-->
एस.एम.एस.चा मंत्र

एस.एम.एस.चा मंत्र


 

राज्यासह देशातील कोरोना काही नियंत्रणात येण्याची नजिकच्या काळात तरी शक्यता वाटत नाही. जागतिक पातळीवरील विचार करता भारताचा आता कोरोना  रुग्णांच्या यादीत दुसरा क्रमांक लागला आहे. शनिवारी आपल्याकडे एकाच दिवशी तब्बल 90 हजार रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे आपल्याकडील चिंता आता आणखीनच वाढली आहे. गेल्या दहा दिवसात आपल्याकडे दहा लाख रुग्ण वाढले आहेत. कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या आता 70 हजारांवर पोहोचली आहे. जगात आता आपण ब्राझिलला मागे टाकून अमेरिकेच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलो आहोत. आपल्याकडील देशपातळीवरील रुग्णसंख्या आता 41 लाखांवर पोहोचली आहे. दररोज त्यात सरासरी 90 हजारांची भर पडत आहे. अमेरिकेतील एकूण रुग्णसंख्या 64 लाखांवर पोहोचली आहे. सध्या आपल्याकडील रुग्णवाढीचा वेग पाहता आपण अमेरिकेलाही मागे टाकू की काय अशी भीती वाटू लागली आहे. प्रत्येक शहरात सामूहिक प्रतिकारशक्ती जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत आपल्याला दिलासा मिळण्याची चिन्हे दिसत नाही किंवा कोरोनावरील प्रभावी लस तरी बाजारात आली पाहिजे. या दोन्ही बाबी नजिकच्या काळात काही शक्य असल्याचे दिसत नसल्याने आपल्याला आता कोरोनासह जगायचे आहे अशी खूणगाठ बांधूनच आपली पुढील वाटचाल करावयाची आहे. लॉकडाऊन हा त्यावरील शंभर टक्के उपाय नाही हे आता सिध्द झाले आहे. मात्र लॉकडाऊनमुळे तुमच्या हातात काही काळ मिळतो व त्यात तुम्ही रुग्णसेवेच्या सुविधा उपलब्ध करु शकता. संपूर्ण जग आता कोरोनाने त्रस्त आहे, त्यामुळे आपण त्याला अपवाद ठरु शकत नाही हे जरी खरे असले तरीही आपल्याकडे डिसेंबर महिन्यातच परदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला क्वारंटाईन केले असते तर आपण सध्याचे एवढे वाईट दिवस पाहिले नसते, हे देखील खरेच आहे. परंतु केंद्र सरकार आपले अपयश आता दडवित आहे. त्यामुळे आपल्याला प्रभावी लस बाजारात येईपर्यंत कोरोनासह जगायचे आहे. मग हा काळ सहा महिन्याचा असेल किंवा एक वर्षाहून जास्त काळ असेल. सध्याच्या या परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सर्वांना एस.एम.एस.चा मूलमंत्र दिला आहे. तो अत्यंत प्रभावी आहे. सध्या हा मूलमंत्र जपण्याशिवाय आपल्याकडे अन्य कोणताही मार्ग नाही. एस.एम.एस. हा शॉर्टफॉर्म आहे. एस.- म्हणजे सोशल डिस्टंसिंग, एम.- म्हणजे मास्कचा वापर, एस.- म्हणजे सॅनिटाईज्ड हँड. या तीन बाबी कडकरित्या पाळत आपल्याला आपला जीवनक्रम सुरु करावा लागणार आहे. आपल्याकडे ज्यांचे हातावर पोट आहे त्यांनी आपला जीवनक्रम सुरुच केला आहे, परंतु त्यांनी हा एस.एम.एस.चा संदेश लक्षात ठेऊन काम केले पाहिजे. आपल्याला आता कोरोनासह जगायचे आहे हे लक्षात घेऊनच आपला जीवनक्रम आखावा लागणार आहे. आरोग्यमंत्र्यांचा हा संदेश अत्यंत मोलाचा आहे. परंतु त्याचबरोबर आरोग्यमंत्र्यांनी काही खास बाबी लक्षात घेऊन काम करायचे आहे. त्यांनी जे मध्यंतरी विधान केले होते की, देशातील श्रीमंत व्यक्तींनी आपल्याकडे असलेल्या पैशाच्या जोरावर अक्सिजन बेड बुक करुन ठेवले आहेत. अशी जी रुग्णालय आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे. आज अनेक डॉक्टर्स व आरोग्यसेवक जीवाची बाजी लावून काम करीत आहेत. परंतु त्यातील काही मोजके डॉक्टर्स हे रुग्णसेवेला काळीमा फासणारे काम करीत आहेत. काही डॉक्टर्स सध्याच्या परिस्थितीचा फायदा उकळत रुग्णांकडून जे पैसे उकळत आहोत त्यांच्यावर कडक करावाई राज्य शासनाने करण्याची आवश्यकता आहे. आपण आजवर आरोग्य सेवेकडे लक्ष पुरविलेले नाही. ही सर्वपक्षींयांची चूक आहे. कारण गेल्या सत्तर वर्षात सर्व पक्ष सत्तेत येऊन गेले आहेत. मात्र आता तरी आपल्याकडे प्रत्येकाला परवडेल अशी आरोग्य सेवा उभारण्याची गरज आहे. कोरोनाने हा सर्वांना मोठा धडा दिला आहे. मात्र त्यातून आपण सुधारणार का हा सवाल आहे. मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरातील जनजीवन ठप्प झाल्याने अनेक आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. आता एका संशोधनानुसार, मुंबईकरांमध्ये डिसेंबर-जानेवारी पर्यंत सामूहिक प्रतिकारशक्ती येऊ शकते असा अंदाज आहे. मुंबईतील 75 झोपडपट्टीवासियांची, 50 टक्के अन्य घरात राहाणाऱ्यांची सामुहिक प्रतिकारशक्ती वाढत जाईल व मुंबईतील सामुहिक प्रतिकारशक्ती वाढल्याने कोरोना नियंत्रणात येऊ शकतो असा अंदाज आहे. तसे झाल्यास मुंबईतील रुग्णसंख्या आटोक्यात येईल. आता हे सर्व अंदाज बांधत जानेवारी महिन्यात शाळा सुरु करण्याचे ठरविले जात आहे. विविध कार्यालये सध्या 30 टक्के, पुढील महिन्यात 50 टक्के व ऑक्टोबरपासून संपूर्ण क्षमतेने सुरु करण्याचे ठरविले जात आहे. मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखली गेलेली लोकल ट्रेन बहुदा येत्या महिन्यात सुरु होण्याची आशा आहे. त्यासाठी विविध उपाययोजना केल्या जाण्याची शक्यता आहे. त्यात कार्यालयीन कामाकाजांची वेळ बदलणे हा एक उपाय आहे. मुंबईतील लोकल्समधील जी गर्दी असते ती कायम राहिल्यास कोरोनाचा फैलाव तुफान होईल व देशात भयानक स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे लोकल्स व इतर ट्रेन्स सुरु केल्या तरी त्यात गर्दी कशी नसेल हे सरकारला पहावे लागणार आहे. अर्थात ही सोपी बाब नाही. परंतु लोकल्स सुरु झाल्याशिवाय मुंबईचे जीवनमान सुरुच होणार नाही. त्यासाठी लोकांमध्ये जागृती होण्याची गरज आहे. आरोग्यमंत्र्यांनी सुचविल्याप्रमाणे एस.एम.एस.चा मूलमंत्र जपावाच लागेल. त्याशिवाय काही तरणोपाय नाही.    

 

0 Response to "एस.एम.एस.चा मंत्र"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel