाली नाही आणि गुंड मोकाटपणे दहशत पसरवतात, असे चित्र पाहायला मिळते. समाजाचा कायदा आणि सुव्यवस्थेवर विश्वास नाही. असे होते तेव्हाच कायदा हातात घेण्याची हिंमत केली जाते. आपली प्रगती जरुर झाली. मात्र आपण अजूनही अनेक जुनाट विचार व परंपरेच्या जोखडातून काही मुक्त होत नाही ही एक मोठी शोकांतिकाच आहे. आपले पुोरगामित्व हे फक्त कागदावरच शिल्लक राहिले आहे.
----------------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel