-->
संपादकीय पान शनिवार दि. २५ जानेवारी २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
---------------------------------------
पालकमंत्र्यांचा बोगस धंदा
------------------------------------
रायगडचे पालकमंत्री व जलसंपदामंत्री सुनिल तटकरे यांच्या भोवतीचा चौकशीचा फास आता आवळत चालला आहे. त्यांनी स्थापन केलेल्या बोगस कंपन्यांची चौकशी अखेर केंद्र सरकारच्या कंपनी मंत्रालयाने सुरु केली आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी सुनिल तटकरे यांच्या बोगस कंपन्यांविरुध्द कंपनी मंत्रालयाकडे पुराव्यांसह तक्रार केली होती. या तक्रारींचा सखोल अभ्यास केल्यानंतर हे पुरावे खरे असल्याचे आढळल्याने याची चौकशी करीत असल्याचे कंपनी मंत्रालय, रजिस्ट्रार ऑफ कंपनीज यांनी सोमय्या यांना कळविले आहे. तटकरे कुटुंबातील अनिकेत तटकरे, वेदांती, अदिती, किरण सारंगे, मनोज सारंगे यांनी एकूण ३४ कंपन्या स्थापन केल्या होत्या. या कंपन्यांच्या माध्यमातूनच बेनामी व्यवहार व मनी लॉँडरींगची कामे केली. किरण सारंगे या घरी काम करणार्‍या माळ्याच्या नावावर नऊ कंपन्या आहेत. या बोगस कंपन्यांच्या माध्यमातूनच तटकरे यांनी जमीनीचे बेकायदेशीर व्यवहार करुन करोडो रुपयांची कमविलेली माया गुंतविली. जलसंपदामंत्रीपदाचा लाभ घेेत तेथील पैसा हा या कंपन्यांत गुंतविला. सिंचन घोटाळ्यातील करोडो रुपयांची रक्कम अशा प्रकारे गुंतविण्यात आली किंवा ते पैसे येथे फिरविण्यात आले. सिंचन घोटाळ्यातही सुनिल तटकरे अशाच प्रकारे चौकशीच्या फेर्‍यात अडकत जात आहे. तीन महिन्यांपूर्वी सिंचन घोटाळ्यांचा १४ हजार पानी दस्ताऐवज भाजपाच्या वतीने माधवराव चितळे समितीला औरंगाबादमध्ये मोठ्या नाट्यमयरित्या म्हणजे बैलगाडीत भरुन सादर करण्यात आला होता. हे पुरावे म्हणजे जलसंपदामंत्री सुनिल तटकले व अजितदादा यांच्या विरोधातला भ्रष्टाचाराचा एक मोठा दस्ताऐवज ठरावा. भाजपा नेते विनोद तावडे व देवेंद्र फडवणीस हे सिंचन घोटाळ्यातील पापाचा पाढा नेहमीच वाचत असतात. जलसंपदा विभागाच्या या भ्रष्टाचारास २००० सालापासून सुरुवात झाली. कृष्णा खोरे पाटबंधारे प्रकल्पातील बरीचशी कामे विनानिविदा जोडप्रस्तावाव्दारे देण्यात आली. २०००ते २००६ या काळातील जोडप्रस्तावाव्दारे दिलेली हजारो कोटींच्या कामाची यादी यात पुरावे म्हणून सादर करण्यात आली आहे. गोदावरी बॅरेजेस, कोंढाणे प्रकल्प, बेंबळा प्रकल्प, कुकडी प्रकल्प यात विविध प्रकारे झालेल्या भ्रष्टाचाराची प्रकरणे यात आहेत. यातील प्रकल्पाचे सर्व्हेक्षण, प्रकल्प चित्र, मूळ अंदाजपत्रक कसे वाढवित नेण्यात आले, जोडकामे कशी प्रदान करण्यात आली, निकृष्ट दर्जा झाल्याने प्रकल्पाचा खर्च कसा वाढत गेला, अनेक ठिकाणी हा खर्च चौपटीहून जास्त कसा झाला हे सर्व पुराव्यानिशी ठेवण्यात आले आहे. ऐन निवडणुकीच्या वेळी सुमारे ३४ हजार कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देऊ पैसे कसे उकळण्यात आले आणि जनतेच्या पैशाची कशी लूट करण्यात आली याचे पुरावे दाखल करण्यात आले आहेत. अर्थात यापूर्वी अनेकदा असे पुरावे विरोधकांनी वेळोवेळी सादर करुनही तटकरे काही राजीनामा देण्यास तयार नाहीत. आता तर त्यांच्या कंपन्यांची चौकशी सुरु झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने वाभाडे काढल्यानंतरही राज्याचे जलसंपदामंत्री सुनील तटकरे मंत्रीपदाच्या खुर्चीवरुन हटण्यास तयार नाहीत. ही बाब केवळ रायगड जिल्ह्यालाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला लाजिरवाणी आहे. तटकरे हे मंत्रीपदावर असल्यानेच या गंभीर प्रकरणाची योग्य ती चौकशी करण्यात संबंधित तपास यंत्रणा असमर्थ ठरत आहेत. शिवाय तटकरेंना क्लीनचिट देण्याचा प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत तपास यंत्रणांनी केलेल्या तपासात त्रुटी असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आल्यानेच न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तटकरेंकडे एवढा पैसा आला कुठून? असा सवाल खुद्द न्यायालयाने विचारला होता. अशा प्रकारे न्यायालय संताप व्यक्त करत असतानाही जलसंपदामंत्री सुनील तटकरे आपल्या मंत्रीपदाला चिटकून बसले आहेत.  तपास यंत्रणा योग्य तो तपास करत नाहीत? याचे एकमेव कारण म्हणजे सुनील तटकरे हे सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मंत्री आहेत. तटकरे मंत्रीपदाचा वापर करुन तपास यंत्रणांवर दबाव आणत आहेत का? तपास यंत्रणा मंत्र्यांच्या कुटुंबियांविरुद्ध तपास करण्यात टाळाटाळ करत आहेत का? असे गंभीर प्रश्‍न आज उपस्थित झाले आहेत. सध्या सत्ता असल्याने या मंत्र्यांना व लोकप्रतिनिधींना संरक्षण कवच मिळाले आहे. परंतु आम जनता यांच्या कारभाराला व भ्रष्टाचाराला कंटाळली आहे. आणि त्याचे पडसाद आगामी निवडणूकीत निश्‍चितच उमटतील. जनता या भ्रष्टाचार्‍यांना घरी बसविल्याशिवाय राहाणार नाही. एकदा का यांचे सत्तेचे कवच गेले की या महाराष्ट्रातील तटकरेरुपी लालूला जेलची हवा खावी लागणार आहे हे नक्की. लालूप्रसाद यादव यांना तब्बल १७ वर्षानंतर जेलची हवा खावी लागली. त्यामुळे आपल्याकडे कायदा आपले काम उशीरा करतो हे मान्य. परंतु पापाचा घडा भरला की मग ती व्यक्ती कोणही असो किंवा मंत्री असो, चुकीच्या कामाची शिक्षा ही भोगावीच लागते. तटकरेंच्या भ्रष्टाचाराविरुध्द न्यायालयात सुरु असलेली लढाई व आता बोगस कंपन्यांची सुरु झालेली चौकशी हे पाहता तटकरेंचा पापाचा घडा आता भरत आला आहे हे उघड आहे. उद्योग-व्यवसाय करण्यात काहीही चुकीचे नाही. परंतु सरकारी निधीचा गैरवापर करुन आपल्या तुंबड्या भरणे हा धंदा चुकीचा आहे. तटकरेंनी नेमके हेच केले आहे आणि त्याची फळे त्यांना भोगावी लागणार आहेत.
----------------------------------
   

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel