-->
मान्सून दिलासा देणार?

मान्सून दिलासा देणार?

सोमवार दि. 03 जून 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
----------------------------------------------
मान्सून दिलासा देणार?
मोदी सरकारचा शपथविधी झाल्याने राजकीय गरमागरमी थंड झालेली असताना उन्हाळ्याने कहर गाठला आहे. त्यामुळ आता सर्वांचेच डोळे मान्सूनकडे लागले आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यात येणारा पाऊस आता कधी पडेल याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. यंदा भारतात यावर्षी सरासरी पाऊस होईल असे राज्य हवामान खात्याकडून शुक्रवारी सांगण्यात आल्याने हे वर्तमान एैकून दिलासा मिळाला आहे. हा पाऊस शेती उत्पादन व आशियातील तिसर्‍या क्रमांकाच्या मोठ्या अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा असेल. भारतात अर्ध्यापेक्षा अधिक शेती क्षेत्र हे सिंचनाखाली नसते, हे सिंचनक्षेत्र निव्वळ पावसावरच अवलंबून असते. त्यामुळे आपल्याकडे किती पाऊस पडतो याला फार महत्व असते. जूनपासून सुरुवात होणा-या संपूर्ण चार महिन्यांच्या हंगामासाठी हवामान खात्याच्या मते पावसाची सरासरी, 96 टक्के आणि 104 टक्केच्या 50 वर्षांच्या सरासरीच्या 104 सेंटीमीटरमध्ये निर्धारित करते. जुलै महिन्यात देशात 96 टक्के तर ऑगस्टमध्ये 99 टक्के पाऊस पडेल असा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे. देशभरात वर्षभरात पडणार्‍या एकूण पावसापैकी 70 टक्के पाऊस हा येत्या तीन-चार महिन्यात पडत असतो व त्यावरच भारतातील कृषि क्षेत्राचे यश-अपयश अवलंबून असते. विभागवार पाहिले तर पश्‍चिमोत्तर भारतात मान्सून काळात 96 टक्के पावसाची शक्यता आहे. तर या काळात मध्य भारतात याच्या 100 टक्के पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. तर पूर्वोत्तर भारतात मान्सून काळात 91टक्के पाऊस होऊ शकतो, असा अंदाज आहे.मात्र यंदा मान्सून फारसा चांगला राहणार नाही व पाऊस कमी होण्याची शक्यता आहे, असे भविष्य स्कायमेटने वर्तविल्यामुळे यंदा मान्सून निराशा करेल असे वाटत होते. परंतु त्याच्या नेमके उलटा अंदाज हवामान खात्याचा आहे. या वेळी मान्सूनचे केंद्र अरबी समुद्रात राहील, हे चांगले चिन्ह नाही. यामुळे मोसमी वारे वायव्य दिशेला जास्त प्रमाणात सरकून, ते देशाच्या पठारी भागापासून दूर जातील. स्कायमेट आपल्या पहिल्या अंदाजावरच ठाम असून यंदा देशात सरासरीच्या 93 टक्के पाऊस होईल. म्हणजेच, देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल, असा अंदाज त्यांनी सांगितला आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार, मध्य भारतात सर्वात कमी 91 टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पूर्व व ईशान्य भारतात 92 टक्के, दक्षिण भारतात 95 टक्के आणि वायव्य भारतात 96 टक्के पावसाचा अंदाज आहे. देशात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत 96 ते 104 टक्के पाऊस झाल्यास तो साधारण किंवा सरासरीइतका मानतात. पाऊस 95 टक्क्यांपेक्षा कमी झाल्यास तो सरासरीपेक्षा कमी झाला असे मानले जाते. यंदा मध्य भारतातील मराठवाडा, विदर्भ, गुजरात आणि पश्‍चिम मध्य प्रदेशात पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. यांद भारताला अल निनोचा परिणाम भोगावा लागेल असे दिसते. अल निओच्या प्रभावामुळे मोसमी वार्यांची दिशा बदलते. हमखास पावसाच्या भागात पाऊस पडत नाही, तर पाऊस न पडणार्या भागात मुसळधार पाऊस पडतो. सध्या उष्णतेच्या लाटेने कानपूर ते कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण देशात घामाच्या धारा वाहत आहेत. एप्रिलचा उकाडा सुरु झाला की प्रत्येक जण मान्सूनची वाट पाहू लागतो. यंदा चांगला पाऊस पडू देत अशी हाक बळीराजा देतो. परंतु त्याच्या या हाकेकडे वरुणराजा लक्ष देतोच असे नाही. यंदा दुष्काळाने राज्याला वेढलेले असताना पावसाच्या अंदाजाचे महत्त्व आणखी वाढते. हवामान खात्यातर्फे दरवर्षी दोन टप्प्यांत मान्सूनचे पूर्वानुमान वर्तवण्यात येते. आता दुसरा अंदाज मे अखेर किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात येईल. भारताच्या दृष्टीने या अंदाजाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतासारख्या मोसमी हवामानाच्या देशात सर्व अर्थकारण, समाजकारण, राजकारण पावसावर अवलंबून असते. गेल्या नऊ वर्षांत हवामान खात्याचे अंदाज अचूक ठरले आहे. स्कायमेटला तर दोन वर्षांपूर्वी अंदाज चुकले म्हणून जाहीर माफी मागावी लागली होती. भारतातील एकूण लोकसंख्येपैकी 68 टक्के लोकसंख्या ग्रामीण भागामध्ये राहात असून, 50 टक्के लोक रोजगारासाठी कृषी क्षेत्रावर अवलंबून आहेत़  आपल्याकडे मान्सूनच्या पावसावर मोठ्या प्रमाणावर शेती अवलंबून असून त्याचा परिणाम संपूर्ण अर्थव्यवस्थेवर होत असतो़ त्यामुळे मान्सून कसा असणार, याकडे सर्वांचे लक्ष असते़ पावसाचे प्रमाण कितीही असले तरी शेतकर्‍यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढतच चालले आहे. अर्थात त्याला सरकारी धोरणे जबाबदार आहेत. यंदा देखील चांगला पाऊस अपेक्षित असल्याने व प्रत्यक्षात तसा चांगला पाऊस पडल्यास हे सलग चांगल्या पावसाचे दुसरे वर्ष असेल. त्यामुळे एकूणच शेती क्षेत्राला नव्हे तर संपूर्ण अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीमुळे देशाचे अर्थचक्र थंडावले होते. त्याला गती मिळणे सध्या तरी अवघड आहे. अशा वेळी चांगला पावसाळा झाल्यास केवळ शेतकरीच नाही तर सर्वानांच चांगले दिवस येतील. पावसावर आपले बरेच अर्थकारण अवलंबून असते. हवामान खाते व स्कायमेट यांच्या अंदाजात समान धागा नसला तरीही चांगला पाऊस पडावा अशीच आपण अपेक्षा करु या.
---------------------------------------------------------

0 Response to "मान्सून दिलासा देणार?"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel