-->
सेक्युलर राजकारणाचा विजय

सेक्युलर राजकारणाचा विजय

संपादकीय पान सोमवार दि. ०९ नोव्हेंेबर २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
सेक्युलर राजकारणाचा विजय

बिहारमधील विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल पाहता, हा निव्वळ पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांचा पराभव नाही, तर तो त्यांच्या हिंदुत्वाच्या राजकारणाचा पराभव आहे. म्हणून या राजकारणाच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या नितीश-लालू-कॉंग्रेस यांच्या महाआघाडीच्या सेक्युलर म्हणजे सर्वधर्मसमभावाच्या राजकारणाचा विजय आहे. अठरा महिन्यांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी विकासाच्या मॉडेलचे आभासी चित्र तयार करुन लोकांना भुलविले व सत्ता काबीज केली. परंतु, या विकासाच्या मॉडेलच्या पाठीमागे छुपा हिंदुत्ववाद होता. हे जसे गेल्या दीड वर्षात उघड होऊ लागले तसे लोकांना मोदी यांचा व सत्ताधारी भाजपचा खरा चेहरा उघड झाला. बिहारच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि लगेचच दादरीची घटना घडली. महत्त्वाचे म्हणजे यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या नेत्यांनी केलेली वक्तव्ये व नरेंद्र मोदी यांचे प्रदीर्घ काळ गप्प राहणे यातून भाजपला या देशात हिंदुत्ववाद आणावयाचा, हे स्पष्टच झाले. त्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांनी राखीव जागांचा फेरआढावा घेण्याचे भाष्य केले आणि या दोन घटनांनंतर एक बाब नक्की झाली की, या देशाची जी सेक्युलर व आजवरची स्वातंत्र्यानंतरची देशाने तयार केलेली जी चौकट आहे तिला छेद देण्याचा प्रयत्न भाजपने सुरु केला आहे. परंतु, देशातील जनतेला हे कदापी पसंत पडणारे नाही. स्वातंत्र्यानंतर आपल्याकडे लोकशाहीची जी पाळेमुळे घट्ट झाली त्यात सेक्युलर राजकारणाचा मोठा वाटा आहे. आपला देश कोणत्याही एका धर्माच्या तालावर नाचू शकणार नाही. आपल्याकडील विविध धर्मीयांची जी एकजूट आहे त्यातून आपण आपली एकसंघ राष्ट्राची संकल्पना रुजविली आहे. यामागे हिंदुत्ववाद नाही. परंतु, सत्ता डोक्यात गेलेल्या भाजपच्या नेत्यांना हे काही पटत नव्हते. आपल्याला पाच वर्षांसाठी निवडून दिले आहे त्यात आपण काहीही करु शकतो, ही त्यांची मिजास होती. ती मिजास आता बिहार निवडणुकांच्या निमित्ताने उतरायला हरकत नाही, असे म्हणता येईल. बिहारला बिमारु राज्य म्हटले जाते. मात्र, तेथील जनता ही चाणाक्ष आहे, हे आपण विसरु शकत नाही. आणीबाणी उठल्यावर जनता पार्टीची सभा ही पाटण्यात जयप्रकाश नारायण यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती. या सभेने  देशात त्याकाळी सोशल मीडिया व टी.व्ही. चॅनेल नसतानाही मोठा झंजावात निर्माण केला. आतादेखील हिंदुत्ववाद की सेक्युलर देश हवा अशी परिस्थिती निर्माण झाली असताना बिहारच्या जनतेने सेक्युलर राजकारणाच्या दिशेने कौल देऊन देशातील राजकारणाची दिशा बदलण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपने यावेळी जाती धर्माचे धुव्रीकरण करुन ही निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न केला. परंतु, दलित व मुस्लिमांची एकगठ्ठा मते ही नितीश-लालू-कॉंग्रेस यांना पडल्याने भाजपचा डाव पूर्णपणे फसला. हिंदूंच्या मतांचे धुव्रीकरण करण्याचा भाजपचा डाव यशस्वी झाला नाही. दादरीसारख्या घटनांमुळे हिंदूंचे धुव्रीकरण करण्याचा भाजपचा बेत होता. त्याचबरोबर या निवडणुकीत बिहारी की बाहरी असेही राजकारण झाले. यात नितीश-लालू यांनी बाजी मारली. पंतप्रधानांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली होती त्यामुळे संपूर्ण मंत्रिमंडळ येथे प्रचारासाठी उतरविण्यात आले होते. तसेच खुद्द मोदी यांनी ३१ प्रचार सभा घेतल्या. आजवर कोणत्याही पंतप्रधानाने राज्याच्या राजकारणात एवढा रस घेऊन निवडणूक सभा घेतल्या नव्हत्या. अमित शहा यांनी ८० च्या वर सभा घेतल्या होत्या. मांझी यांना काही भागात मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले होते. परंतु, त्यांच्याकडे वा राज्यातल्या कोणत्याही नेत्याकडे निवडणुकीची सूत्रे नव्हती. त्यामुळे तुम्ही बिहारी नेता पसंत करणार की बाहेरचा नेता, असा सवाल नितीश-लालू यांनी केला होता. त्याला बिहारी जनतेने मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. गेल्या तीन महिन्यांत २०० च्या वर साहित्यिक, कलाकारांनी देशातील असहिष्णुतेच्या वातावरणाच्या निषेधार्थ आपले शासकीय पुरस्कार परत केले, याचाही अप्रत्यक्ष परिणाम मतदारांवर झाला. गेल्या काही दिवसांत तर असहिष्णुतेच्या मुद्द्यावरुन देश पूर्णपणे ढवळून निघाला असताना ही निवडणूक होती. बिहारी जनतेने मात्र भाजपच्या विरोधात कौल देऊन पुरस्कार परत करणार्‍या साहित्यिक, कलाकारांना मोठे बळ दिले आहे. बिहारच्या विकासाचा मुद्दाही यावेळी प्रामुख्याने चर्चेत होता. नितीशकुमार यांनी गेल्या दहा वर्षांच्या काळात बिहारला विकासाचे एक नवीन परिमाण दिले. त्यांच्या काळात बिहारमध्ये मोठे उद्योग आले नसले तरीही लहान-लहान उद्योगातून रोजगार निर्मिती केली. त्यामुळे बिहारमधून बाहेर रोजगारासाठी जाणार्‍यांची संख्या कमी झाली. कायदा सुव्यवस्थेत चांगली सुधारणा झाल्याने महिलांनी यावेळी मोठ्या प्रमाणात मतदान केले आहे आणि हे मतदान नितीश यांच्याच पदरात पडले. नरेंद्र मोदी हे केवळ गप्पा करतात, आतादेखील त्यांनी बिहारमध्ये अशीच आश्‍वासनांची खैरात केली आहे, अशी मतदारांची पक्की धारण झाली. यातून नितीश यांचे बळ उलट वाढले. अर्थात, ही निवडणूक राज्याची असली तरीही देशाच्या राजकारणाची दिशा बदलणारी ठरणार आहे, हे नक्की.

0 Response to "सेक्युलर राजकारणाचा विजय"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel