-->
स्वातंत्र्य चिरायू होवो!

स्वातंत्र्य चिरायू होवो!

रविवार दि. 12 ऑगस्ट 2018 च्या अंकासाठी चिंतन- 
------------------------------------------------
स्वातंत्र्य चिरायू होवो!
येत्या बुधवारी देशाचा 71वा स्वातंत्र्य दिवस साजरा होईल. दिडशे वर्षाच्या ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून आपण 15 ऑगस्ट 1947 रोजी मुक्त झालो. आज मागे वळून पाहत असातना आपण अनेक आघाडीवर चांगली कामगिरी केली आहे हे काही अमान्य करता येत नाही. मात्र याहून आपण चांगली कामगिरी करु शकलो असतो याचीही खंत आपल्याला आहेच. पंडित नेहरुंनी स्वातंत्र्यानंतरच्या आपल्या पहिल्या भाषणात देशाला लोकशाही, प्रजासत्ताक, समाजवादी, सर्वधर्मसमभाव जपणारे राष्ट्र म्हणून स्वीकारण्याचे जाहीर केले. स्वांतत्र्यानंतरची आपली सर्वात महत्वाची कमाई म्हणजे आपल्याकडील लोकशाही. जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपण मोठ्या दिमाखात आज मिरवीत आहोत, परंतु त्याची पाळेमुळे ही स्वातंत्र्यानंतर रोवली गेली. आपल्या देशात लोकशाही केवळ रुजली नाही तर ती फोफावली आहे. लोकशाहीच्या माध्यमातून या जनतेला सत्ताधार्‍यांना उलथून टाकण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे व जनतेने आपला इंगा वेळोवेळी सत्ताधार्‍यांना दाखविलाही आहे. अशा प्रकारे आपल्याकडे रक्तहिन क्रांती घडली आहे. त्याउलट आपल्याच बरोबरीने स्वतंत्र झालेल्या पाकिस्तानात मात्र लोकशाही रुजली नाही. गेल्या पाच वर्षात तेथे लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारने आपला कालावधी पूर्ण करण्याची पहिल्यांदा घटना घडली. पाकिस्तानात बहुतांशी वेळा लष्कराचेच वर्चस्व राहिले आहे. मग ती थेट लष्करी राजवट असो किंवा लोकशाहीच्या मागच्या दरवाजाने लष्कराचा असलेला हस्तक्षेप असो. आपल्याकडे लोकशाही रुजणे हा देशातल्या सर्वसामान्य जनतेचा वैचारिक विजय आहे. स्वातंत्र्यानंतर आपण लोकशाही स्वीकारीत असताना संमिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली. हे देखील पंडित नेहरुंच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळे शक्य झाले. कारण त्यावेळी जग हे दोन विभागात म्हणजे भांडवलशाही व समाजवादी यात विभागले गेलेेले होते. भारताने स्वातंत्र्यानंतर आपल्या गोटात सामिल व्हावे असे अमेरिकनधार्जिण्या भांडवशाहीच्या समर्थक देशांना वाटत होते. परंतु त्यावेळी नेहरु हे समाजवादाच्या दिशेने झुकलेले असल्याने त्यांनी यातून सुवर्णमध्ये काढून संमिश्र अर्थव्यवस्था स्वीकारण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर आपले परराष्ट्र धोरण हे कुणाच्याही बाजुला झकलेले नसावे व तिसर्‍या जगाचे आपण नेतृत्व करावे यासाठी म्हणून अलिप्त राष्ट्र संघटनेची चळवळ उभारली. अर्थातच याला त्यावेळच्या सोव्हिएत युनियनच्या नेतृत्वाखालील समाजवादी देशांचा पूर्ण पाठिंबा होता. अशा प्रकारच्या जागतिक वातावरणात आपण आपली स्वातंत्र्यानंतरची वाटचाल सुरु केली. स्वातंत्र्यानंतर आपण पुढील चार दशकात तीन युध्दांना सामोरे गेलो. एक तर आपली अर्थव्यवस्था नुकतीच कुठे उभारी घेत होती त्यात युध्दाच्या झळा अनुभवाव्या लागल्या. त्याचबरोबर पूर, भूकंप यासारखी नैसर्गिक संकटांचा आपण वेळोवेळी मुकाबला करीत आलो. स्वातंत्र्यानंतर 91 सालानंतर जगाची सर्व सुत्रेच बदलण्यास सुरुवात झाली. सोव्हिएत युनियनसह समाजवादी देशांच्या जगांच्या अर्थव्यवस्था कोसळू लागल्या. सोव्हिएत युनियनची शकले झाली व जगाच्या नकाशावरुन हा देश फुसला गेला. आपल्या अर्थव्यवस्थेत एक प्रकारची शिथीलता आली होती. देशातील एकूणच मरगळ झटकण्याची आवश्यकता होती. सार्वजनिक क्षेत्राच्या प्रबल्यामुळे व स्पर्धेच्या अभावामुळे ही शिथीलता आली होती. त्यामुळे यातून देशाला सावरण्यासाठी आपण आपली अर्थव्यवस्था खुली करण्यास सुरुवात केली. हळूहळू आपण बाजारपेठीय अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करु लागलो. समाजवादी जग विखुरले गेल्यामुळे आपल्याला अमेरिकेशी दोस्ती वाढविणे हाच एकमेव पर्याय होता. आपण आपली अर्थव्यवस्था खुली केल्यामुळे आपला विकास झपाट्याने होतो आहे असे दिसू लागले. मात्र आता उदारीकरणाच्या दोन दशकानंतर आपण विकास जरुर केल्याचे दिसते. मात्र हा विकास असमतोल पध्दतीने झाला आहे. देशातील दारिद्य निश्‍चितच कमी झाले, परंतु अजूनही देशात गरीबी आहे. श्रीमंत ज्या गतीने आणखी श्रीमंत झाले त्यातुलनेत गरीबांना त्यांच्या उत्पन्न गटातून झपाट्याने वर काढणे आपल्याला काही शक्य झाले नाही. आपल्या देशातील 70 टक्के मालमत्ता ही केवळ एक टक्का लोकांकडे केंद्रीत झाली आहे. त्यामुळे आपल्याकडे विषमतेची दरी सातत्याने वाढत चालली आहे, व हेच सर्वात धोकादायक ठरणारे आहे. त्यामुळे विकासाची फळे ही ठराविक वर्ग चाखत असल्याचे दिसते आहे. देशापुढे आता सात दशकांच्या स्वातंत्र्यानंतर हेच मोठे आव्हान शिल्लक आहे. आपल्याकडे अजूनही देशातील 40 टक्के जनतेला एक वेळचे खाणे मिळत नाही एवढी गरीबी आपल्याकडे आहे. आपण शिक्षणात प्रगती चांगली केली असली तरीही अजूनही मोठ्या संख्येने ग्रामीण भागातील मुले शिक्षणापासून वंचित राहातात. त्यामागचे सर्वात महत्वाचे कारण हे आर्थिकच आहे. मुलींचे शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. दुसरीकडे शहरात शिक्षणाविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात खासगीकरणावर आपण भर दिल्याने शिक्षण अजूनही सर्वांना परवडणारे नाही. त्यामुळे बारावी पर्यंतचे शिक्षण हे सरकारनेच दिले पाहिजे, असा आग्रह धरला गेला पाहिजे. आपण आपली लोकसंख्या 100 कोटी पार केली असून आपल्याला एक किंवा दोन मुलांचा प्रत्येक कुटुंंबाला पर्याय स्वीकारावा लागणार आहे. यासाठी सक्ती नको तर प्रबोधनातून आपण लोकसंख्या नियंत्रणात ठेवू शकतो. एकेकाळी आपल्याला अन्नधान्य आयात करावे लागत असे आता आपण आपल्या जनतेला पुरेल एवढ्या धान्याचे उत्पादन तर करतोच शिवाय निर्यातही करतो. आरोग्यबाबतीत आपल्याला बरीच मोठी मजल मारावयाची आहे. मात्र पोलियो, प्लेगसारखे रोग आपण देशातून हद्दपार केले आहेत. अशा प्रकारे गेल्या सात दशकात आपण मोठी कमाई केली असली तरीही आपल्याला भविष्यात फार मोठी मजल मारावयाची आहे. यातील पहिले उद्दिष्ट हे गरीबी संपविण्याचे असेल. आपले संविधान हा आपल्या लोकशाहीचा पाया आहे. हे संविधान टिकविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. आजही स्वातंत्र्यानंतर सात दशके लोटली असली तरीही आपण विकसीत देशांएवढी प्रगती केलेली नाही. त्याउलट दुसर्‍या महायुध्दानंतर युरोपातील देशांनी झपाट्याने प्रगती केली आहे. परंतु आपल्याकडे मोठी लोकंसख्या हा आपल्या विकासातील अडसर ठरत आहे. असे असले तरीही आपण चांगली प्रगती केली आहे. आय.टी. उद्योगात आपण आपला ठसा जगात उमटविला आहे. जगातील एक प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून आपल्याकडे पाहिले जात आहे, ही आपली मोठी जमेची बाजू ठरावी.
---------------------------------------------------

0 Response to "स्वातंत्र्य चिरायू होवो!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel