-->
गणपती बाप्पा मोरया...

गणपती बाप्पा मोरया...

गुरुवार दि. 13 सप्टेंबर 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
गणपती बाप्पा मोरया...
गणेशोत्सव म्हणजे आनंदाचे डोही आनंद तरंग... आनंदाच्या तळ्यात आनंदाचेच तरंग उठतात तसेच या काळात आनंदाच्या सागराला आनंदाचे भरते येते. उसळणार्‍या भक्तीच्या लाटेत लाखो लोक न्हाऊन निघतात. गणेश, गणपती, गणराय, बाप्पा कुठल्याही नावाने साद दिली तरी ही देवता प्रतिसाद देते म्हणूनच आपलीशी वाटते. या उत्सवाचे दिवस चराचरात जाणवतात. हे मंगलमय दिवस कधीच संपू नयेत असे वाटते... गणपती बाप्पा मोरया चा गजर करत गुंजणार्‍या ललकार्‍या, पूजा-आरतीने भारावलेले वातावरण, धीरगंभीर मंत्रोच्चाराने त्यात आलेले आगळे गांभिर्य हे सर्व वातावरण अनोखा उल्हास देणारे असते... चैतन्य निर्माण करणारे असते... आजपासून दहा दिवस हेच चैतन्य अनुभवायला मिळणार आहे. सर्वांच्या लाडक्या गणरायाचे अधिराज्य अनुभवण्याचे सुख अनुभवायला मिळणार आहे. म्हणूनच नेहमीच्या थकवणार्‍या दिनक्रमातून आराधना आणि पूजाआर्चा करण्याची संधी देणारे हे दिवस मर्मबंधातील ठेव होऊन राहतात. ही ठेव आयुष्यभर जपली जाते. विद्या, शक्ती, बुद्धीची ही देवता अगदी लहानपणापासून सर्वांच्या परिचयाची. आबालवृद्धांना या देवतेचे आकर्षण आहे. कितीही ऐकले तरी या देवतेविषयी आणखी ऐकावेसे वाटते. त्याचे वर्णन श्रुती सुखावत राहते. गणेशाविषयी सांगावे, बोलावे आणि लिहावे तेवढे थोडंच. श्री गणेशाचे आदिकाळापासून रुप बघायचे तर त्याचे चार टप्पे आहेत. निर्माणकाळात बृहस्पती, ब्रम्हणस्पती आणि इंद्र या देवतांशी श्री गणेशाची एकरुपता मानली जाणे हा श्री गणेश दर्शनाचा पहिला टप्पा. श्री गणेश आणि विनायक या देवता आदिकाळात भिन्न होत्या असे म्हटले जाते. या देवतांच एकीकरण म्हणजे एक स्वरुप हा दुसरा टप्पा. श्री गणेश किंवा श्री विनायक ही नावे वेगळी-वेगळी म्हटली तरी, या दोन्ही नावांनी श्री गणेशाचेच रुप डोळ्यापुढे यावे, हा श्री गणेशाचा तिसरा टप्पा. गजमुख किंवा गजवदन अशा स्वरुपाची हत्तीचे तोंड असलेली श्री गणेशाची मूर्ती पूजेसाठी वापरली जाणे, हा श्री गणेश दर्शनाचा आजचा चौथा टप्पा. सध्या आपण अशाच मूर्तिची पूजा करतो. वेदांच्या काळात ऋग्वेदात गणपती या शब्दाचा उल्लेख आढळतो. गणानात्वा गणपति हवामहे श्री गणपती अथर्वशीर्षात, गणेशाला उद्देशून त्वं इंद्रस्त्वं अग्निः (तूच इंद्र आहेस आणि तूच अग्नीही आहेस) अशी स्तुतीही आहे. शुक्ल यजुर्वेदात नमो गणेभ्यो गणपतिश्यश्‍च वो नमः असा अनेक गणपतीचा उल्लेख असणारा मंत्र आहे. आजही हे मंत्र कानी पडतात अत्यंत प्रसन्नता देऊन जातात. वेद आणि उपनिषद या नंतर मुद्गलपुराण हा श्रीगणेश सांप्रदायातील त्या मानाने अर्वाचीन ग्रंथ आहे. यामध्ये बत्तीस प्रकारच्या गणपतीमूर्तींची वर्णन आहेत. इसवी सन 500 ते 600 च्या सुमाराला भमरा येथील शक्तिगणपती आणि मथुरा येथील स्थानक गणपतीचे उगम आढळतात. इसवी सनच्या आठव्या-नवव्या शतकात नेपाळ आणि तिबेटमध्येही श्रीगणेशाची उपासना प्रचलित होती असे दिसते. गणपतीची वाहने अनेक तशीच त्याच्या हातामधली शस्त्रही वैशिष्टपूर्ण आहेत. गणपती हा शंकराच्या गणांमधील एक असल्याने त्रिशूल हे गणपतीचे एक शस्त्र ठरले. हे त्रिशूल प्रत्यक्ष शंकरानीच गणपतीला दिले. परशू हे शस्त्र मूळ परशुरामाचे. परंतु रेणुकामातेने श्रीगणेशाला ते उपनयन म्हणजे मुंजीच्या वेळी दिले अशी पुराण कथा आहे. मुद्गल हे गणपतीच्या हातात अभावाने दिसणारे शस्त्र, तर पाश आणि अंकुश ही नेहमी दिसणारी शस्त्रे आहेत. गणपतीच्या एका हातातील कमळाचा उपयोग शस्त्राप्रमाणे करुन त्याने एका राक्षसाचा वध केल्याचाही उल्लेख आढळतो. कलियुगात प्रत्येकाला हवे ते देणारी आणि सर्वकाळ दातृत्त्वाची जबाबदारी पार पाडणारी देवता म्हणजे गणपती, असे म्हटले जाते. सध्याच्या काळात गणपती बाप्पाला आपल्याकडील समाजविघातक शक्तींना चांगली बुध्दी देण्यास सांगण्याची वेळ आली आहे. कारण आपल्याकडे गेल्या काही वर्षात अपप्रवृंचा फैलाव झपाट्याने झाला आहे. सर्व काही बाबी आर्थिक निकषांवर तोलल्या-मोजल्या जाऊ लागल्या आहेत. यातून माणूसकी मागे पडत आहे. भ्रष्टाचार हा पावलोपावली बोकाळला आहे. त्यातून सर्वसामान्यांचे जीनव कठीण होऊन बसले आहे. सध्या आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी मतदारांना दिलेल्या आश्‍वासनाची पूर्तता करण्याची वेळ आता आली आहे. मात्र आता हे दोघेही जनतेला दिलेली आश्‍वासने विसरले आहेत असेच दिसते. त्यामुळे बाप्पांना आता याची आठवण करुन देण्याची जबाबदारी आली आहे. कारण पूर्वी नरेंद्रभाई सर्वांना भेटायला मोबाईलपासून टी.व्ही.वर यायचे. आता त्यांचे दर्शन दुर्लभ झाले आहे. गेल्या सव्वा चार वर्षात नरेंद्र मोदींनी विदेश वार्‍या भरपूर केल्या आहेत. त्यामुळे त्यांना येथील जनतेच्या प्रश्‍नांचा विसर पडला असल्याची शक्यता जास्त वाटते. गणपती बाप्पा, कोकणातील आमचा चाकरमनी मोठ्या-मोठ्या खड्यातून प्रवास करुन तुमच्या पायाशी आलेला आहे. पुढील तीन वर्षात रस्ता चार पदरी पूर्ण करण्याचे आश्‍वासन नितीन गडकरींनी जे आश्‍वासन दिले आहे त्यांच्या प्रयत्नांना बाप्पा तुम्ही बळ द्या. लोकमान्य टिळकांनी तुम्हाला घरातून सार्वजनिक ठिकाणी आणले व स्वातंत्र्याचे स्पुलिंग जागृत केले. आता बदलत्या काळात तुम्हाला नवीन भूमिका बजावायची आहे व लोकांचे जीवन सुखकर कसे होईल यासाठी सुबुध्दी द्यावयाची आहे...
---------------------------------------------------------------

0 Response to "गणपती बाप्पा मोरया..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel