-->
रणकंदन

रणकंदन

रविवार दि. 08 जानेवारी 2017 च्या मोहोरसाठी लेख --
-------------------------------------------
रणकंदन
--------------------------------------------
एन्ट्रो- देशातील सर्वात मोठे राज्य उत्तरप्रदेश, सर्वात छोटे असलेले गोवा, सत्तापालटामुळे गाजलेले उत्तराखंड, उत्तरपूर्वेकडील मणिपूर व गेल्या काही महिन्यात विविध बाबतीत चर्चेत राहिलेले पंजाब या पाच राज्यात ही निवडणूक होऊ घातली आहे. देशातील एक पंचमांश लोकसंख्या यासाठी मतदान करण्यार असल्यामुळे त्यांचा कौल काय असेल हे सर्वच पक्षांसाठी महत्वाचे ठरणार आहे. नोटाबंदीनंतरची ही देशातील महत्वाच्या राज्यातील ही पहिलीच निवडणूक आहे, त्यामुळे सरकारविषयी मत व्यक्त करण्याची संधी या 690 मतदारसंघातील 16.8 कोटी मतदारांवर आयती चालून आली आहे...
------------------------------------------------
आपल्या देशात दर दोन वर्षांनी एक महत्वाची निवडणूक येते. अर्थात त्यामुळे जनतेला आपला कौल व्यक्त करण्याची संधी मिळते. आता देखील पाच राज्यातील विधानसभेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. देशातील सर्वात मोठे राज्य उत्तरप्रदेश, सर्वात छोटे असलेले गोवा, सत्तापालटामुळे गाजलेले उत्तराखंड, उत्तरपूर्वेकडील मणिपूर व गेल्या काही महिन्यात विविध बाबतीत चर्चेत राहिलेले पंजाब या पाच राज्यात ही निवडणूक होऊ घातली आहे. देशातील एक पंचमांश लोकसंख्या यासाठी मतदान करण्यार असल्यामुळे त्यांचा कौल काय असेल हे सर्वच पक्षांसाठी महत्वाचे ठरणार आहे. नोटाबंदीनंतरची ही देशतील महत्वाच्या राज्यातील ही पहिलीच निवडणूक आहे, त्यामुळे सरकारविषयी मत व्यक्त करण्याची संधी या 690 मतदारसंघातील 16.8 कोटी मतदारांवर आयती चालून आली आहे. सध्या भाजपा हा नरेंद्र मोदी या एकाच व्यक्तीवर चालत आहे. नरेंद्र मोदी यांचे असलेले यश-अपयश हे भाजपासाठी महत्वाचे ठरणार आहे. आजवर अनेकदा मोदी स्वत: निर्णय घेतात आणि नंतर पक्षातील लोक माना डोलावतात अशी स्थीती आहे. त्यामुळे जर मोदींचा एखादा निर्णय जरी चुकला तरी त्यांच्यावर पक्षातील अनेक डूक धरुन बसलेली मंडळी त्याचा वचपा काढावयास तयार आहेत. गेल्या वेळी बिहारच्या बाबतीत भाजपाला म्हणजे मोदींना सपाटून मार खाला लागला. मात्र त्यावेळी  त्यांच्या पक्षातील विरोधी गटातील मंडळींनी उचल खाल्ली नाही. मात्र आता जर उत्तरप्रदेश हातातून निसटले तर मोदींना पक्षातून विरोध सुरु होईल, त्यामुळे मोदींच्या दृष्टीने ही निवडणूक महत्वाची ठरणार आहे. सत्ताधारी भाजपाच्या राजवटीला जवळपास अडीज वर्षे पूर्ण होत आहेत, म्हणजे त्यांनी आपला कार्यकाल अर्धा पूर्ण केला आहे. निवडणूका असलेल्या पाच राज्यापैकी केवळ गोव्यात एकहाती सत्ता भाजपाकडे आहे व पंजाबात अकाली दलाबरोबर भाजपा सहकारी पक्ष आहे. अन्य दोन राज्यात म्हणजे मणिपूर, उत्तराखंड येथे काँग्रेस सत्तेत आहे. तर 403 जागा असलेल्या उत्तरप्रदेशात समाजवादी पक्ष सत्तेत आहे. उत्तरप्रदेशात भाजपा यावेळी मुसंडी मारणार का? हा महत्वाचा सवाल आहे. उत्तरप्रदेशात भाजपाकडे गेली 14 वर्षे सत्ता नाही. तर एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या कॉग्रेस पक्षाकडे तर गेली 27 वर्षे सत्ता नाही. त्यामुळे यावेळी राहूल गांधी करिष्मा करुन कॉग्रेसच्या हाती सत्तेच्या चाव्या आणणार का, हा प्रश्‍न आहे. मात्र कॉग्रेससाठी ही निवडणूक काही सोपी नाही. राज्यात रोड शो करुन राहूल गांधी यांनी प्रयत्न जोरात केले आहेत. परंतु अजूनही समाजमन कॉग्रेसच्या विरोधात आहे. त्यामुळे कॉग्रेस या महत्वाच्या राज्यात चौथ्या क्रमांवर फेकला जाण्याची शक्यता जास्तच आहे. या निवडणुकीचा देशाच्या आगामी काळातील राजकारणावर परिणाम होणार आहे. येत्या जुलै महिन्यात राष्ट्रपतीपदाची निवडणूक येऊ घातली आहे. यात जर भाजपाला आपल्याला पाहिजे तो राष्ट्रपती करावयाचा असेल तर उत्तरप्रदेशात जास्तीत जास्त जागा मिळवाव्या लागतील. त्यामुळे भाजपाला जास्त उमेदवार राज्यसभेत पाठवून आपले बहुमत मिळवावे लागेल. समाजवादी पक्षातील सध्या भांडणे विकोपाला पोहोचली असून पक्षात उभी फूट पडण्याच्या मार्गावर आहे. अशा स्थितीत त्याचा फायदा मायावती उठविण्याच्या प्रयत्नात आहेत. कारण समाजवादी पक्षाकडील मुस्लिम व यादव मते कोणाच्या पारड्यात पडतात त्यावर मायावती किंवा भाजपाचा विजय होऊ शकतो. सत्ताधारी पक्षातील यादवीने भाजपच्या गोटात काहीशी चिंता आहे, त्याचबरोबर मुस्लीम मतांचे होणारे ध्रुवीकरण हा भाजपासाठी चिंतेचा विषय असेल. गोव्यात नव्याने प्रवेश करीत असलेल्या आम आदमी पक्ष कितपत यशस्वी ठरेल, हे देखील बघणे महत्वाचे आहे. तसेच कॉग्रेससाठी येथे कठीण काळ असला तरीही पुन्हा एकदा इथे कॉग्रेसची सत्ता येणार का, असाही प्रश्‍न आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बंडखोर सुभाष वेलिंगकर यांच्या नव्या पक्षाचा फटका गोव्यात भाजपला फटका कसा बसतो याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. गोव्यात भाजप 37 जागा लढणार आहे तर तीन मतदारसंघांत अपक्षांना पाठिंबा देणार आहे.  महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष कोणाशी आघाडी करतो यावर काही जागांचे भवितव्य ठरेल. पारंपरिक मतांच्या जोरावर काँग्रेसचा सत्तेसाठी प्रयत्न चालला आहे. वेलिंगकर यांचा भाषा मंच व शिवसेना युतीच्या कामगिरीबाबत उत्सुकता आहे. गोवा हे लहान राज्य असले तरी येथील ख्रिश्‍चन मते कुणाला जातात यावर भाजपाचे भवितव्य असेल. यापूर्वी कॉग्रेस त्यांच्याच मतांवर निवडून आलेली आहे. गेल्यावेळी ही मते कॉग्रेसपासून दुरावली होती. आता तरी ही मते काँग्रेसकडे परततील का? याकडे अनेकांचे लक्ष आहे. ही मते भाजपासून दूर गेल्यास अल्पसंख्यांक भाजपावर निराज असल्याचे चित्र स्पष्ट होईल. त्यादृष्टीने गोव्याच्या निवडणुकीस महत्व आहे. पंजाबमध्ये अकाली दल आणि भाजप युती सरकारच्या विरोधातील वातावरणाचा फायदा काँग्रेस की आम आदमी पार्टी उठविते याचीही उत्सुकता राहणार आहे. पंजाब सद्या एका मोठ्या आर्थिक व सामाजिक बदलातून जात आहे. हरित क्रांतीनंतर येथे सुबत्ता आली खरी परंतु अतिरेकी कारवाया 80च्या दशकात वाढल्या. त्याला थेट विदेशी हस्तक्षेप कारणीभूत होता. त्यानंतर सुवर्णमंदीरात कारवाई झाल्यानंतर पंजाब थंड होत गेला खरा परंतु सध्या तेथे तरुण पिढी व्यसनाच्या अधीन गेली आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या उडता पंजाबमध्ये याचे चित्रण दाखविण्यात आले होते. हे प्रश्‍न सोडविण्यात भाजपा-अकाली दल युती त्यात सफशेल अयशस्वी ठरली आहे. त्यामुळे याचा फायदा काँग्रेस की आम आदमी पार्टी उचलणार का, हे पहावे लागेल.
सध्या सुरू असलेल्या हिंसाचाराच्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर मणिपूरमध्ये काँग्रेस सरकारसमोर सत्ता टिकविण्याचे मोठे आव्हान आहे. लष्कराला देण्यात आलेल्या जागा अधिकारांच्या विरोधात 16 वर्षे उपोषण केलेल्या इरोम शर्मिला यांनी मुख्यमंत्री ओक्रम सिंग यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याचे जाहीर केले आहे. मणिपूरचे मुख्यमंत्रिपद ही शर्मिलाची महत्त्वाकांक्षा आहे. उपोषणाच्या मार्गाने प्रश्‍न मिटत नसल्याने शर्मिलाने राजकीय मार्गाने उपाय काढण्याचा निर्णय घेतला. शर्मिलाचे नेतृत्व मणिपूरचे जनता स्वीकारते का, हे देखील पहाणे महत्वाचे आहे. सत्ताधारी भाजपाप्रमाणे व्यक्तीश: नरेंद्र मोदी यांची मोठी कसोटी लागणार आहे. कॉग्रेससाठी देखील प्रामुख्याने पक्षाच्या अध्यक्षपदाची सुत्रे स्वीकारण्यासाठी सज्ज असलेल्या राहूल गांधी यांची या निवडणुकीत कसोटी लागेल. उत्तरप्रदेशासारख्या मोठ्या राज्याच्या नेतृत्वापदी असलेले सर्वात तरुण मुखयमंत्री अखिलेश यादव यांना हे राज्य आपल्याकडे टिकविण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे. यात आता कोण यशस्वी होते ते पहायचे.
-----------------------------------------------------------------------

0 Response to "रणकंदन"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel