-->
संपादकीय पान शुक्रवार दि. २२ ऑगस्ट २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------
योगाचार्य
----------------------------------------------------------
ज्यांनी आपल्या योगसाधनेच्या बळावर जगात शिष्य जोडले व आपले हे पुरातन शास्त्र जगात पोहोचविले त्या योगाचार्य अय्यंगार यांचे निधन हा एका महान पर्वाचा अंत आहे. आयुष्याच्या अखेरीस जगभरात विख्यात झालेले योगाचार्य सुरुवातीला मात्र परिस्थितीशी संघर्ष करतच वाढले. कर्नाटक राज्यातल्या एका छोट्या खेड्यात जन्मलेल्या योगाचार्यांचे बालपण विविध आजारांनी ग्रासलेले होते. ही अवस्था त्यांच्या वयाच्या १४-१५ व्या वर्षापर्यंत कायम होती. सतत कुठल्या ना कुठल्या तरी आजाराने त्यांना घेरलेले असायचे. त्यांची ही अवस्था पाहून त्यांच्या मेहुण्यांनी त्यांना म्हैसूरला एका अधिकारी व्यक्तीकडे योगप्रशिक्षणासाठी नेले आणि हाच अय्यंगार यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा क्षण ठरला. योगाशी तोंडओळख होताच, त्यामध्ये असणारे सामर्थ्य किशोरवयीन अय्यंगारांच्या लक्षात आले. त्यांच्या कुशाग्र बुद्धीने योगप्रशिक्षणाची सर्व अंगे, सैद्धांतकि मांडणी आणि त्याचे प्रयोगरूप आणि अंतिमत: तत्त्वरूप आत्मसात करून घेतले. त्याचे महत्त्व जाणून असल्याने योगाचार्यांनीयोगाचे महत्त्व, सामर्थ्य जनमानसात पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू केला. सुरुवातीला गुरुजींना दाद दिली नाही. त्यांच्या वाट्याला प्रारंभी उपेक्षाच आली. खुद्द पुण्यानेही गुरुजींची योगप्रणाली सुरुवातीला नाकारली होती; पण हळूहळू गुरुजींनी योगाचे महत्त्व प्रात्यक्षिकद्वारे पटवून देण्यास सुरुवात करताच हा विरोध, उपेक्षा मावळत गेली आणि काही वर्षांनी उपेक्षेचे धनी बनलेले गुरुजी पुण्यभूषण सन्मानाचे मानकरी ठरले. पुण्यामध्ये गुरुजींच्या प्रयोगांचे महत्त्व जाणले आणि त्यांच्या योग प्रात्यक्षिकांचे प्रयोग केले. मग सेवाभावी संस्था, गणेशोत्सव या निमित्तानेही गुरुजींचे योग प्रयोग, प्रात्यक्षिके, सदीप व्याख्याने आणि योगवर्ग, योग प्रशिक्षण सुरू झाले आणि हा ओघ विस्तारत गेला. ज्यांनी सुरुवातीला गुरुजींना अव्हेरले होते, त्यांनीच नव्हे, तर सा-या जगाने नंतर गुरुजींना सन्मानाने स्वीकारले. हळूहळू अन्य राज्यांत त्यांची कीर्ती पसरली आणि मग योगाचा मंत्र जगभरात पोहोचवण्याचा प्रयत्न गुरुजींनी सुरू केला. स्वत: गुरुजींचे शालेय वा महाविद्यालयीन शिक्षण झाले नसले, तरी त्यांची देहबोलीच पुरेशी बोलकी असल्याने संवाद साधण्यात त्यांना कधीच अडचण आली नाही. माहिती-तंत्रज्ञानाचे युग सुरू झाल्यावर, तर गुरुजींच्या कार्याची महती नव्या तंत्र-विज्ञान साधनांनी जगाच्या कानाकोपर्‍यात पसरली आणि सर्व खंडांतून शिष्यांचा ओघ गुरुजींकडे आला. योगशास्त्रातील हठयोगाला गुरुजींनी जगभर प्रतिष्ठा मिळवून दिली. खरे तर ही शास्त्रे आपल्या परंपरेने आधीच समृद्ध केली होती, पण कालौघात त्यांची विस्मृती आणि अवहेलनाच सुरू होती. ती गुरुजींनी आपल्या कार्याने थांबवली आणि या शास्त्राला नवे तेज प्राप्त करून दिले. योगाच्या विविध अंगांचा त्यांनी सखोल अभ्यास आणि व्यासंग केला होता. योगसूत्रांचा त्यांनी सोप्या, सुगम पद्धतीने अन्वयार्थ लावून तो ग्रंथरूपाने साधकांसाठी उपलब्ध केल्याने योगाची लोकप्रियता गतीने वाढली. त्यांच्या अगदी प्रारंभीच्या लाइट ऑन योगा, या ग्रंथाच्या जगभरात लक्षावधी प्रती खपल्या. महेश योगी यांनी ध्यानाला जशी जगभर प्रतिष्ठा मिळवून दिली, तसेच अजोड कार्य गुरुजींनी योगाच्या संदर्भात केले. त्यांची शिकवण्याची सहज, सोपी पद्धत, प्रात्यक्षिकांवरील त्यांचा भर, समजावून सांगण्याची शैली आणि योग ही जीवनशैली बनावी, यासाठी त्यांची सुरू असलेली अखंड धडपड, यामुळे जगभरात गुरुजींना हजारो शिष्य लाभले आणि जगभरात सर्वत्र योगाची शेकडो केंद्रे स्थापन झाली. त्यातून गुरुजीप्रणीत योगाचा प्रसार व प्रचार वेगाने होऊ लागला. विशेषत: युवा वर्गात गुरुजी आणि योग अतिशय लोकप्रिय बनले. जयप्रकाश नारायण, जे. कृष्णमूर्ती, व्हायोलिन वादक यहुदी मेनुहिन, आर.के. लक्ष्मण, भाजली पेंढारकर, नसिरुद्दीन शहा, अभिनेत्री तब्बू, मीरा नायर, सचिन तेंडूलकर, अनिल कुंबळे हे सेलिब्रेटी त्यांचे शिष्य झाले. गुरुजींविषयीची आदरभावना व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या कार्याचे मोल अधोरेखित करण्याच्या उद्देशाने जगभरात ३ ऑक्टोबर हा दिवस अय्यंगार डे म्हणून साजरा केला जातो. सामान्य माणसाला योगाद्वारे स्वत:शी, ज्ञानाशी, लौकिक जगाशी आणि अंतरात्म्याशी जोडण्याचे कार्य गुरुजींनी केले. मला तर गुरुजींचा उल्लेख योग पितामह असाच करावासा वाटतो. योगाविषयी त्यांचा आत्मविश्वास चकित करणारा असे. योगाविषयी ते बोलतही अतिशय आवेशपूर्ण पद्धतीने. प्रत्यक्ष वागताना मात्र अतिशय प्रेमळ, आस्थापूर्वक वागत असत. त्यांचे शिक्षण फारसे झाले नसले, तरी योगाचार्य म्हणून त्यांना अनेक विद्यापीठांच्या डॉक्टरेट मिळाल्या. त्यांच्या शिष्यांमध्ये जगभरातले विद्यार्थी, संशोधक, तज्ज्ञ, राजकारणी, क्रीडापटू, उद्योजक, कलाकार... सारेच आहेत. मुख्य म्हणजे त्यांनी आपल्या मुलांनाही या योगाचा वारसा उत्तमरीतीने सुपूर्द केला. गुरुजींनी साधकांना केवळ योगशास्त्राशी जोडले नाही, तर जीवनात जे चांगले, सकारात्मक आहे, त्या सार्‍यांशी जोडण्याचा प्रयत्न केला. शेवटी जे उत्तम, उदात्त, मंगल, मधुर जे, त्याच्याशी जोडले जाण्यातच तर मानवी जीवनाची इतिकर्तव्यता असते. या अर्थाने अय्यंगार गुरुजींनी हजारो साधक अशा योगाने जोडले, समृद्ध केले आहेत. आता ते आपल्यात नसले तरी लोकांच्या मनामनांशी ते कायमचे जोडले गेले आहेत. योगाचार्यांनी जे काम केले त्यातून अनेकांना जिवनदान दिले आहे, अनेकांना आपल्या योगाशी जोडले. त्यांनी केलेले कार्य हे अजोड असेच आहे. जगाने त्यांच्या कार्याची दखल घेतली आणि त्यांना योगाचार्य ही बदवी बहाल केली. जनतेने त्यांना मोठे केले. आज ते आपल्यात नसले तरी त्यांच्या योगाच्या रुपाने ते आपल्यात राहातील.
----------------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel