-->
कोरोना उतरणीला...

कोरोना उतरणीला...

20 फेब्रुवारी 2022च्या मोहोरसाठी चिंतन कोरोना उतरणीला कोरोनावर आता आपल्या देशात पूर्णपणे नियंत्रण आल्याचे व आता ही साथ उतरणीला लागल्याचे चित्र दिसू लागले आहे. पाच राज्यातील निवडणुकांचा प्रचार भरात आला असताना कोरोनाचा आलेख उतरणीला लागणे हे समाधानाकरक म्हटले पाहिजे. कोरोनाची तिसरी लाट फराशी धोकायदायक नसेल असे अनेक वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांना वाटत होते. परंतु दुसरी लाट एवढी भयानक होती की लोकांना त्यामुळे मनात एक प्रकारची भीती बसली होती. परंतु आता कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे असे सध्यातरी दिसते आहे. असे असले तरी सर्व जनजीवन पुन्हा सुरु करीत असताना खबरदारी ही घ्यावीच लागणार आहे. एकप्रकारे आपले आता नवीन जीवन कोरोना पश्चात सुरु झाले आहे. कोरोनाच्या काळात अनेकांना फार कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला. प्रामुख्याने रोजंदारीवरील मजुरांना जगणे कठीण झाले होते. सरकारने या घटकाला वाऱ्यावरच सोडले होते. अनेक मध्यमवर्गीयांच्या नोकऱ्या गेल्या तर काही जणांचे पगार कापण्यात आले. आजही त्यांचे पगार काही पूर्वपदावर आलेले नाहीत. अशा स्थितीत अनेकांना आपल्या आयुष्याची नव्याने सुरुवात करावी लागली आहे. नवीन वर्षाच्या प्रारंभी म्हणजे जानेवारी २२ रोजी जगातील प्रमुख शहरात कोरोनाच्या ओमायक्रॉनने थैमान घालण्यास सुरुवात केली होती. अर्थातच भारत त्याला काही अपवाद नव्हता. मुंबई, दिल्लीसह देशातील अनेक महानगरात कोरोनाने पुन्हा एकदा जबरदस्त उसळी अनपेक्षीतरित्या घेतली. २०२२ साली तरी कोरोनाच्या सावटाखालून मुक्त होऊ अशी आशा व्यक्त होत असताना अचानकपणे कोरोनाचा नवीन व्हेरिएंट सक्रिय झाला. सर्वात महत्वाचे म्हणजे याचा फैलाव यापूर्वीच्या डेल्टा व्हेरिएंटपेक्षा पाच दहा पटीने जास्त होत होता, मात्र त्यात एक समाधानाची बाब म्हणजे, याची बाधा अतिशय सौम्य होत होती. त्यामुळे त्याचा प्रसार जेवढया झपाट्याने होत आहे तेवढ्याच वेगाने रुग्ण बरेही होत होते. त्यामुळे अनेकांच्या शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण होण्यास मदत झाली. असे असले तरी जेष्ठ नागरिक व विविध व्याधींनी त्रस्त असलेल्या लोकांसाठी विशेष खबरदारी घेणे गरजेचे ठरले होते. मुंबईसारख्या महानगरात घराघरात सर्दी, खोकला, ताप याचे रुग्ण आढळत होते. तसेच यातील प्रत्येकाची चाचणी केल्यास अंदाजे ७० टक्के लोकांना कोरोना आढळेल अशी परिस्थिती होती. असे असले तरीही फारच कमी लोकांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता भासली. तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी मुंबई, पुण्यासह अनेक महानगरात आरोग्य व्यवस्था सज्ज करण्यात आली होती, परंतु त्याचा फारसा उपयोग झालाच नाही. सरकारने उभारलेल्या जंबो कोव्हिड रुग्णालयाचा कारभार आता गुंडाळावा लागत आहे. बहुतांशी रुग्ण घरीच क्वॉरंटाईन होऊन बरे होत आहेत किंवा बरेच जणांना कोरोना होऊन गेल्याची लक्षणेही दिसत नाहीत. त्यामुळे मुंबईत कोरोनासाठी असलेल्या खाटांपैकी २० टक्के खाटांवर रुग्णांनी भरल्या व अन्य खाटा रिकाम्याच राहिल्या. सरकारने गर्दीच्या ठिकाणांवर बंदी घालण्याचे काम केले. कोरोनाच्या काळात अनावश्यक ठिकाणी, कामाशिवाय गर्दी करण्याचे दिवस नाहीत हे लक्षात ठेवले पाहिजे. मात्र मुंबईचा लोकल प्रवास हा गर्दीचा आहे, तेथील गर्दी टाळता येणार नाही. सरकारचा लॉकडाऊनचा विचार दिसत नव्हता. लॉकडाऊनने फार काही साध्य होत नाही, उलट नुकसानच जास्त होते हे यापूर्वीच्या लॉकडाऊनने उमगले होते. त्यामुळे सर्वच अर्थकारण ठप्प होते व ज्यांचे हातावर पोट आहे, त्यांना उपाशी मरण्याशिवाय काहीच पर्याय राहात नाही. आपल्याकडे अशी लोकसंख्याही फार मोठी आहे. त्यामुळे आता कुठल्याही परिस्थितीत लॉकडाऊन कोणालाच नको होते. सरकारला व जनतेलाही नको होते. मात्र रुग्णसंख्या वाढल्यास लॉकडाऊन शिवाय काही पर्याय राहात नव्हता. मात्र तशी वेळ तिसऱ्या लाटेत काही आली नाही. आपल्याकडे पहिल्या व दुसऱ्या लाटेत लॉकडाऊनचे अनेक वाईट परिणाम जनतेला भोगावे लागले. अमेरिका, युरोपातील देशांनी लॉकडाऊन आपल्यासारखे कधीच लादले नाही, मात्र निर्बंध जबरदस्त कडक केले होते. त्यांच्याकडे लॉकडाऊन असे म्हटले तरी गर्दी रोखण्यासाठी केलेले उपाय असाच होता. त्यामुळे या विकसीत देशांनी आपले अर्थकारण थांबणार नाही याची कोरोना काळातही दखल घेतली. त्याविरुध्द आपल्याकडे लॉकडाऊन म्हणजे सर्व व्यवहार शंभर टक्के बंद असा पर्याय स्वीकारला. याचा परिणाम आपल्याकडील अर्थव्यवस्था ठप्प होण्यात झाली. याचा फटका सर्वच थरातील जनतेला बसला. सरकारलाही त्यांचे उत्पन्न बुडल्याने मोठा फटका बसला. त्यातून अर्थव्यवस्थेची गाडी आता कुठे रुळावर येत आहे, अशा स्थितीत पुन्हा लॉकडाऊन लागल्यास कठीण पाळी जनतेवर व देशावर आली असती याबाबत काही शंका नाही. सध्याच्या कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटमध्ये आजारी पडणाऱ्यांचे प्रमाण मोठे असले तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही जास्त आहे. त्यामुळे काही तज्ज्ञांच्या मते हा व्हेरियंट एखाद्या साध्या तापासारखा ठरण्याची शक्यता जास्त आहे. या रुग्णांची पाहाणी करुन जे अभ्यास प्रसिध्द झाले आहेत, त्यानुसार या व्हेरियंटव्दारे जे आजारी पडत आहेत, त्यांच्या जीवाला फारसा धोका नाही. पुढे चालून काही तज्ज्ञांच्या मते, हा आजार झपाट्याने सर्वांमध्ये पसरुन त्याव्दारे जनतेची प्रतिकारशक्ती वाढेल व एकूणच या रोगाचा समारोप होईल. अगदी शंभर टक्के समारोप झाला नाही तरी त्याचा प्रभाव कमी होईल व अन्य संसर्गजन्य रोगांप्रमाणे त्याचे स्वरुप भविष्यात राहिल. अर्थात हे सर्व अंदाज आहेत, त्यामुळे खरे होतीलच असे ठामपणाने सांगता येत नाहीत. भविष्यात आपल्याला कोरोनाशी लढा देण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढविला पाहिजे, आपल्याकडे लवकरात लवकर शंभर टक्के लसीकरण कशा प्रकारे होईल त्याची आखणी केली पाहिजे. त्याचबरोबर मुलांच्या सुरु झालेल्या लसीकरणानेही वेग पकडला पाहिजे. तसेच बुस्टर डोस देण्यासंबंधी सर्व तयारी पूर्ण झाली पाहिजे. केवळ ६० वर्षावरील नव्हे तर ज्यांचे दोन डोस पूर्ण झाले आहेत त्या सर्वांनाच बुस्टर डोस दिला गेला पाहिजे. येत्या वर्षात सर्वांना बुस्टर डोस देण्याचे उष्दिष्ट बाळगले पाहिजे. ही उपाययोजना करीत असताना सध्या ज्यांना लक्षणे आहेत त्यांचीच तपासणी करण्याकडे सरकारने लक्ष्य पुरविले पाहिजे. कारण ज्यांना लक्षणे नाहीत अशांची चाचणी करण्यापेक्षा ज्यांना लक्षणे आहेत त्यांना तपासून सरकारने जास्त फोकस राहिले पाहिजे. लॉकडाऊन न लादता जे उपाय योजले पाहिजेत त्याची आखणी राज्य सरकारने आता केली पाहिजे. जनतेनेही आता आपली जबाबदारी ओळखून वागले पाहिजे. मास्क वापरणे, अनावश्यक गर्दीची ठिकाणे टाळणे हे जनतेच्या हाती आहे. त्याची कडक अंमलबजावणी करणे हे जनतेच्याच हाती आहे. कोरोना अजून किती वर्षे चालेल हे आता काही सांगता येत नाही, त्यामुळे जे आपल्या हाती आहे, त्यानुसार कोरोना पसरु नये यासाठीची कडक अंमलबजावणी केली पाहिजे. २०२२ साली कोरोना संपेल असा अनेकांचा अंदाज होता, परंतु कोरोना अजून काही काळ सुरु राहिल असा अंदाज आहे. एवढ्या प्रदीर्घ काळ आपण अर्थकारण ठप्प ठेऊ शकत नाही. त्यामुळे काम करता करता, कोरोनाशी लढा दिला पाहिजे.

Related Posts

0 Response to "कोरोना उतरणीला..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel