-->
बाप्पांचे स्वागत करताना... गणेश मंडळांना आवाहन....

बाप्पांचे स्वागत करताना... गणेश मंडळांना आवाहन....

रविवार दि. १३ सप्टेंबर २०१५ च्या मोहोरसाठी लेख --
-------------------------------------------
बाप्पांचे स्वागत करताना... गणेश मंडळांना आवाहन....
---------------------------------------------------
लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशात्सव सुरु केल्याच्या घटनेला आता दीडशे वर्षाहून जास्त काळ लोटला आहे. त्यापूर्वी घरोघरी गणपती बसविला जाई. मात्र लोकमान्यांनी गिरगावात पहिला सार्वजनिक गणपती स्थापन करुन लोकांना त्यानिमित्ताने एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. टिळकांनी सुरुवाते केल्यावर आपल्याकडे सार्वजनिक गणेशोत्सव ठिकठिकाणी स्थापन झाले. त्यावेळी स्वातंत्र्याचा लढा नुकताच कुठे आकार घेत होता. ब्रिटीशांना आपल्या देशात हाकलून दिल्याशिवाय आपण आपल्या देशाची प्रगती करु शकत नाही यावर लोकमान्य टिळक ठाम होते. त्यासाठी देशातील जनतेला एकत्र आणण्याची गरज होती आणि लोकांना जमविण्याचे एक साधन म्हणून त्यांनी सार्वजनिक गणपती मंडळे स्थापन करण्यात पुढाकार घेतला. गणपतींच्या या दहा दिवसात विविध विषयांवर चर्चासत्र, वादविवाद, करमणुकीचे कार्यक्रम (आतासारखे नव्हेत) चालत. यातून लोकांच्या स्वातंत्र्यांचा अंगार फुलविला गेला. स्वातंत्र्यानंतर मात्र काळाच्या ओघात ही परिस्थिती बदलत गेली व गणपती मंडळांचे स्वरुप बदलत गेले. गेल्या वीस वर्षात तर गणपती मंडळांना बाजारी स्वरुप आहे, ही सर्वात वाईट गोष्ट म्हटली पाहिजे. गणपतीच्या मूर्तींपुढे केले जाणारे विभत्स डान्स तसेच एकूणच करमणुकीच्या कार्यक्रमांचे स्वरुप पाहता लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणपती उत्सव यासाठीच का सुरु केले होते असा प्रश्‍न उपस्थित होतो. गणपतीच्या मंडपात पत्ते खेळण्यापासून जे विविध उपक्रम दहा दिवस केले जातात ते पाहता एक प्रकारचे नैराश्यच यावे. यासाठीच लोकमान्यांनी गणपती उत्सव सुरु केला होता का, असे वाटू लागते. आता सार्वजनिक गणपती मंडळांकडे बर्‍यापैकी निधी जमा होतो. अनेक मंडळे त्यातून विधायक उपक्रम, समाजउपयोगी कामे हाती घेऊन सध्याच्या स्थितीतही आपले वेगळेपण दाखवित असतात. सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असलेला लालबागचा राजा गणपतीच्या मंडळाने अनेक समाजहिताच्या बाबी हाती घेतल्या आहेत. यात वाचनालय चालविण्यापासून ते अल्प किंमतीत डायलेसिस करुन देण्याची सुविधा उपलब्ध करणे या अनेक बाबींचा समावेश आहे. अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम अनेक मंडळे हाती घेतात हे देखील एक वास्तव आहे. मात्र असे उपक्रम राबविणार्‍यांची संख्या एकूण मंडळांची तुलना करता अल्पच आहे.
गेल्या काही वर्षात गणेशोत्सवाचे जे स्वरुप बदलले त्यात आता बदल करण्याची निकड निर्माण झाली आहे. सध्याचे जे स्वरुप आहे ते पाहता आपण आपल्या मूळच्या ध्येयापापासून ढळलो आहोत हे नक्की. गणपती हा आता एक उत्सव म्हणून साजरा केला जातो इथपर्यंत योग्यच आहे. परंतु मंडळांकडे जो करोडोंचा निधी जमा होतो तो चांगल्या ठिकाणी किंवा एखाद्या समाजउपयोगी प्रकल्पासाठी हा निधी खर्च झाल्यास त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. लोकमान्य टिळकांनी सुरु केलेल्या या उपक्रमास आधुनिक टच देत असताना त्याला जर सामाजिक उपक्रमतेशी जोडले तर एक चांगला उद्देश साध्य होऊ शकतो. यंदा देशात व महाराष्ट्रातही दुष्काळाने ग्रासले आहे. गेल्या दोन वर्षात पावसाचे प्रमाण संपूर्ण देशातच कमी होत चालले आहे. यंदा तर महाराष्ट्राच्या कोकण वगळता बहुतांशी भागात पुरेसा पाऊस झालेला नाही. कोकणात नेहमीची सरासरी गाठली नसली तरीही अन्य भागातील तुलनेत पाऊस चांगला आहे. अशा स्थितीत दुष्काळी महाराष्ट्राला सावरण्याचे काम यंदा गणेशोत्सव मंडळे करु शकतात. सध्याच्या दुष्काळाच्या छायेत राज्य असताना प्रत्येक मंडळाने आपल्याकडील काही ठोस रक्कम दुष्काळ निवारणासाठी खर्च करण्याचे ठरविल्यास राज्यात एक मोठा निधी तयार होईल. अगदी साधे उदाहरण द्यायचे झाल्यास प्रत्येकी एक लाख रुपये देण्याचा निर्णय जर राज्यातील एक लाख गणेश मंडळांनी घेतला तर एक हजार कोटी रुपये उभे राहातात. दुष्काळग्रस्तांसाठी ही रक्कम मोठी आहे. त्यासाठी प्रत्येक गणेश मंडळाने सरकारला ही थेट मदत करुन या रकमेचा योग्य विनिमय होतो आहे किंवा नाही ते पाहाण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांची गावपातळीवर नियुक्ती करावी. समजा असे करणे गणेश मंडळांना योग्य वाटत नसेल तर पाच-दहा गावांनी एकत्र येऊन एक समुदाय स्थापन करावा व त्यातील प्रत्येकाने एक दुष्काळग्रस्त गाव दत्तक घ्यावे. या गावात दुष्काळ निवारणासाठी जशी उपाययोजना करावी तसेच येथे दीर्घकालीन उपाय हाती घेऊन ते गाव दुष्काळमुक्त कसे करता येईल याचे काम हाती घ्यावे. आज मराठवाडा व विदर्भातील सुमारे दहा हजाराहून जास्त गावांमध्ये आत्तापासून दुष्काळ जाणवू लागला आहे. ही गावे दत्तक गणेश मंडळांनी दत्तक घेतल्यास राज्यात दुष्काळ निवारणाची एक मोठी चळवळ या माध्यमातून उभी राहू शकते. वर दिलेले दोन्ही पर्याय जर गणेश मंडळांना मान्य नसतील तर प्रसिध्द अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरेंनी शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबाव्यात म्हणून त्यांना किमान १५ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यासाठी जी चळवळ उभारली आहे त्यात सहभागी व्हावे. लहान गणेश मंडळांनी अशा प्रकारे थेट रक्कम जमवून ती नानांच्या हाती सोपविल्यास आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांना कर्जातून बाहेर येण्यास मोठी मदत होऊ शकते. सर्वात महत्वाचे म्हणजे हे बिन राजकीय काम म्हणून केले गेले पाहिजे. गणेश उत्सवात ज्याप्रमाणे सर्व जाती-धर्माचे लोक मोठ्या उत्साहाने सहभागी होतात त्याच धर्तीवर सर्व जाती-धर्माचे लोक या चळवळीत सहभागी होणे गरजेचे आहे. आपण विघ्नहर्त्याचे स्वागत मोठ्या उत्साहात करतो. परंतु आपल्या घरात जर अस्वस्थता असेल तर कोणताच उत्सव साजरा होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे यंदा राज्यावर दुष्काळाचे सावट असताना आपण गणरायाचे आगमन जरुर मर्यादीत उत्साहाने करावे परंतु ज्यांच्या घरात आज चुल पेटू शकत नाही त्याला आधार देण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. गणेश मंडळांनी या कामी पुढाकार घेतल्यास विघ्नहर्ता गणेश खर्‍या अर्थाने त्यांच्यावर प्रसन्न होईल. लोकमान्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात एका ध्येयाने प्रेरित होऊन गणेशोत्सव सुरु केला, त्यात त्यांना यशही आले. आता आपण पुन्हा एकदा दुष्काळ निवारणासाठी गणेशोत्सव मंडळांना हाताशी धरल्यास एक मोठी चळवळ उभी राहू शकते. याची सुरुवात यंदापासूनच केल्यास उत्तम होईल. अशा प्रकारे विधायक काम करणार्‍या गणेश मंडळांच्या पाठिशी कृषीवल समर्थपणे उभा राहिल.
-----------------------------------------------------------------------------    

0 Response to "बाप्पांचे स्वागत करताना... गणेश मंडळांना आवाहन...."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel