-->
फेसबुकचे लक्ष्य

फेसबुकचे लक्ष्य

सोमवार दि. 14 जानेवारी 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
फेसबुकचे लक्ष्य
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर फेसबुक आणि फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी भारतीय निवडणुकीवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले आहे. फेसबुक आणि मार्क झुकेरबर्ग यांच्यासाठी आगामी निवडणूक टॉप प्रायोरिटीजमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. 2019 मध्ये होणार्‍या लोकसभा निवडणुकीवर देशातील विविध पक्ष लक्ष ठेऊन आहेत. त्यादृष्टीने त्यांच्याकडून तयारीही केली जात आहे. या निवडणुकांचे गांभीर्य लक्षात घेता फेसबुक, भारत सरकार आणि देशातील मतदार यांच्यातील संबंध पाहिले असता ही एक संधी म्हणून पुढे येत आहे. गेल्या वेळी भारतीय जनता पक्षाने आपला मोठा प्रचार सोशल मिडियाव्दारे केला होता. त्यांचा हा अभिनव प्रयोग यशस्वी झाला. आता सर्वच पक्ष सोशल मिडीयाचा वापर करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळेच व्यवसाय वृद्धीसाठी फेसबुकचे याकडे लक्ष लागले आहे. या निवडणुकांना कमी कालावधी शिल्लक असताना जाहिरातींसह अंतर्गत विविध बाबींकडे लक्ष दिले जाणार आहे. त्यासाठी आवश्यक कामही सुरु केले आहे. केटी हरबथ यांच्यानुसार, मार्क झुकेरबर्ग आणि फेसबुकचे सीओओ शेरील सँडबर्ग यांच्यासाठीही आगामी निवडणूक टॉप प्रायोरिटी असणार आहे. फेसबुकवर प्रत्येकाला पेज किंवा त्यांच्या स्वत:च्या प्रोफाईलवर माहिती पोस्ट करण्याचे स्वातंत्र्य असते. असे स्वातंत्र्य असतानाही अनेकदा निवडणुकीच्या काळात तथ्यहीन आणि सत्यता न पडताळता माहिती पोस्ट केली जाते. अशा पोस्टवर लगाम आणण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न करण्यात येणार आहेत, ही स्वागतार्ह बाब ठरावी. आपल्याकडे आता सोशल मिडियाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. फेसबुक, ट्विटर, यूट्यूब, व्हॉट्सअ‍ॅप ही अतिशय वेगवान माध्यमे आता सर्वव्यापी झाली आहेत. एकेकाळी स्वातंत्र्यानंतर साक्षरता वाढल्यावर आपल्याकडे वृत्तपत्रांचे खप झपाट्याने वाढले होते. आता त्याहीपेक्षा मोठ्या झपाट्याने केवळ वैयक्तिक स्तरावरच नाही, तर संस्थात्मक पातळीवरही माहितीची देवाणघेवाण सुलभपणे होताना आपण पाहतो. माहिती झपाट्याने पसरते हे वास्तव आहे, मात्र ती माहिती कशी आहे? त्यातील खरे वास्तव काय आहे? खोटी माहिती या माध्यमातून झपाट्याने पसरत जाते हे सध्या मोठे काळजीचे कारण ठरत आहे. बहुतेक वृत्तपत्रांचे आणि वाहिन्यांचे फेसबुक पेज आणि ट्विटर हॅण्डल असल्यामुळे ही माध्यमे हळूहळू मुख्य प्रवाहात सामील होत आहेत. पण संवादाची म्हणून ओळखली जाणारी ही माध्यमे गेल्या काही वर्षांत विसंवादाची माध्यमे म्हणून समोर येऊ लागली आहेत. सोशल मिडियाच्या उदयामुळे लोकांना आपली मते व्यक्त झटपट वेगाने व्यक्त करण्याचे एक मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, हे देखील तेवढेच खरे. पूर्वी आपल्याकडे वृत्तपत्रांत पत्र लिहून लोक व्यक्त होत असत, परंतु आता हा प्रकार आता कमी झाला आहे. त्यापेक्षा सोशल नेटवर्गींकमध्ये आपले मत व्यक्त करुन लोक समाधान पावतात. परंतु याव्दारे एक चुकीचे टोक गाठले जात आहे. अफवा, खोट्या बातम्या पसरवल्या जातात यात केवळ ते करणारी संबंधित व्यक्ती किंवा गट केवळ जबाबदार नसतो, तर त्याला ते पसरवायला मदत करणारी अनुकूल यंत्रणा आणि राजकीय, सामाजिक परिस्थितीही तेवढीच जबाबदार असते. आपण आपल्याकडे सोशल मिडियाचे असे परिणाम पाहत असताना अन्य देशात त्याचे कसे पडसाद कसे आहेत, हे पाहणे महत्वाचे ठरेल. आपल्यापेक्षा अगोदर अमेरिकेत, युरोपमध्ये सोशल मिडिया विकसीत पावला. पण तिथे असले क्रूर तांडव सहसा पाहायला मिळत नाही. एक जबाबदार समाज म्हणून आपण किती खालावलो गेलो आहोत हेच यावरुन दिसते. समाज दूषित होतोय, हिंसक होतोय म्हणून आधुनिक यंत्रणा नाकारणे हे चुकीचेच आहे. यासाठी आपल्याला जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. आपल्यातील जाणत्यांनी त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. सेल्फि काढण्याच्या नादात आपला जीव गमावलेले शेकडे लोक आपल्याला भेटतात हे आपल्यातील घसरत्या समाजमनाचे लक्षण म्हटले पाहिजे. या माध्यमाच्या विळख्यात अजून न गुरफटलेली नवी पिढी आपल्याला वाचवायची असेल तर तिचे प्रबोधन हे मोठे आव्हान आपल्याला स्वीकारावे लागणार आहे. आपली कुटुंबव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली नाही. त्यामुळे पालकांना यात महत्वाची भूमिका निभावता येऊ शकेल. वेगाने आदळणारे तंत्रज्ञान आणि सुख-सुविधांची रेलचेल आपल्या कुटुंबाला आणि समाजाला विस्कळित तर करणार नाही ना याची काळजी प्रत्येकाने घेतली तर हा विकासाचा मेगा हायवे आपला जीवनप्रवास नक्की सुखाचा करेल. सध्या जगाच्या स्थिरजोडणी इंटरनेट नकाशावर आपला 134 वा क्रमांक आहे. त्यामुळे त्यात आपण बरेच मागे आहोत. भारत ही जगातली सर्वात मोठी मोबाईलची बाजारपेठ असून जगातल्या एकूण विक्रीपैकी दहा टक्के फोन एकट्या भारतात विकले जातात. 2017 मध्ये हा आकडा 29.9 कोटी इतका होता. आता पुढील टप्प्यात सोशल मिडिया व एकूणच संपर्क माध्यमाची गगनभरारी आपल्याला नेमके कुठे घेऊन जाणार आहे हा प्रश्‍न विचार करायला लावणारा आहे. यातून अनेक नवीन प्रश्‍न निर्माण होणार आहेत. गुन्हेगारीचे स्वरुप बदलत जाणार आहे. त्याशिवाय सर्वात महत्वाचे म्हणजे तरुण पिढी उध्दस्थ होण्याच्या टप्प्यावर पोहोचू शकते. सोशल मिडिया हे चांगले आहे, परंतु ते तुम्ही कसे वापरता त्यावर बरेचसे अवलंबून आहे. आता निवडणुकीत हे माध्यम धुडगुस घालमार आहे. परंतु त्याचा गैरवापर होता कामा नये याची जबाबदारी जशी राजकीय पक्षांची आहे तशीच सुजाण नागरिकांचीही आहे.
---------------------------------------------------------------

0 Response to "फेसबुकचे लक्ष्य"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel