-->
सुख, दुख:च्या सावटातली दिवाळी...

सुख, दुख:च्या सावटातली दिवाळी...

31 ऑक्टोबर २०२१ च्या मोहोरमधील चिंतन सुख, दुख:च्या सावटातली दिवाळी... कोरोनाच्या लाटेतली ही यंदाची दुसरी दिवाळी. सध्या कोरोना कमी होत असल्याचे दिसत असले तरीही अजून कोरोना पूर्णपणे संपलेला नाही, त्यामुळे अजूनही खबरदारी बाळगण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे यंदाही दिवाळी जोश-जल्लोशात काही साजरी करता येणार नाही. अर्थातच यातच सर्वांचे भले आहे. दिवाळी म्हणजे आशा, आकांक्षा वृध्दींगत करणारा दिव्यांचा, प्रकाशाचा सण. आपल्या मनात असलेले दुख:, निराशा क्षणभर विसरुन आपण हा सण साजरा करतो. यामागे भावना असते ती आगामी चांगल्या भविष्यवेधी कालखंडाची, उष:कालाची. दिवाळीचा सण साजरा करीत असताना आपल्या मनात नेहमी आनंदच असतो. शेतकरी खुषीत असतो कारण या काळातच पीक चांगलेच बहरुन आलेले असते. कामगारांनाही बोनस मिळाल्याने खिसा गरम असतो. जवळजवळ प्रत्येक वर्गाला दिवाळीत हायसे वाटावे असे वातावरण असते. यंदा तर शेअर बाजारात जबरदस्त तेजी आहे. कोरोनानंतर आता अर्थव्यवस्था सावरु लागल्यावर अर्थव्यवस्थेपेक्षा जास्त वेगाने शेअर बाजार व तेथील सट्टेबाज धावू लागले आहेत. अशा प्रकारे दिवाळीत आपण आनंदाचे क्षण जगत असताना वर्षात आलेल्या कडू आठवणी विसरता येत नाहीत. केंद्रात गेल्या सात वर्षात मोदी सरकार अल्यापासून जनतेच्या जीवनात फारसा काही बदल झालेला दिसत नाही. उलट रोजचे जीवन जास्तच कष्टप्रद होत आहे. महागाईचा आलेख तर सतत चढताच आहे. पेट्रोल डिझेलने किंमतीची शंभर पार करुन आता नवनवीन उचांक गाठू लागले आहे. ज्यावेळी सध्याचे सत्ताधारी विरोधात होते त्यावेळी हेच पेट्रोल-डिझेल ५० रुपयांच्या पार गेल्यावर आंदोलन करीत होते. आता मात्र सत्तेत आल्यावर हेच आंदोलक या वाढीचे निर्लज्जपणे समर्थन करीत आहेत. महाराष्ट्र राज्य आपण पुरोगामी म्हणवतो मात्र राजधानीच्या शहरापासून केवळ शंभर किमी अंतरावर कुपोषणाने बालके मृत्यूमुखी पडताना दिसतात. अनेकांचे उघड्यावर पडलेले संसार जिथे फोडणीला तेल नाही, चूल पेटवायला रॉकेल नाही, तिथे दिव्यात घालायला तेल येणार तरी कुठून! संसाराची विस्कटलेली घडी बसवायला अजून किती दिवस किंवा वर्षे जातील कुणास ठाऊक! आज जे दिवाळी आनंदाने साजरी करीत आहेत त्यांनी, ज्यांना दिवाळीचा आनंद उपभोगता येत नाही त्यांची आठवण जरुर केली पाहिजे. अजूनही पंच्याहत्तर वर्षाच्या स्वातंत्र्यानंतरही आपल्याकडे सर्व वाड्यांवस्त्यांवर वीज पोहोचलेली नाही. विदर्भातील शेतकर्‍यांच्या आत्महत्येने त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले. आपल्या पश्‍चात कुटुंबाचे काय हाल होतील याचा जराही विचार न करता धडाधड मृत्यूला कवटाळणार्‍या त्या शेतकर्‍यांच्या घरात या दिवाळीत किती पणत्या पेटतील? आणि पेटल्या तरी त्यांना लगेचच लक्ष्मी प्रसन्न होईल? कशी असेल त्यांच्या घरची दिवाळी?
कोरोनामुळे गेल्या दीड-दोन वर्षात अनेक मुले पोरकी झाली आहेत, अनेक स्त्रिया विधवा झाल्या आहेत, कुपोषणाचे प्रमाण वाढले आहे. त्यांच्यासाठी ही दिवाळी म्हणजे अंधकारमयच ठरली आहे. दिवाळीच्या स्वागतासाठी आकाशाच्या दिशेने दिवा सोडताना आपण तो नेमका कोणासाठी लावत आहोत? याची जाणीव आपल्याला राहिली आहे का? जिथे आधीच प्रकाशाचे साम्राज्य आहे, तिथे आणखी झगमगाट करण्यात काय अर्थ आहे? मग अंधार नेमका आहे कुठे? किंबहुना अंधार कोठे आहे, याचा विचार करण्याइतकीही वेळ आपल्याकडे राहिलेली नाही किंवा जाणीवपूर्वक त्याचा विचार आपल्याला करायचा नाही. ही वस्तुस्थिती आहे. सरकारला मग ते सरकार केंद्रातले असो किंवा राज्यातले त्यांना अशा उपेक्षितांचे प्रश्‍न सोडवायचे आहेत हे त्यांनी लक्षात घ्यावे. गेल्या काही वर्षात मोठी अपेक्षा घेऊन सत्तेत आलेल्या केंद्रातील मोदी सरकारच्या स्थापनेनंतरही सर्वसामान्यांच्या जीवनात फारसा काही फरक पडलेला नाही. सुरुवातीला नोटबंदी, त्यानंतर जी.एस.टी. चा बोजा, त्यानंतर कोरोनाचे जागतिक संकट, त्यातून सावरण्यासाठी सरकारची तटपुंजी मदत या सर्व पार्श्वभूमीवर यंदाची दिवाळी फारशी काही उत्साहाची नाही. दिवाळीच्या या प्रकाशात अंधाराची चर्चा कशाला? असा प्रश्‍न अनेकांना पडला असेल. मुंबईसारख्या महानगरात तर सतत आकाशदिव्यांचा झगमगाट असतो, पण दिवाळीच्या दिवसांत सर्वत्र आकाशदिव्यांच्या रांगा उजळल्या असतानाच लालबत्तीच्या भेसूर प्रकाशाआड ओथंबलेल्या अश्रूंचा ओलावा कधी कोणाला जाणवतो? जव्हार मोखाड्याच्या पाड्यांवर कुपोषणाचे संकट कायम असते. तिथल्या निष्पाप जीवांना प्रकाशाचा खरा अर्थ सांगण्याची हीच वेळ आहे, असे आपल्याला कधीच कसे वाटत नाही? राजाला रोजच दिवाळी असते आणि दीनदुबळ्यांसाठी रोजच शिमगा असतो. त्यांच्या वाट्याला वर्षातून किमान एक दिवस प्रकाशाचा किरण पसरावा यासाठी आपल्या संवेदना कधीच कशा हेलावत नाहीत? एका टोकाला चंगळवादाचा कळस गाठला जात आहे, दुसरीकडे याकडे अचंबित आणि हतबलपणे पाहणारे गरीब, अश्राप जीव दिसत असतात. शेजारच्या अंधाराचे भान आपल्याला नसते. या दीपावलीत लक्ष दिव्यांच्या ज्योतीचे तेज उधळीत दीपावलीचे आगमन व्हावे आणि सृष्टीलाच चैतन्याचे स्वप्न पडावे, अवघ्या भूतलावर आनंदाच्या रंगाचीच बरसात व्हावी, त्याप्रमाणे मनामनाचे कोपरे या आनंदसरींनी न्हाऊन निघावे, असे आपल्याला वाटत असले तरीही प्रत्येकाकडे हे वातावरण नाही हे लक्षात ठेवले पाहिजे. दैनंदिन व्यापांचा क्षणभर विसर पडून मांगल्याच्या पदकमलांनी अंत:करण निर्मल व्हावे. कोणा दु:खितांच्या काळजावर या आनंदाची फुंकर मारावी. दुभंगलेली मने सांधण्यासाठी दिवाळीच्या महाउत्सवाचे सुंदर निमित्त व्हावे. दिवाळी वर्षातील तीनशे पासष्ट दिवस सुख-दु:खाच्या पाठशिवणीचा आणि थंडी, वारा, ऊन, पाऊस, प्रतिकूलता या सगळ्याचा सामना केल्यानंतरच येते कारण दिवाळी प्रत्येकाचा मनातील आशादीप चिरकाल प्रकाशमान करण्यासाठी येते. अशा प्रकारे एकीकडे अंधार असताना या जगात काही प्रकाशमान बाबीही घडत असतात. त्याच बाबी उराशी बाळगून आपण हा प्रकाशाचा उत्सव साजरा करु या.

0 Response to "सुख, दुख:च्या सावटातली दिवाळी..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel