-->
निकालानंतरचे धडे...

निकालानंतरचे धडे...

रविवार दि. 26 मे 2019 च्या अंकासाठी चिंतन - 
-----------------------------------------------
निकालानंतरचे धडे...
--------------------------------
देशातील लोकसभेच्या झालेल्या निवडणुकात जनतेने पुन्हा एकदा भाजपा म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या बाजुने कौल दिला आहे. विरोधकांसाठी काहीसे अनपेक्षीत असे निकाल असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या निवडणुकीच्या नियोजनाचे हे फलित आहे असे म्हणावे लागेल. जातिय, धार्मिक तेढ निर्माण झाली तरी चालेल परंतु आपल्यालाच सत्ता मिळाली पाहिजे, हे त्यांचे सुत्र यशस्वी झाले आहे. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पश्‍चिम बंगालमध्ये जी तेढ भाजपाने तयार केली ते पाहता मतांचे केंद्रीकरण करण्यात भाजपा यशस्वी होणार हे दिसतच होते. या विजयांचे श्रेय सर्वस्वी मोदी व शहा या दोघांकडेच जाते. गेल्या डिसेंबर महिन्यात कॉँग्रेसने तीन राज्यातील सत्ता काबीज केल्यावर भाजपाला लोकसभा कठीण जाणार हे अंदाज त्यांनी खोटे ठरविले आहेत. आपल्या पक्षाला पराभवातून सावरुन पुन्हा विजयश्रीकडे कसे न्यावयाचे हे मोदी-शहांनी दाखवून दिले आहे. 2014 सालच्या पराभवानंतर कॉँग्रेस म्हणावी तशी या धक्यातून सावरली नाही, अगदी तीन राज्यात विजय मिळूनही कॉँग्रेसची मानसिकता ही पराभूताचीच होती, हे देखील विरोधकांचे दुर्दैवच म्हणावे लागेल. मोदींच्या हुकूमशाही व लोकशाही विरोधी प्रवृत्तीला विरोध करण्यासाठी कॉँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी हरतर्‍हेने प्रयत्न केले परंतु त्यांना त्यात शंभर टक्के यश आले नाही. आपण केवळ सत्ताकारणासाठीच देशात जन्माला आलो आहोत, या कॉँग्रेसच्या गोड गैरसमजुतीलाही मोदींनी छेद दिला आहे. भाजपाच्या विजयाचे विश्‍लेषण अजून व्हायला काही काळ लागेल, परंतु त्यांनी बाजी मारली आहेे. पंडित जवाहरलाल नेहरु व इंदिरा गांधी यांच्या नंतर बिगर कॉँग्रेसी सरकार दुसर्‍यांचा निवडून येण्याची ही पहिल्यांचा वेळ आहे. आता सलग दोनवेळा जिंकून नरेंद्र मोदींनी इंदिरा गांधींच्या विक्रमाची बरोबरी आता केली आहे. हे निकाल पाहता, जनतेच्या मनात अजूनही भाजपा व मोदींविषयी आशा, आकांक्षा व नेतृत्वाविषयी कणव आहे असेच दिसते. गेल्या वेळची निवडणूक मोदींनी भ्रष्टाचार, काळा पैसा, रोजगार या विषयावर लढवून कॉँग्रेसला सत्ताभ्रष्ट केले होते. आता मात्र या आकांक्षेची पूर्तता न करताही जनतेने भाजपाला पुन्हा एकदा संधी देऊ केली आहे. मोदींचे वकृत्व, शहांचे निवडणुका जिंकण्याचे कौशल्य त्यांना सत्तेपर्यंत पुन्हा घेऊन गेले आहे असे म्हटल्यास वावागे ठरणार नाही. गेल्या पाच वर्षात काही कामे झाली नसली तरीही मोदी काहींतरी पुढे करतील असे लोकांना वाटते. मोदींनी आपली प्रतिमा स्वच्छ असल्याचे तसेच आपण एकटेच राहाणारे बैरागी आहोत अशी प्रतिमा तयार केली आहे. त्यामुळे प्रत्यक्षात कामे न करताही भाजपला यश लाभले आहे. काळ्या पैशाच्या विरोधात सरकारने काही ठोस पावले उचलली नाहीत. रोजगार निर्मितीही फारशी झालेली नाही. त्याचबरोबर भ्रष्टाचार संपला आहे असे तर अजिबात नाही. असे असतानाही भाजपाने ही निवडणूक पुन्हा जिंकली आहे. सोशल मिडियावर आक्रमकपणे प्रचार करुन भाजपाने आपली बाजू मांडली, हे जेवढे खरे आहे तेवढेच देशातील 35 कोटी एवढ्या मोठ्या संख्यने असलेला मध्यमवर्गही भाजपाच्या मागे जोरदारपणे उभा राहिला आहे. कॉँग्रेससह विरोधकांनी आपली एकजूट उभारण्याचा प्रयत्न केला होता. भाजपाच्या प्रत्येक उमेदवाराच्या विरोधात एकच उमेदवार देण्याचा प्रयत्न शंभर टक्के यशस्वी झाला असता तर काहीचे चित्र वेगळे असते. परंतु तसे झाले नाही. उत्तरप्रदेशात मायावती-समाजवादी पार्टी एकत्र येऊन त्याचा फायदा झाला नाही. आजवर विरोधकांच्या फुटीचा फायदा त्याकाळी सत्तेवर असलेल्या कॉँग्रेसला होत असे. आता विरोधकांच्या फुटीचा फायदा भाजपाला होत आहे. एकीकडे भाजपा देशात विजयी घोडदौड करीत असताना रायगडमध्ये शिवसेनेला लगाम लावण्यात यश प्राप्त झाले आहे. शिवसेनेचे केंद्रीय मंत्री व सहा वेळा खासदार असलेले अनंत गीते यांना पराभव पत्करावा लागला आहे. रायगडमध्ये राष्ट्रवादी-कॉँग्रेस-शेकापच्या महाआघाडीच्या वतीने सुनिल तटकरे विजयी झाले. रायगडच्या जनतेला आता हक्काचा खासदार तटकरेंच्या रुपाने मिळाला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच काँग्रेस केवळ एका जागेवर मर्यादित राहिली, तर राष्ट्रवादी काँग्रेसनेही गेल्या वेळेप्रमाणे चार जागा कायम राखल्या. वंचित आघाडीने यंदा काँग्रेस-राष्ट्रवादीची दमछाक करत औरंगाबादेतून एक जागा निवडून आणली. वंचित आघाडी नसती तर विरोधकांच्या किमान दहा जागा वाढल्या असत्या. वंचित आघाडीने तब्बल राज्यात सात टक्के मते पटकाविली आहेत. 17व्या लोकसभेत महाराष्ट्रातून 19 नवीन चेहरे जात आहेत. शिवसेना- भाजपला पूर्वीचे यश कायम राखता आले, याचे महत्वाचे कारण म्हणजे युतीवर झालेले शिक्कामोर्तब. लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात एकही उमेदवार न उतरवता पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांना आव्हान देणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या झंझावाताचा युतीच्या घोडदौडीवर किंचितही परिणाम झाला नाही. राज ठाकरे यांची भाषणे एैकायला लोक मोठ्या संख्येने येतात, परंतु त्यांचे विचार काही मनाला लावून घेत नाहीत हे आजवर अनेकदा सिध्द झाले आहे, त्याची पुनरावृत्ती यावेळीही झाली. यंदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसची मोठ्या प्रमाणावर धूळधाण झाली. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना पराभवाची धूळ चाखावी लागली. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनाही पराभव पत्करावा लागला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी आठ सभा घेऊन मोदींविरोधात वातावरण ढवळून काढले, मात्र यापैकी एकाही मतदारसंघात उमेदवार निवडून आणणे शक्य झाले नाही. त्याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सभांचा धडाका लावून बहुतांश मतदारसंघांत युतीचे उमेदवार निवडून आणले. महाराष्ट्रातून प्रथमच एखादा धर्मगुरू लोकसभेत पाठवण्याचा इतिहासही या निवडणुकीने सोलापूरातून घडवला गेला. कॉँग्रेसला यावेळी देशात 52 जागा मिळाल्या असल्या तरी त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळण्याची शक्यता कमीच आहे. आता कॉँग्रेसने भाजपाकडून धडे गिरविण्याची आवश्यकता आहे. भाजपाने दोन सदस्यांवरुन भरारी घेत एक हाती सत्ता कमावली आहे. त्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत लक्षणीयच म्हटली पाहिजे. कॉँग्रेस पक्ष 60 वर्षे सत्तेत राहून सध्या सदस्यांची हाफ सेंच्युरी गाठत आहे. भाजपाच्या तुलनेत त्यांची सध्या उतरती भाजणी आहे. मात्र ही चढती भाजणी शक्य करुन दाखविण्यासाठी त्यांना भाजपासारखे धोरण आखावे लागेल. इंदिरा गांधीं, नेहरु यांनी ज्याप्रकारे जनमानसात आपली प्रतिमा निर्माण करुन पक्षावर पकड निर्माण केली होती, आज जी प्रतिमा मोदींनी निर्माण केली आहे, तसे नेतृत्व कॉँग्रेसला घडवावे लागणार आहे. कार्यकर्त्याला निराशेची भावना झटकावी लागेल. जनभावनेची नस ओळखणा़र्‍या मोदींनी मोदी हटाओला भ्रष्टाचार हटाआ असे जबरदस्त उत्तर दिले. पुलवामा हल्ला आणि त्यानंतर  पाकिस्तानमधील बालाकोटवरील प्रतिहल्ला या दोन घटना मोदी लाटेच्या केंद्रस्थानी राहिल्या. पाकिस्तान ही भारतीय जनतेची ठसठसती जखम आहे. तिथे कुणी स्पर्श केला तर भारतीय मन कळवळते, हा इतिहास आहे. निवडणुकीच्या तोंडावर पुलवामा हल्लयाचा बदला मोदींनी ज्या संतापाने व तडफेने घेतला त्याचवेळी भारतीय जनतेने आपल्या मताचे दान त्यांच्या पारडयात टाकले होते. राष्ट्रवाद आणि विकास यांचा सुरेख मेळ घालत मोदींनी विरोधकांना अक्षरशः पाणी पाजले. भाजपाला अजूनही दक्षिणेत आपले बस्तान बसविण्यात यश आलेले नाही. पश्‍चिम बंगालमधील भाजपची मुसंडी ममता यांना अंतर्मुख करणारी आहे. कर्नाटकात काँग्रेस आणि जनता दलाला पूर्णपणे नेस्तनाबूत केले आहे. युतीने महाराष्ट्रातून काँग्रेसला अक्षरशः उखडून टाकले. वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादीने तिसरी आघाडी केली असती तर चित्र वेगळे दिसले असते. उत्तरप्रदेशात मायावती-सपा एकत्र आल्याने फारसा फटका भाजपाला बसला नाही. भाजपचा देशातील विविध प्रादेशिक पक्षांशी आघाड्या करण्याचा निर्णय महत्त्वाचा ठरला. त्याासाठी सर्व श्रेय अमित शहांच्या राजकीय व्यवस्थापनाला जाते. मोदींच्या विजयाच्या वारूने अखेर भारताच्या चारही दिशा पादाक्रांत केल्या. विरोधक मात्र राजकीय रणनिती, निवडणूक व्यवस्थापन तसेच सोशल मिडिया या सर्वच बाबतीत फेल ठरलेे, हे वास्तव आहे. जगातील हा सर्वात मोठा लोकशाहीचा उत्सव आता संपला आहे. आता पक्षीय मतभेद विसरुन सत्ताधार्‍यांचे अभिनंदन करीत सर्वांनी देशाच्या विकासाच्या दृष्टीने पावले टाकली पाहिजेत. तरच या लोकशाही उत्सवाची सांगता खर्‍या अर्थाने होईल.
-----------------------------------------------------------------

0 Response to "निकालानंतरचे धडे..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel