-->
भोपाळचा विषारी प्रचार

भोपाळचा विषारी प्रचार

रविवार दि. 28 एप्रिल 2019 च्या अंकासाठी चिंतन - 
-----------------------------------------------
भोपाळचा विषारी प्रचार
------------------------------------------
भोपाळला युनियन कार्बाईड या कंपनीतून विषारी वायू निघाला व त्यात हे शहर सुमारे चाळीस वर्षापूर्वी उध्दस्वस्थ झाले होते. आता पुन्हा एकदा येथील लोकसभेची होणारी निवडणूक पाहता हे शहर दहशतवादाच्या विषारी प्रचाराच्या जाळ्यात अडकले आहे. मालेगाव बॉम्बस्फोटामधे दहशतवादाचे गंभीर आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंह यांना भाजपने भोपाळ शहरातून उमेदवारी दिली आणि येथील सारा नूरच पालटला आहे. कॉँग्रेसने यापूर्वीच माजी मुख्यमंत्री दिग्वीजय सिंग यांना उमेदवारी दिली आहे. साध्वी प्रज्ञा सिंह यांना न्यायालयाने निर्दोष ठरवलेले नाही किंवा त्यांना दोषी म्हणूनही घोषीत केलेले नाही, पण त्यांच्यावर दहशतवादाचे गंभीर आरोप असताना भाजपने त्यांना लोकसभा निवडणुकीत उमेदवारी दिलीच कशी, हा प्रश्‍न उपस्थित होतो. त्यांच्यावर गंभीर आरोप असले तरी त्या कॅन्सरने आजारी झाल्यावर जामीनावर आहेत व त्यांना शिक्षा झालेली नाही. त्यांच्यावरील आरोपातून सुटका झालेली नसताना त्यांना खासदारकीचे तिकिट देणे म्हणजे हिंदुत्वाच्या राजकारणाला पोसण्याचे भाजपाचे धोरण आहे. यातून धार्मिक तेढ निर्माण करुन हिंदूंच्या मतांचे धुव्रीकरणे करणे हे भाजपाचा हेतू उघड आहे. अठ्ठेचाळीस वर्षाच्या साध्वी प्रज्ञा सिंह या संन्यासी आहेत. सदैव भगव्या वस्त्रात व गळ्यात रूद्राक्षाची माळ घालून असतात. मध्यप्रदेशातील भिंड येथे जन्मलेल्या प्रज्ञासिंग या लहानपणापासून त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधीत आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे त्यांनी काम केले आहे. संघ परिवाराशी त्यांची नाळ घट्ट असल्याने त्या कट्टर हिंदुत्ववादी आहेत. साध्वी प्रज्ञा सिंह या राजकारणात कुठेही पदावर नव्हत्या. मालेगाव बॉम्बस्फोटात त्यांना महाराष्ट्र एटीएसने अटक केल्यावर साध्वी मिडियामधे वारंवार झळकू लागल्या. भगव्या दहशतवादाचा चेहरा अशी साध्वी प्रज्ञा सिंह यांची प्रतिमा झाली. दहशतवादी हल्ल्यानंतर पकडल्या जाणार्‍या आरोपींमधे प्रामुख्याने मुस्लिम लोक असायचे. त्यामुळे याचे नामकरण मुस्लिम दहशतवाद असे झाले. भाजपच्या हिंदुत्वाला शह देण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी हिंदू दहशतवाद किंवा भगवा दहशतवाद असे शब्दप्रयोग वापरायला सुरूवात केली. मालेगाव बॉम्बस्फोटानंतर प्रज्ञा सिंग, कर्नल प्रसाद पुरोहित, अजय रूइरकर, सुधाकर धार द्विवेदी, सुधाकर चतुर्वेद, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी आदींंना एटीएसने अटक केली त्यानंतर भगवा दहशतवाद असा उल्लेख काँग्रेसचे नेते वारंवार आपल्या भाषणातून करू लागले. यात काही खोटे नव्हते. परंतु न्यायालयाने अजून त्यांना दोषी ठरविलेले नाही हे ही तितकेच खरे. अशा प्रकारे गंभीर आरोप असलेल्या स्वाधी प्रज्ञा यांना भाजपाने तिकिट दिल्यावर देशभर वादळ उठणे स्वाभाविक होते. त्यानंतर या स्वाधींनी जी वादग्रस्त विधाने केली ते पाहता तर देशाच्या संविधानालाच यामुळे धोका निर्माण होणार आहे. स्वतः साध्वी प्रज्ञा सिंह यांनी आपण काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांच्या विरोधात धर्मयुध्द करण्यास तयार आहोत असे जाहीर करून टाकले. साध्वींच्या उमेदवारीने भोपाळमधे भारत माता की जय असे वातावरण निर्माण झाले आहे. भाजपला अपेक्षित असे चित्र निर्माण झाले आहे. भोपाळ लोकसभा मतदारसंघात 18 लाख मतदार आहेत, पैकी साडेचार लाख मुस्लिम आहेत. 1989 पासून भोपाळमधे सदैव भाजपचाच खासदार निवडून आला आहे. अशा स्थितीत दिग्वीजयसिंग यांना मोठी लढत व्दावी लागणार आहे. एकूणच पाहता ही वैचारिक लढत ठरेल. साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी देशाचे थोर सुपुत्र व दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले हेमंत करकरे यांच्याविषयी काढलेले अनुद्गार पाहता भाजपाचा खरा चेहरा आता उघड झाला आहे. हेमंत करकरे यांनी या खटल्यातील शोध मोठ्या धैर्याने लावून देशात सुरु असलेला भगवा दहशतवाद उघड केला होता. आज करकरे नाहीत, परंतु ते जर असते तर त्यांनी हा दहशतवाद जनतेसमोर उघड करुन दाखविला असता. त्यानंतर भाजपाचे सरकार आल्यावर ज्या हिंदुत्ववाद्यांवरचे खटले मोठ्या शिताफिने मागे घेण्यात आले किंवा हे खटले दुबळे करण्यात आले. परंतु हा भगवा दहशतवाद काही लपलेला नाही. तो भाजपाच्या व प्रज्ञा ठाकूर यांच्या रुपाने आज आहे. प्रज्ञा ठाकूर यांनी करकरेंसंबंधी केलेल्या विधानावरुन स्पष्ट होते. करकरेंनी त्यावेळी भगवा दहशतवाद असे त्याचे जे नामकरण केले होते ते योग्यच होते हे आता पटत आहे. दहशतवादी ते भाजप उमेदवार या प्रज्ञा ठाकूर यांच्या प्रवासात भाजपचे मोठे योगदान राहिले आहे. भाजपचा खोटा राष्ट्रवाद आणि बेगडी देशप्रेमाचा बुरखा आता फाटला असून शहीद हेमंत करकरे यांचा अपमान करणार्‍या प्रज्ञा ठाकूर यांना उमेदवारी देताना भाजपला लाज कशी वाटत नाही? अशा प्रकारे हिंदुत्ववादाला पोसून आपल्या मतपेट्या सुरक्षित राखण्याचे संकुचित काम भाजपा  करीत आहे. प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी महाराष्ट्राचे महान वीरपुत्र शहीद हेमंत करकरे यांचा अवमान केला आहे. हा फक्त करकरेंचाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा आणि देशातील शहीदांचा अवमान आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या निवडणूक प्रचाराच्या भाषणात काही ठिकाणी पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्यांचे फोटो लावून त्यातून मते मागण्याचा दळभद्रीपणा केला होता. एकीकडे आपण शहीदांचा सन्मान करीत मते मागायची तर दुसरीकडे शहीद झालेल्या करकरेंच्या विषयी अनुद्गार काढावयाचे, असे दुटप्पी धोरण भाजपाचे आहे. भाजपने शहीद करकरेंना देशद्रोही ठरवले आहे त्यामुळे त्यांच्या कुटुबियांना प्रचंड वेदना होत असतील, याची कल्पनाही न केलेली बरे. माझ्या शापाने देशद्रोही हेमंत करकरे यांचा मृत्यू झाला असल्याचे प्रज्ञा ठाकूर यांनी म्हटले आहे. मग यच प्रज्ञा ठाकूरांना कोणाच्या शापाने कॅन्सर झाला असे म्हटल्यास चालेल का? महाराष्ट्रात ईदच्या एक दिवस अगोदर मालेगाव मध्ये बॉम्बस्फोट झाले होते. त्यामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला तर कितीतरी लोक जखमी झाले होते. या प्रकरणाचा तपास एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्याकडे होता. तपासात मोटारसायकल ही साध्वी प्रज्ञासिंग ठाकुर यांची होती हे निष्पन्न झाले होते. साध्वी प्रज्ञासिंग यांना मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी अटक झाल्यावर करकरे यांच्याबाबत संशय व्यक्त केला होता. परंतु या बॉम्बस्फोटाचे धागेदोरे करकरे यांनी अखेर शोधून काढलेच होते. दुर्दैवाने मुंबईतील अतिरेकी हल्ल्यात करकरे शहीद झाले त्यामुळे आपण एक कार्यक्षम अधिकारी गमावला होता. भाजपाच्या राजवटीत साध्वी प्रज्ञासिंग ठाकुर या जामीनावर सुटल्या आहेत. परंतु त्यांची निर्दोष मुक्तता झालेली नाही, हे भाजपाने लक्षात घ्यावे. मात्र भाजपने त्यांना उमेदवारी देवून दहशतवादाला खतपाणी घातले आहे, कारण अजूनही प्रज्ञा ठाकूर यांना न्यायालयाने निर्दोष सोडलेले नाही. शेवटी त्यांनी उमेदवारी मिळताच जे करकरेंविषयी गरळ ओकले ते पाहता, त्यांची नाळ ही भगव्या दहशतवादाशी जुळणारीच आहे. भाजप हेमंत करकरे यांचा देशद्रोही बोलून अपमान त्यांनी अपमान केला आहे. भाजपा प्रज्ञा यांना आज पाठीशी घालीत आहे, परंतु जनता या अतिरेकी प्रवृत्तीला थारा देणार नाही. जनता त्यांना निवडणुकीत झिडकारेल यात काही शंका नाही.
---------------------------------------------------------

0 Response to "भोपाळचा विषारी प्रचार"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel