
आनंदी देशात...
27 मार्च 2022च्या मोहोरसाठी चिंतन
आनंदी देशात...
एखादी व्यक्ती आनंदी असू शकते. कारण आनंद हा समजण्यात असतो. एखादा गडगंज पैसा असलेला माणूसही आनंदी असणार नाही. अर्थात पैसा असला की तो माणूस आनंदी असेलच असे अजिबात सांगता येणार नाही. खरे तर ज्याच्याकडे पैसा कमी आहे व ज्याच्याकडे समाधानी वृत्ती आहे तो माणूस अधिक आनंदी म्हणून आपल्याला आढळेल. तसे पाहता आनंदी राहणे यासाठी धन, सत्ता, जाती-धर्म याचा निकष असण्याची गरज नाही. परंतु आपली एक समजूत आहे की, पैसा व सत्ता असणारे आनंदी असतील. हे झाले व्यक्तीविषयी परंतु एखादा देशच आनंदी असू शकतो का, याचे उत्तर सकारात्मक आहे. फिनलंड हा चिमुकला देश तब्बल पाच वेळा जगातील आनंदी देश म्हणून गणला गेला आहे. दरवर्षी संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उपाययोजना संस्थेकडून गेली दहा वर्षे आनंदी देश शोधले जातात व त्यात सर्व देशांना क्रमांक दिले जातात. फिनलंड या देशाने आतापर्यंत एकदा किंवा दोनदा नव्हे तर पाच वेळा हा बहुमान पटकावला आहे. २० मार्च हा दिवस जागतिक आनंद दिवस म्हणून साजरा केला जातो. यंदा त्याचदिवशी संयुक्त राष्ट्र संघटनेने जागतिक आनंद अहवाल केला. एखाद्या देशाची प्रगती केवळ सकल राष्ट्रीय उत्पन्नावर नव्हे तर त्या देशातील जनतेच्या आनंदाच्या निकषावरही मोजण्यात यावी याकडे आशिया खंडातल्या भूतान या छोट्याश्या देशाने जगाचे प्रथम लक्ष वेधले. विकासाच्या मार्गावर नेण्याचा सर्वंकष पर्याय म्हणजे आनंद असे म्हणत भूतानने जगाला सकल राष्ट्रीय आनंद (ग्रॉस डोमेस्टिक हॅपीनेस – जीडीएच) महत्त्वाचा असल्याचे अधोरेखित करत नागरिकांच्या आनंदाचे मोजमाप करण्याचे आवाहन केले. त्यानंतर २० मार्च हा दिवस जागतिक आनंद दिवस म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली. त्याच दरम्यान दरवर्षी संयुक्त राष्ट्र संघटनेकडून जगातील देशांच्या आनंदाचे मूल्यमापान करणारा जागतिक आनंद अहवाल प्रकाशित केला जातो. विशेष म्हणजे, मागील काही वर्षांपासून धोरणकर्त्यांकडून आपल्या धोरणांची दिशा ठरवताना या अहवालातील निष्कर्षांचा विचार आणि अभ्यास करण्यात येत आहे. जागतिक आनंद अहवाल तयार करताना त्यामध्ये विविध निकषांचा आंतर्भाव करण्यात आला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने देशाचे दरडोई सकल राष्ट्रीय उत्पन्न, सामाजिक सलोखा, निरोगी आणि निकोप आयुष्याची शाश्वती, भ्रष्टाचाराचे कमीत कमी अस्तित्व, उदारपणा किंवा दातृत्व, स्वत:चे निर्णय स्वत: घेण्याचे तसेच जगण्याचे स्वातंत्र्य अशा अनेक निकषांवर नागरिकांनी आपला आनंद व्यक्त केला आहे. चिंता, राग आणि दु:ख या निकषांवर नागरिकांनी आपले असमाधान व्यक्त केले आहे. देणगी देणे किंवा गरजूंना मदत करणे, स्वयंसेवक म्हणून सामाजिक कामात सहभाग या बाबी नागरिकांच्या आनंद आणि समाधानाचा एक महत्त्वाचा स्रोत असल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे. जागतिक आनंद अहवालात फिनलंड खालोखाल डेन्मार्कने दुसरे स्थान राखले आहे. मागील वर्षी चौथ्या क्रमांकावर असलेल्या आईसलँडने यंदा तिसरे स्थान मिळवले आहे. स्विर्झलँड चौथ्या क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ नेदरलँड आणि लक्झेनबर्गने या यादीत स्थान मिळवले आहे. तर स्वीडन, नॉर्वे, इस्रायल, न्यूझीलंडने पहिल्या दहामध्ये स्थान पटकावले. मागील वर्षी १९ व्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेने १६ वे स्थान तर युनायटेड किंग्डमने १७ वे स्थान प्राप्त केले आहे. अत्यल्प प्रमाणातील गुन्हेगारी, अपरिमित निसर्गसौंदर्य आणि त्याचे संवर्धन, उत्कृष्ट आरोग्य सुविधा, सहकार्य आणि एकोप्याने जीवन जगण्यास प्राधान्य आणि गरिबीचे प्रमाण अत्यंत कमी या कारणांमुळे फिनलंड हा सलग पाचव्यांदा जगातील सर्वात आनंदी देश ठरला आहे. कोरोना महामारीच्या काळात जगातील नागरिकांच्या आनंदावर लक्षणीय परिणाम झाल्याचे या अहवालात नोंदवण्यात आले आहे. महामारीच्या दोन वर्षांत जगातील सर्वच कुटुंबाचे आर्थिक गणित विस्कळीत झाले. त्याचा थेट परिणाम आनंद आणि समाधान या बाबींवर झाला आहे. मोठय़ा संख्येने नागरिकांनी आपले रोजगार गमावले, तसेच प्रकृतिस्वास्थ्याच्या प्रश्नांना तोंड दिले. महामारीच्या काळात चिंता आणि दु:ख या दोन भावनांमध्ये जगभरातच मोठी वाढ नोंदवण्यात आली. याच काळात ताणतणाव आणि अस्थैर्य यांचाही मोठय़ा प्रमाणात फटका जागतिक आनंद निर्देशांकाला बसल्याचे या अहवालातील निरीक्षणे सांगतात. आनंद आणि समाधानासाठी भौतिक गोष्टींवर अवलंबून राहण्याच्या दृष्टिकोनात महामारीच्या काळात मोठा बदल झाल्याची महत्त्वाची बाब या अहवालाने अधोरेखित केली आहे. जागतिक आनंद अहवालात भारताचे स्थान १३६ व्या क्रमांकावर आहे. तालिबानच्या अन्यायाच्या झळा सोसणारा अफगाणिस्तान १४६ व्या क्रमांकावर आहे. महत्वाची बाब म्हणजे, भारताचे इतर शेजारी देशही या अहवालात भारतापेक्षा वरचे स्थान राखून आहेत. नेपाळने ८४ वे स्थान, बांगलादेशने ९४ वे स्थान, पाकिस्तानने १२१ वे तर श्रीलंकेने १२७ वे स्थान प्राप्त केले आहे. भारतीय उपखंडातील भूतान या चिमुकल्या देशाने जागतिक आनंद अहवालात यंदा ९७ वे स्थान पटकावले आहे. आनंदी देशाच्या दुनियेत भारताची मात्र कामगिरी फारशी काही उत्साहवर्धक नाही. भारत यंदा १३६ व्या क्रमांकावर असला, तरी गेल्या वर्षी आपला क्रमांक १३९ वा होता आणि त्याआधी तर १४० वा होता. मात्र २०१८ साली १३३, २०१७ मध्ये १२२, २०१६ साली ११८, त्याआधीच्या २०१५ या वर्षी ११७ तर २०१३ मध्ये १११ व्या क्रमांकावर भारत होता. दिवसेंदिवस कमी होत चाललेल्या रोजगार आणि उपजीविकेच्या संधी, भ्रष्टाचाराचा उद्रेक, प्राथमिक शिक्षणाच्या सुविधांमधील असमानता अशा कारणांमुळे भारतीय आनंदापासून दूर असल्याचे या अहवालातील निरीक्षणांवरून स्पष्ट होत आहे. गेल्या काही वर्षात आपल्याकडे धार्मिक धृवीकरण वाढले आहे. त्यामुळे आपल्याकडील जनतेच्या आनंदी प्रवृत्तीत काही वाढ झालेली दिसत नाही.
0 Response to "आनंदी देशात..."
टिप्पणी पोस्ट करा