-->
प्रकाशाचा उत्सव

प्रकाशाचा उत्सव

गुरुवार दि. 19 ऑक्टोबर 2017 च्या अंकासाठी अग्रलेख 
------------------------------------------------
प्रकाशाचा उत्सव
यंदा पाऊस चांगला झाल्याने देशातील एकूण वातावरण उत्साहाचे आहे. गेल्या दोन वर्षात देशावर दुष्काळाचे सावट होते. अल् मिओच्या सावटामुळे पाऊस गेली दोन वर्षे कमी झाला होता, त्यामुळे दुष्काळ होता. आता मात्र पाऊस बर्‍यापैकी समाधानकारक आहे. गेल्या दोन वर्षात दुष्काळाच्या वातावरणामुळे दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात काही साजरा झाला नव्हता. यंदा मात्र चांगल्या पावसामुळे काहीसे चित्र पालटण्यास मदत झाली आहे. उद्योग क्षेत्रात अजून चैतन्य आलेले नाही. अर्थात ही स्थिती केवळ आपल्याकडील नाही तर जगातील आहे. जगातील मंदीचे चक्र अद्याप पूर्ण झालेले नाही. अमेरिकेत हळूहळू मंदीच्या स्थितीत सुधारणा होते आहे, अशी स्थिती आहे. मात्र अर्थव्यवस्था उभारी घेत आहे, असे वाटते व पुन्हा एकदा मंदीचे चक्र वेग घेते. आपल्याकडे मध्यमवर्गीयांची संख्या मोठी असल्यामुळे व या वर्गाकडून सतत खरेदीचा ओघ सुरु असल्याने अर्थव्यवस्थेला चालना मिळत असते. आपल्याकडे पगारदार मध्यमवर्गाची स्थिती थोडी बरी झाली आहे. गेल्या वर्षीची दिवाळी झाली आणि सरकारने नोटाबंदी केली आणि आपल्या अर्थव्यवस्थेची गती रोखली गेली. अर्थात यामुळे काळा पैसा बाहेर पडेल हे उद्दिष्ट काही साध्य होऊ शकले नाही. नोटाबंदीमुळे अतिरेकी कारवायांना आळा बसेल, खोटा नोटा बाद होतील व काळा पैसा बाहेर येईल या तीनही बाबी फ्लॉप ठरल्या. त्यानंतर जी.एस.टी.चा घोळ सुरु झाला. जी.एस.टी.ही जगाने मान्य केलेली करपध्दती आपण आता स्वीकारली आहे. मात्र त्यासाठी दीमेपावले उचलणे गरजेचे होते. मात्र सरकारने याच्या अंमलबजावणीत घाई केल्याने अनेक प्रश्‍न भेडसावित आहेत. परिणामी दिवाळीत तरी फारसा पैसा खर्च केला गेला नाही. यंदाच्या दिवाळीत आपल्याकडे बाजारात बर्‍यापैकी शुकशुकाट दिसतो. त्यातच सध्या बरीच मोठी बाजारपेठ ऑनलाईन कंपन्यांनी काबीज केल्यामुळे प्रत्यक्ष दुकानात जाऊन खरेदी करणार्यांची संख्या घटत चालली आहे. यंदा पावसाने शेतकर्‍यांची दुष्काळाची चिंता मिटवली असली, तरी पिकाला भाव काय मिळेल ही त्याच्या मनात धास्ती आहेच. आपला देश सर्वात तरुण असल्याचे मोठ्या अभिमानाने सांगतो, मात्र या तरुणांच्या हाताला रोजगार देण्याची जबाबदारी सरकारची आहे. त्यातच अशिक्षित बेेकार आहेत त्यांना रोजगार पुरविणे हे सरकारपुढील एक मोठे आव्हान असणार आहे. हे आव्हान सरकार कसे पेलते यावर बरेचसे अवलंबून राहिल. मेक इन इंडिया अंतर्गत मोठी गुंतवणूक देशात येणार अशी हवा निर्माण केली गेली. परंतु प्रत्यक्षात अजून काहीच हाती लागलेले नाही. मेक इंडिया अंतर्गत फॅक्सकॉन ही कंपनी महाराष्ट्रात पाच अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली गेली. परंतु आता या कंपनीने या प्रस्तावाबाबत माघार घेतल्याने सरकारची मोठी गगोची झाली आहे. उद्योगांना सिंगल विंडो पध्तीने परवाने देण्याच्या केवळ घोषणा करतो, मात्र प्रत्यक्षात तसे काही होत नाही. त्यामुळे अनेक उद्योजक नाराज आहेत. आपल्याकडची लाल फितीची नोकरशाही कधी कमी होणार हा खरा सवाल आहे. जागतिक बँकेच्या नव्या अहवालात व्यवसाय करण्यास सुयोग्य देशांच्या यादीत 190 देशांमध्ये भारताचा क्रमांक 130वा लागला आहे. मागील वर्षापेक्षा फक्त एक पायरी भारत वर चढला. त्यामुळे आपण किती मागे आहोत ते दिसते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या तीन वर्षात जगभर दौरे काढून गुंतवणूकदारांना भारतात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले परंतु भारतात गुंतवणूक करण्यास पोषक वातावरणच नाही. हे फॅक्सकॉनच्या एक्झीटमुळे पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे.  तसेच गेल्या दोन वर्षांत नियम-कायदे यामध्ये बर्‍याच सुधारणा करूनही इतकी कमी प्रगती कशी झाली, असा प्रश्‍न पंतप्रधान कार्यालयाला पडला आहे. परंतु, डोळसपणे पाहिले तर लहान-मोठ्या शहरांतून आजूबाजूला जे दिसते त्याचे योग्य प्रतिबिंब या अहवालात पडल्याचे लक्षात येते. चीनने आपल्या तुलनेत ज्या झपाट्याने प्रगती केली आहे त्याचे मॉडेल आपण डोळ्यापुढे ठेवून काम करण्याची गरज आहे. दिवाळीच्या मंगल समयी आपण आपले भविष्य कसे उज्वल होईल याचा विचार केला पाहिजे. दिवाळी हा केवळ दिव्यांचा सण नाही तर तो उत्साहाचा सण आहे. भविष्याचा विचार करताना आपल्या देशातील अंध:कार मिटविण्यास आपण आत्तापासून प्रयत्न केले पाहिजेत. या देशातून गरीबी, दारिद्र्‍य, बेकारी संपविण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. आशिया खंडातील एक प्रगत देश व उत्तम गुंतवणुकीचे स्थळ म्हणून आपले नाव पुढे आल्यास आपण झपाट्याने प्रगती करु शकतो. हे करण्यासाठी सर्वांच्या एकजुटीची गरज आहे. दिवाळीच्या मंगल समयी आपण गरिबीचा, दारिद्य्राचा अंध:कार मिटविण्याचा संकल्प केल्यास आपण खूप काही साध्य केले असे म्हणू शकू. अर्थात हे काम सोपे नाही. चीनी मालावर बहिष्कार, पाक क्रिकेटपटूंवर, कलाकारांवर बंदी यासारख्या झटपट लोकप्रिय होणार्‍या घोषणा करुन आपणच कसे राष्ट्रप्रेमी आहोत याची चढाओढ करण्यापेक्षा प्रत्यक्ष देशासाठी प्रत्येकाने काही ना काही तरी ठोस केले पाहिजे. आपल्या देशातल्या प्रत्येक नागरिकाला वैचारिक स्वातंत्र्य आहे, त्याला विरोधी मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. आपल्या लोकशाहीचा हा गाभा आहे. दिवाळीच्या मंगल समयी याची आची आठवण ठेवण्याची आवश्यकता आहे.
-------------------------------------------

0 Response to "प्रकाशाचा उत्सव"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel