-->
७५ वर्षानंतर...

७५ वर्षानंतर...

दि. 14 ऑगस्टच्या मोहोरसाठी चिंतन
७५ वर्षानंतर... स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्‍वभूमीवर देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुंनी तब्बल ७५ वर्षापूर्वी देशाला संबोधिले होते. स्वातंत्र्याची पहिली पहाट उजाडताना आपली गाठ नियतीशी आहे, असे पंडितजी म्हणाले होते. आजही ७५ वर्षानंतर त्यांचे वाक्य आपल्याला पटते आहे. दिडशे वर्षाच्या ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून आपण 15 ऑगस्ट 1947 रोजी मुक्त झालो. आज मागे वळून पाहत असताना आपण अनेक आघाडीवर चांगली कामगिरी केली आहे, हे काही अमान्य करता येत नाही. मात्र याहून आपण चांगली कामगिरी करु शकलो असतो याचीही खंत आपल्याला आहेच. पंडित नेहरुंनी स्वातंत्र्यानंतरच्या आपल्या पहिल्या भाषणात देशाला लोकशाही, प्रजासत्ताक, समाजवादी, जपणारे राष्ट्र म्हणून स्वीकारण्याचे जाहीर केले. पुढे इंदिरा गांधींनी त्यात सर्वधर्मसमभावाची जोड दिली. परंतु नेहरुंपासूनच आपण देशात सर्वधर्मसमभाव हे सुत्र मानत आलो आहेत. स्वांतत्र्यानंतरची आपली सर्वात महत्वाची कमाई म्हणजे आपल्याकडील लोकशाही. जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपण मोठ्या दिमाखात आज मिरवीत आहोत, परंतु त्याची पाळेमुळे ही स्वातंत्र्यानंतर रोवली गेली. आपल्या देशात लोकशाही केवळ रुजली नाही तर ती फोफावली आहे. लोकशाहीच्या माध्यमातून या जनतेला सत्ताधार्‍यांना उलथून टाकण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे व जनतेने आपला इंगा वेळोवेळी दाखविलाही आहे. अशा प्रकारे आपल्याकडे रक्तहिन क्रांती घडली आहे. त्याउलट आपल्याच बरोबरीने स्वतंत्र झालेल्या पाकिस्तानात मात्र लोकशाही रुजली नाही. बांगलादेशातही फारसे काही वेगळे चित्र नाही. स्वातंत्र्यानंतर आपण लोकशाही स्वीकारीत असताना संमिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली. त्यावेळी जग हे दोन विभागात म्हणजे भांडवलशाही व समाजवादी यात विभागले गेलेले होते. भारताने स्वातंत्र्यानंतर आपल्या गोटात सामिल व्हावे असे अमेरिकनधार्जिण्या भांडवशाहीच्या समर्थक देशांना वाटत होते. परंतु त्यावेळी नेहरु हे समाजवादाच्या दिशेने झुकलेले असल्याने त्यांनी यातून सुवर्णमध्ये काढून संमिश्र अर्थव्यवस्था स्वीकारण्याचा निर्णय घेतला. याच संमिश्र अर्थव्यवस्थेचे महत्व आपल्याला आजही ७५ वर्षानंतर पटत आहे. त्याचबरोबर आपले परराष्ट्र धोरण हे कुणाच्याही एका बाजुला झकलेले नसावे व तिसर्‍या जगाचे आपण नेतृत्व करावे यासाठी म्हणून अलिप्त राष्ट्र संघटनेची चळवळ नेहरुंनी उभारली. अशा प्रकारच्या जागतिक वातावरणात आपण आपली स्वातंत्र्यानंतरची वाटचाल सुरु केली. स्वातंत्र्यानंतर आपण पुढील चार दशकात तीन युध्दांना सामोरे गेलो. एक तर आपली अर्थव्यवस्था नुकतीच कुठे उभारी घेत होती त्यात युध्दाच्या झळा अनुभवाव्या लागल्या. त्याचबरोबर पूर, भूकंप यासारखी नैसर्गिक संकटांचा आपण वेळोवेळी मुकाबला करीत आलो. 91 सालानंतर जगाची सर्व सुत्रेच बदलण्यास सुरुवात झाली. सोव्हिएत युनियनसह समाजवादी देशांच्या जगांच्या अर्थव्यवस्था कोसळू लागल्या. सोव्हिएत युनियनची शकले झाली व जगाच्या नकाशावरुन हा देश फुसला गेला. आपल्याही अर्थव्यवस्थेत एक प्रकारची शिथीलता आली होती. देशातील एकूणच मरगळ झटकण्याची आवश्यकता होती. सार्वजनिक क्षेत्राच्या प्रबल्यामुळे व स्पर्धेच्या अभावामुळे ही शिथीलता आली होती. त्यामुळे यातून देशाला सावरण्यासाठी आपण आपली अर्थव्यवस्था खुली करण्यास तत्कालीन अर्थमंत्री डॉ. मनमोहनसिंग यांनी सुरुवात केली. हळूहळू आपण बाजारपेठीय अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करु लागलो. समाजवादी जग विखुरले गेल्यामुळे आपल्याला अमेरिकेशी दोस्ती वाढविणे हाच एकमेव पर्याय होता. आपण आपली अर्थव्यवस्था खुली करण्यास सुरुवात केल्याने आपला विकास झपाट्याने होतो आहे असे दिसू लागले. परंतु या विकासामागेही अनेक तृटी होत्या. आता उदारीकरणाच्या तीनन दशकानंतर आपण विकास जरुर केल्याचे दिसते, मात्र हा विकास असमतोल पध्दतीने झाला आहे. देशातील दारिद्य निश्‍चितच कमी झाले, परंतु अजूनही देशात गरीबी आहे. श्रीमंत ज्या गतीने आणखी श्रीमंत झाले त्यातुलनेत गरीबांना त्यांच्या उत्पन्न गटातून झपाट्याने वर काढणे आपल्याला काही शक्य झाले नाही. आपल्या देशातील 70 टक्के मालमत्ता ही केवळ दोन टक्का लोकांकडे केंद्रीत झाली आहे. त्यामुळे आपल्याकडे विषमतेची दरी सातत्याने वाढत चालली आहे, व हेच सर्वात धोकादायक ठरणारे आहे. त्यामुळे विकासाची फळे ही ठराविक वर्ग चाखत असल्याचे दिसते आहे. देशापुढे आता सात दशकांच्या स्वातंत्र्यानंतर हेच मोठे आव्हान आपल्यापुढे आहे. अजूनही देशातील 40 टक्के जनतेला एक वेळचे जेवण मिळत नाही एवढी गरीबी अजूनही आपल्याकडे आहे. आरोग्यबाबतीत आपल्याला बरीच मोठी मजल मारावयाची आहे. मात्र देवी, पोलियो, प्लेगसारखे रोग आपण देशातून हद्दपार केले आहेत. अशा प्रकारे गेल्या सात दशकात आपण मोठी कमाई केली असली तरीही आपल्याला भविष्यात फार मोठी मजल मारावयाची आहे. यातील पहिले उद्दिष्ट हे गरीबी संपविण्याचे असेल. आपले संविधान हा आपल्या लोकशाहीचा पाया आहे. हे संविधान टिकविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. आजही स्वातंत्र्यानंतर सात दशके लोटली असली तरीही आपण विकसीत देशांएवढी प्रगती केलेली नाही. आय.टी. उद्योगात आपण आपला ठसा जरुर जगात उमटविला आहे. जगातील एक प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून आपल्याकडे पाहिले जात आहे, परंतु आपण आपली गरीबी संपवीत नाही तोपर्यंत आपली जगात पत वाढणार नाही. आज आपला राजकारणाचा दर्जा पूर्णपणे ढासळला आहे, नोकरशाही सुस्त झालेली आहे व कधी नव्हे एवढे बेमालून थापा मारणारे राज्यकर्ते आपल्याला लाभले आहेत. गेल्या ७५ वर्षांची आपण प्रामुख्याने तीन विभागात करु शकतो. स्वातंत्र्यानंतर लगेचच स्वातंत्र्यसैनिकांची फळी होती, त्यांची मूल्ये होती त्यात आपण चार दशकाहून जास्त काळ काढली. सुरुवातीचा हा कालखंड विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा होता. या काळात भ्रष्टाचाराचा भस्मासूर फारसा नव्हता. आपण संमिश्र अर्थव्यवस्था स्वीकारल्याने अनेक पायाभूत क्षेत्रातील कंपन्या सरकारी क्षेत्रात स्थापन झाल्या. त्यातूच अर्थव्यवस्थेचा पाया रचला गेला. त्यानंतरचा कालखंड हा उदारीकरणाचा होता. या काळात विकासाचा वेग जरुर वाढला परंतु विषमताही तेवढ्याच प्रमाणात वाढली. या काळात देशात मध्यमवर्गीयांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आणि आता तर मध्यमवर्गीय ३५ कोटी एवढा म्हणजे अमेरिकेच्या लोकसंख्येवढा आहे. कॉँग्रसेच्या काळात मध्यमवर्गीय वाढला खरा परंतु तो भाजपाचा मतदार ठरला आहे. मोदींची दहा वर्षे ही देशाची सर्व सूत्रे बदलणारी म्हणजे सर्वच बाबतीत राजकारण, अर्थकारण यात १८० अशांचा बदल करणारी ठरली. खासगीकरणाचा सपाटा व उद्योगपतींची सर्वार्थाने भर हे मोदीं काळातील काही ठळक वैशिष्टे म्हणावी लागतील. २०२४ साली मोदी किंवा भाजपा पुन्हा सत्तेत आल्यास देशाच्या संविधान बदलण्यापासून सुरुवात होईल, यात काही शंका नाही. सध्या ही सर्व वाटचाल नकारात्मक वाटत असली तरीही उद्याची सकाळ ही सकारात्मक असेल असा आम्हाला अशावाद आहे.

0 Response to "७५ वर्षानंतर..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel