-->
काळाचा महिमा

काळाचा महिमा

रविवार दि. १० एप्रिल २०१६ च्या मोहोरसाठी लेख --
-------------------------------------------
काळाचा महिमा
-----------------------------------
बिहारमध्ये सर्व सेक्युलर पक्षांनी एकत्र येऊन भाजपाचा एकदिलाने पाडाव केला. हीच परिस्थिती प्रत्येक राज्यात व नंतर देशपातळीवर झाली तर देशातील सत्ताधार्‍यांना सत्ताभ्रष्ट करणे काही कठीण जाणार नाही. हे सत्य नितिश कुमार-लालूप्रसाद यादव यांनी बिहारमध्ये प्रत्यक्षात घडविले. यातील दुसर्‍या टप्प्यात हाच प्रयोग बिहारमध्ये केला जात आहे. कॉँग्रेस व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांसह डाव्या पक्षांनी एकत्र येऊन आघाडी स्थापन केली आहे व सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का दिला. आश्‍चर्य यासाठीही की पश्‍चिम बंगालमधील गेली कित्येक वर्षे हाडवैरी म्हणून हे दोन्ही पक्ष ओळखले जात होते. परंतु देशातील एका वेगळ्याच राजकीय परिस्थितीने त्यांना एकत्र आणले आहे. केवळ अशक्यच वाटेल अशी ही घटना आहे. काळाचा राजकीय महिमा अघाद आहे असे म्हणता येईल. भाजपा केंद्रात सत्तेत आल्यापासून सेक्युलरवाद मानणार्‍या पक्षांना एकत्र येणे ही काळाची गरज वाटू लागली आहे. कारण भाजपाने व त्यांची मूळ संघटणा असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेने देशात झपाट्याने बदल करण्याचे ठरविले आहे. या देशाची घटना बदलण्याचा घाट घातला जात आहे. देशाची जी सेक्युलर चौकट आहे ती मोडून त्या जागी हिंदुत्वाची पताका फडकाविण्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा व भाजपाचा इरादा आहे. आपल्याला जनतेने विकासाच्या मुद्यावर निवडून दिले आहे हे वास्तव भाजपाचे नेते कधीच विसरले आहेत. आपले शेजारचे देश नेपाळ व बांगला देश हे सेक्युलर झाले असताना आपण मात्र हिंदुत्वाच्या दिशेने कूच करीत आहोत. देशातील जनतेला हे कदापी सहन होणार नाही. आपल्या देशाच्या एकसंघ राहाण्यात सेक्युलर तत्वाचा मोठा वाटा आहे. यासाठीच सर्वच सेक्युलर पक्षांनी आपले परस्परातील मतभेद विसरुन एकत्र येण्याची गरज आहे. हा विचार प्रथम मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत बिहारने रुजविला. आता पश्‍चिम बंगालमध्ये याची पुन्हा पेरणी झाली आहे. याचे शिल्पकार हे राहूल गांधी व सिताराम येचुरी हे ठरणार आहेत. सध्या पश्‍चिम बंगालमधील या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते यापूर्वीचे आपले मतभेद विसरुन एकदीलाने काम करीत आहेत. त्यामुळे इकडे एक वेगळे चित्र बिहारप्रमाणे दिसेल अशी अपेक्षा वाटते. कॉँग्रेस व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांना काळाने एकाच व्यासपीठावर आणले आहे. सुरुवातीला कॉँग्रेसशी हात मिळवणी करायला माकप मनापासून तयार नव्हता. मात्र माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी या कामी पुढाकार घेतला. सुरुवातील माकपच्या पश्‍चिम बंगाल युनिटमध्ये यासंबंधी स्पष्टपणे दोन तट पडले होते. मात्र नंतर यासंबंधी एकमत आणण्यात येचुरी यांना यश आले व उभय पक्षांनी एकत्रितपणे निवडणूक लढविण्याचे ठरविले. अखेर या दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन जीवाची बाजी लावून ही निवडणूक जिंकण्याची तयारी चालविली आहे. तिकडे ममता बॅनर्जी व भाजपा यांना सत्तेपासून दूर ठेवण्याचा त्यांचा निर्धार आहे. त्यात ते बहुदा यशस्वी होतील असेच दिसते. कॉँग्रेस-माकप हे दोन्ही पक्ष एकत्र येतील असे दिसत नव्हते. परंतु त्या दोघांनाही परस्परांची गरज आहे. अन्यथा ते सत्तेपासून अजून पाच वर्षे दूर राहातील असे वातावरण होते. यु.पी.ए. च्या पहिल्या सरकारला माकपसह सर्व डाव्या पक्षांनी पाठिंबा दिला होता. परंतु त्यांनी एकत्रित येऊन काही निवडणूक लढविली नव्हती. हे दोघे पश्‍चिम बंगालमध्ये एकत्र आलेले असले तरीही केरळात ते मात्र एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. राज्यातील गरजेनुसार युती करण्याचा त्यांनी केलेला हा संकल्प स्वागतार्ह ठरावा. गेल्या वर्षी माकपच्या विशाखापट्टणम येथे झालेल्या पक्षाच्या २१ व्या कॉँग्रेसमध्ये कॉँग्रेससोबत निवडणूक एकत्र लढविण्यास विरोध झाला होता. प्रामुख्याने माकपतील जुन्या फळीतीली नेते व्ही.एस. अच्युतानंद यांनी कडवा विरोध केला होता. परंतु राज्य निहाय पक्षाच्या गरजेनुसार धोरणात लवचिकता आणण्याचे ठरले आणि पश्‍चिम बंगालमध्ये ही आघाडी झाली. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉँग्रसेनेही देखील दिल्लीत कॉँग्रेसबरोबर सत्तेत असताना मेघालयात भाजपाबरोबर राज्यात सत्ता उपभोगली होती. याच धर्तीवर माकप कॉँग्रेससोबत पश्‍चिम बंगाल व केरळात आपली खेळी करीत आहे. त्यात काहीच चूक नाही. कारण सत्तेत राहणे आज माकपच्या दृष्टीने महत्वाचे आहे. कारण पश्‍चिम बंगालमध्ये गेल्या काही वर्षात माकपची मते सतत घटत गेली आहेत. माकपसह डाव्या आघाडीची २००६ साली ४८.४ टक्के असलेली मते २०११ मध्ये ३९.१ टक्क्यावर आली व २०१४ साली सार्वत्रिक निवडणुकात ही मतांची टक्केवारी ३० टक्क्यांवर खाली आली. मात्र कॉँग्रसेची राज्यातील ९ टक्के मते गेली कित्येक वर्षे कायम आहेत. माकप व कॉंग्रेसची मते एकत्र केल्यास मात्र त्यांना सत्तेच्या दारात सहज पोहोचता येते. बिहारप्रमाणे हा प्रयोग पश्‍चिम बंगालमध्येही यशस्वी झाल्यास त्याचे देशात दीर्घकालीन पडसाद उमटतील. प्रामुख्याने महाराष्ट्रातही हा प्रयोग करण्याच्या दृष्टीने पावले पडू शकतात. राज्यात जर कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेस-डावे पक्ष व भाजपा विरोधी पक्ष यांची जर एकत्र आघाडी करण्याची प्रक्रिया सुरु करता येऊ शकते.
--------------------------------------------------

0 Response to "काळाचा महिमा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel