-->
देशद्रोह्यांना धडा

देशद्रोह्यांना धडा

संपादकीय पान मंगळवार दि. १५ सप्टेंबर २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
देशद्रोह्यांना धडा
मुंबईत ११ जुलै २००६ रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात मुंबई विशेष सत्र न्यायालयाने १२ आरोपींना दोषी ठरवले असून, एका आरोपीची निर्दोष सुटका केली आहे. नऊ वर्षांपूर्वी झालेल्या या स्फोटांत १८८ नागरिकांनी आपला जीव गमावला होता, तर तब्बल ८२९ जण जखमी झाले होते. न्यायालयाने कमाल अहमद अन्सारी (३७), डॉ. तन्वीर अन्सारी (३७), मोहम्मद फैसल शेख (३६), सिद्दीकी (३०), मोहम्मद शफी (३२), शेख आलम शेख (४१), मोहम्मद अन्सारी (३४),  मुझमिल शेख (२७), सोहिल शेख (४३), जमीर शेख (३६), नावेद खान (३०) व असिफ खान (३८) या १२ आरोपींना दोषी ठरवले असून, अब्दुल शेख याची सर्व आरोपांतून निर्दोष सुटका करण्यात आली आहे.गुन्हेगारांना अजून शिक्षा जाहीर झाली नसली तरी सरकारी पक्षातर्फे त्यांना फाशी देण्याचा आग्रह धरण्यात आला आहे. या खटल्यादरम्यान सरकारतर्फे १९२ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या, बचाव पक्षातर्फे ५१ साक्षीदार हजर करण्यात आले, तर न्यायालयातर्फे एका साक्षीदाराची साक्षी नोंदवण्यात आली. दि. ११ जुलै २००६ रोजी पश्‍चिम रेल्वेच्या खार, वांद्रे, जोगेश्‍वरी, माहिम, मीरारोड, माटुंगा व बोरीवली या स्थानकांवरील लोकलमध्ये ११ मिनिटांत सात बॉम्बस्फोट झाले होते. या स्फोटात १८८ जणांचा बळी गेला होता, तर ८२९ जण जखमी झाले होते. या साखळी स्फोटांनी मुंबईसह संपूर्ण देशाला हादरवले होते. नऊ वर्षांनंतर याप्रकरणी विशेष सत्र न्यायालयाने शुक्रवारी निकाल दिला आहे. कोर्टाने १२ आरोपींना दोषी ठरवले. हत्या, देशाविरोधात कट रचणे आदी कलमांखाली या आरोपींना दोषी ठरवण्यात आले. अब्दुल शेख या ३७ वर्षाचा शिक्षक यातून निर्दोष सुटला आहे. त्यामुळे त्यांची शिक्षकाची नोकरी यापुढे करण्यासाठी न्यायालयाने आदेश काढावा अशी वकिलाने विनंती केली होती. अब्दुल यांच्या जागेत हे अतिरेकी राहावयास होते त्यामुळे त्यांचाही या कटात सहभाग होता हा पोलिसांचा दावा काही न्यायालयाने मान्य केला नाही. न्यायाधिशांनी आपण दिलेले निकालपत्र दाखविल्यावर सदर शिक्षकास नोकरीत पुन्हा रुजू करुन घेतले जाईल, त्यासाठी स्वतंत्र आदेश काढण्याची गरज नाही असे सांगितले. नऊ वर्षाच्या कालावधीनंतर याचा निकाल लागला आहे. अजूनही या खटल्यातील पाहिजे असलेले दोन गुन्हेगार हे फरार आहेत यातील एक जण ब्रिटनमध्ये व एक जण दुबईत असल्याचा संशय आहे. रशिल शेख हा अतिरेकी आपल्या घरी ब्रिटनहून हवालामार्फत पैसे पाठवित होता. त्यापैकी ६० लाख रुपये त्याने जे पाठविले होते त्यातील २० लाख रुपये हे बॉमस्फोटासाठी वापरले गेल्याचे उघड झाले आहे. आता आरोपींना शिक्षा सुनावल्या असल्या तरीही या गुन्ह्यांची पूर्ण उकल करण्यात अतिरेकी विरोधी पथकास काही यश आलेले नाही ही एक आणखी दुदैवी घटना म्हटली पाहिजे. यातील सर्व आरोपी काही अजूनही पकडले गेलेले नाहीत. जे काही पकडले गेले त्यांना शिक्षा ठोठाविण्यात आल्या आहेत. यात प्रामुख्याने बंदी घातलेल्या लष्कर ए तोयबा या संघटनेचा हात होता. यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे सुरुवातीला सांगण्यात आले मात्र शेवटपर्यंत ते काही सिध्द करण्यात सरकारला यश आले नाही. अतिरेकी विरोधी पथकाच्या दाव्यानुसार मुंबईत पाकिस्तानातून आलेल्या ११ अतिरेक्यांनी हे बॉम्ब ठेवले होते व त्याचा स्पोट झाला. परंतु प्रत्यक्षात एकाही पाकिस्तानी गुन्हेगाराला अटक झाली नाही. आणखी एक दुदैवाची बाब म्हणजे या स्फोटानंतर काही प्रमाणात सुरक्षा कवच मुंबईभोवती आखण्यात आले होते ते आता पूर्णपणे ढिले पडले आहे. मुंबईकरांची सुरक्षितता आता पूर्णपणे वार्‍यावर टाकण्यात आली आहे. मात्र प्रवासी हे या घटनेनंतर दक्ष झाले आहेत. रेल्वेने सुरु केलेल्या हेल्पलाईनवर सरासरी २० टक्के कॉल्स हे सुरक्षिततेविषयी किंवा अनोळखी बँकांबाबत असतात. मुबईची जीवनवाहिनी ही बंदिस्त नाही, प्रत्येक स्टेशनवर तिला अनेक बाहेर जाण्यासाठी मार्ग आहेत. त्यामुळे या स्टेशनवर सुरक्षा राखणे कठीण जाते. मुंबईच्या उपनगरीय मार्गावरुन सुमारे ७० लाख प्रवासी दररोज प्रवास करीत असतात. त्यांना तपासून रेल्वेत बसण्यास देणे हे अशक्य आहे. परंतु यावरही मात करीत काही प्रमाणात सुरक्षा व्यवस्था करता येऊ शकते. नऊ वर्षांपूर्वी झालेल्या या बॉम्बस्फोटानंतर बहुतांशी रेल्वे स्थानकांत मेटल डिक्टेटर लावण्यात आले. आता यातील बहुतांशी बंद पडले आहेत. प्रत्येक रेल्वे स्थानकात लावलेल्या सी.सी.टी.व्ही. पैकी बरेचसे बंद पडले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात उपनगरीय जाळे असलेल्या रेल्वेने गेल्या दहा वर्षात फक्त सुरक्षिततेच्या उपकरणांसाठी व प्रसिक्षणासाठी केवळ दहा कोटी खर्च केले आहेत. त्यावरुन रेल्वेची सुरक्षिततेच्या बाबतीतची उदासिनता कळते. त्यामुळे आपण बॉम्बस्फोटाच्या घटनेतून कोणताही बोध घेतलेला नाही हेच सिद्ध होते.  
--------------------------------------------------------------------------

0 Response to "देशद्रोह्यांना धडा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel