-->
तटकरेच का?

तटकरेच का?

रविवार दि. 21 एप्रिल 2019 च्या अंकासाठी चिंतन - 
-----------------------------------------------
तटकरेच का?  
------------------------------------------
रायगड लोकसभा मतदारसंघातात दोन दिवसांनी म्हणजे मंगळवारी 23 एप्रिलला मतदान होईल. यात राष्ट्रवादी-कॉँग्रेस-शेकाप आघाडीचे सुनिल तटकरे यांचा विजय निश्‍चित मानला जातो. गेल्या वेळी तटकरेंचा विजय जेमतेम दोन हजारांनी हुकला होता. परंतु आता यावेळी त्यांच्या सोबतीला शेकाप असल्यामुळे त्यांचा विजय निश्‍चित आहे. कॉँग्रेस-राष्ट्रवादी-शेकाप या महाआघाडीमुळे तटकरेंची ताकद वाढली आहे त्यामुळे त्यांचा विजय ही काळ्या दगडावरती रेघ आहे. सध्याच्या राजकारणाचा विचार करता आपल्याला रायगड जिल्ह्यातून तटकरेंना लोकसभेवर पाठविणे ही एक आवश्यक बाब ठरणार आहे. याचा आपण दोन अंगांनी विचार करु एक तर देशाच्या हिताचा विचार व दुसरे म्हणजे या मतदारसंघाच्या विकासाचा विचार. देशाचा विचार करताना सध्याच्या काळात नरेंद्र मोदी सरकार सत्तेतून जाणे ही आपली लोकशाही, संविधान वाचविण्यासाठी प्राधान्यतेची बाब आहे. देशात गेल्या पाच वर्षात मोदी सरकारने केवळ स्वप्ने दाखविली. प्रत्यक्षात काम कोणतेच केले नाही. सरकारने आपल्या कामांच्या प्रसिध्दीसाठी साडे चार हजार कोटी रुपये खर्च केले. अनेकदा तर खोटी आकडेवारी सादर केली. असे हे खोटारडे सरकार आपल्याला नको आहे. सरकारने खरे तर गेल्या पाच वर्षातील आपल्या कामाचा लोखाजोखा सादर करावयास हवा होता व त्या आधारे लोकांकडे मते मागावयास पाहिजे होती. परंतु सरकारने पाच वर्षात काय केले? विकास केला म्हणजे नक्की काय केले? नोटबंदीचे चुकीचे समर्थन केले, त्यातून बेकारीचा भस्मासूर उभा राहिला. आधार व जीएसटीला कॉँग्रेसच्या काळात यांनीच विरोध केला, मात्र सत्तेत येताच त्याचे समर्थन केले. बरे जीएसटीची अंमलबजावमी चुकीच्या मार्गाने केली, त्याचा फटका व्यापारी, लघुउद्योजकांना सर्वात जास्त बसला. महाराष्ट्रातील सध्याच्या दुष्काळावर मात करण्यासाठी काय केले? शेतकर्‍यांना त्यांच्या मालाचे योग्य पैसे मिळाले का? शेतकर्‍यांच्या आत्महत्या का वाढल्या? वाढती बेरोजगारी, देशावर आणि राज्यावर दुपटी ने वाढत चाललेले कर्ज, रासायनिक अन्न आणि त्यामुळे होणारे दुषपरिणाम, कर्जमाफी खरोखर झाली की फक्त जाहिरात, सरकारी योजनाची खरोखरच अंमलबजावणी होत आहे का? जाहिरातीमधे दिसलेली गोष्ट कितपत खरी आणि त्याची वास्तविकता किती? बँका चे वाढत चललेले अनुत्पादीत मूल्य, आयात निर्यात धोरण, शेतमाल आयात निर्यात धोरण, पेट्रोल डिजेल किंवा अन्य रूपातुन होणार्‍या वसूलीचे पुढे काय होते? असे अनेक प्रश्‍न अनुत्तरीत आहेत. गेल्या 70 वर्षात या देशात काहीच झाले नाही, राहुल गांधी कसा पप्पू आहे, मोदी कसे शेर आहेत, पाकची नांगी कशी ठेचली, मोदी सोडून बाकी सर्व चोर, पवारांनी काय केले, प्रियांका गांधी वर अश्‍लिल कमेंट्स, पाकिस्तान, अकेला शेर, वगैरे वगैरे...यातून भाजपाला मते मिळणार नाहीत. सोशल मिडियातून विरोधकांबाबत विष गरळले जात आहे व यातून आपल्याकडे मते फिरतील असे भाजपाला व मोदींना वाटते. एखादा भाजपाचा विरोधक असेल तर तो काँग्रेस समर्थक इतकी बिनडोक मांडणी लोकांच्या डोक्यात घट्ट बसली आहे. काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचार आणि भाजपमध्ये भ्रष्टाचार असेल तर तो नाईलाज म्हणून अशी पळवाट तयार आहे. नेहरूंबद्दल इतिहासाची काडीचाही माहीत नसलेले अनेक जण सोशल मिडियातील भाजपाच्या विषारी प्रचारामुळे बिनदिक्कतपणे नेहरूंमुळे, कॉँंग्रेसमुळे देश बुडाला असे विधान करण्यात धन्यता मानतात आणि राहुल गांधी या व्यक्तीबद्दल पराकोटीचा द्वेष मनात धरुन आहेत. भाजपाच्या मंडळींनी असे कितीही ब्रेन वॉशिंग करण्याचा प्रयत्न केला तरी त्यातून जनतेला यांनी गेल्या पाच वर्षात दिलेल्या आश्‍वासनांचे काय केले असे विचारण्याचा हक्कच आहे. देशातील विव्देषाचे राजकारण थांबविण्यासाठी तटकरेंना लोकसभेत पाठविण्याची म्हणजेच महाआघाडी बळकट करण्याची आवश्यकता आहे. रायगड मतदारसंघाचा विचार करता गेल्या दहा वर्षात विद्यमान खासदार अनंत गिते काय कामे केली असा प्रश्‍न उपस्थित होतो. गिते यांची ही लोकसभेतील एकूण सहावी टर्म आहे. तसेच रायगड मतदारसंघाची निर्मिती झाल्यानंतरची ही दुसरी टर्म आहे. रायगडचा विचार करता गेल्या दहा वर्षातील खासदारकीपैकी पाच वर्षे गिते केंद्रीय मंत्री होते. या काळात त्यांनी आपल्या मतदारसंघासाठी नेमके काय केले? असा प्रश्‍न उपस्थित केल्यास याचे उत्तर नकारात्मकच देता येईल. अनंत गिते हे केंद्रीय मंत्रीपदी असताना त्यांच्याकडे अवजड मंत्रालय होते. खरे तर एखादा सरकारी कंपनीचा मोठा प्रकल्प या मतदारसंघात आणू शकले असते. परंतु तसे त्यांनी काहीच केले नाही. एवढेच कशाला येथील सरकारी कंपनी आर.सी.एफ. च्या थळ प्रकल्पातील विस्तार प्रकल्पाचेही काम मार्गी लावण्यात त्यांना यश आले नाही. रत्नागिरीत येऊ घातलेला नाणार प्रकल्पही शिवसेनेच्या विरोधामुळे बारगळला. अशा प्रकारे नवीन प्रकल्प न आणणे तसेच येणार्‍या प्रकल्पांना विरोध यामुळे येथील रोजगाराला आळा बसला आहे. याची सर्वस्वी जबाबदारी ही खासदार अनंत गिते यांच्यावर येते. मुंबई-गोवा महामार्गाच्या विस्ताराला होत असलेला विलंब तसेच राज्यातील विविध केंद्रीय अर्थसहाय्याने होणार्‍या प्रकल्पांची रखडपट्टी याचे अपयश हे गितेंचेच आहे. केंद्रातील मंत्री या नात्याने गिते रायगड जिल्ह्याासाठी भरीव कार्य करु शकले असते. परंतु त्यांना हे सर्व करण्यात अपयश आल्याने आता त्यांच्या जागी तटकरेंसारखा कार्यक्षम खासदार आणण्याची ही रायगडमधील मतदारांची आता जबाबदारी आहे. म्हणून यावेळी राज्यात माजी मंत्री असलेले व प्रशासनावर पकड असलेले सुनिल तटकरेच खासदार म्हणून आपल्याला हवेत...
------------------------------------------------------------

0 Response to "तटकरेच का? "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel