-->
चौपदरीकरणाला वेग द्या

चौपदरीकरणाला वेग द्या

सोमवार दि. 28 ऑगस्ट 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
चौपदरीकरणाला वेग द्या
दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन झाले, आता आणखी चार दिवसांनी सात दिवसांच्या गणपतींना भावपूर्ण निरोप दिला जाईल. मुंबईहून कसाबसा खड्यातून प्रवास करीत निघालेला चाकरमनी आपल्या घरी पोहोचला. आता गणरायाला निरोप देऊन तो पुन्हा मुंबईला परतेल. दरवर्षी प्रमाणे यंदाही त्याचे मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण होण्याचे स्वप्न काही पूर्ण झालेले नाही. दरवर्षी बिचारा कोकणी माणूस आपल्या गणरायाच्या स्वागतासाठी याच खड्यातून आपल्या गावी जातो. कोकण रेल्वे सुरु होऊन आता दोन दशकांहून जास्त काळ लोटला असला तरीही त्याला रेल्वेचा फारसा उपयोग होत नाही व शेवटी त्याला खड्याच्या रस्त्यांचाच गावी जाण्यासाठी आसरा घ्यावा लागतो. यंदा जादा एस.ट्या व रेल्वे सोडूनही अनेकांची गैरसोय झालेली आहे. पुढील वर्षी तरी रस्त्याचे काम मार्गी लागल्यास काही प्रवास तरी सुखकारक होईल अशी अपेक्षा आहे. किमान पळस्पे-इंदापूर हा मार्ग जरी चौपदरी झाला तरी त्याला बर्‍यापैकी दिलासा मिळणार आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण झपाट्याने करु असे आश्‍वासन दिले आहे. आता पावसाळा झ्ल्यावर रायगड जिल्ह्यातील या महामार्गाचे कामकाज झपाट्याने सुरु होईल असे दिसते. येथील बहुतांशी जमीन यापूर्वीच सरकारने ताब्यात घेऊन काम सुरुही केले होते. सध्या हे काम पावसाळ्यासाठी थांबले असले तरी ते पुन्हा लवकरच सुरु होईल अशी अपेक्षा आहे. अशा स्थितीत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र दुपदरीकरणाला काही जणांचा विरोध कायम आहे. अर्थात हा विरोध विरोधासाठी विरोध नाही. तर शेतकर्‍यांचे काही प्रश्‍न आहेत. ते सोडवावे लागणार आहेत. मात्र अनेक ठिकाणी लोकांनी आपला चार पट मोबदला आनंदाने स्वीकारला आहे. चिपळूण शहरातील समस्या काही अजून सुटलेली नाही. येथील व्यापार्‍यांची पाच पट नुकसानभरपाई देण्याची मागमी आहे. बहुतांशी ठिकाणी पुलांचे काम सुरु आहे. हे पूलांचे काम झाल्यावर रस्ते उभारणीस फारसा वेळ लागणार नाही. महामार्ग चौपदरी करताना ज्यांची जमीन सरकार खरेदी करणार आहे, ज्यांची दुकाने जाणार आहेत, ज्यांच्या वर्षानुवर्षाच्या व्यवसायावर गदा येणार आहे, अशा रस्त्यालगतच्या दोन्ही बाजूंच्या हजारो नागरिकांच्या जीवन-मरणाचा प्रश्‍न या निमित्ताने निर्माण झाला आहे. यासाठी ग्रामस्थांच्या मनात ज्या शंका आहेत त्याचे निकारण करण्याची आवश्यकता आहे. 500 किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे चौपदरीकरण करताना अनेक अडचणी येणार आहेत, हे मान्य आहे. परंतु चर्चेने अनेक प्रश्‍न सुटू शकतात. कोणत्याही विभागाचा विकास नको, अशी भूमिका कोणालाही घेता येणार नाही पण ग्रामस्थांच्या सर्व प्रश्‍नांचे निराकरण, त्यांच्या शंकांचे समाधान, सरकार ताब्यात घेणार्‍या जमिनींना मिळणारा योग्य भाव आणि ज्यांचे व्यवसाय नष्ट होणार आहेत त्यांना व्यवसायासाठी पर्यायी जागा या चार मुद्यांवर चर्चा करून सर्वाना मान्य होईल, असा प्रस्ताव तयार करणे, याबाबत सरकारने परिपूर्ण विचार करण्याची आवश्यकता आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण झाले पाहिजे, याबद्दल कोणाचेही दुमत नाही. गेल्या दहा वर्षातील या मार्गावरील वाढलेली वाहतूक चौपदरीकरणाशिवाय सुलभ होणार नाही. तसेच या महामार्गावर होत असलेल्या अपघातांचे प्रमाण पाहता चौपदरीकरण ही काळाची गरज आहे. कोकणातील नैसर्गिक परिस्थितीमुळे, विविध घाटांमुळे, अरुंद वळणांमुळे हा मार्ग धोक्याचाही आहे. चौपदरीकरणामुळे वाहतूक दुतर्फा होईल. वळणे रुंद होतील. जो कठीण घाट आहे तो तोडला जाईल व मुंबई-गोवा हा प्रवास बराचसा सुखकारक होईल. मुंबई-गोवा महामार्ग हा राज्यातील हा सगळयात जुना महामार्ग. 1952 साली बाळासाहेब देसाई सार्वजनिक बांधकाममंत्री असताना त्यांनी या रस्त्याचा प्रकल्प तयार केला आणि त्याला मंजुरी दिली. त्यावेळी 350 मैलाचा हा महामार्ग होता आणि तो सिमेंट काँक्रीटचा होता. मुंबई-पुणे महामार्ग असो किंवा मुंबई-बंगलोर महामार्ग, मुंबई-अहमदाबाद माहामार्ग हे केव्हाच चौपदरी झाले आहेत. खरे तर यापूर्वीच मुंबई-गोवा हा माहामार्ग चौपदरी व्हायला पाहिजे होता. प्रामुख्यने पर्यटन वाढविण्यासाठी याची गरज होती. कोकण रेल्वे सुरु झाली तरीही या मार्गावरील वाहतुकीचा बोजा काही कमी झालेला नाही. त्यामुळे हा रस्ता तातडीने मार्गी लागणे गरजेचे आहे. तसेच ठिकठिकाणी अर्धवट स्थितीत असलेला कोकणातील सागरी माहामार्गही तातडीने पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. यामुळे कोकणाचे चित्र पालटू शकते. पर्यटन हा कोकण व गोव्याचा कणा ठरीत आहे. गोव्यात तर पर्यटनाने चांगलाच जम बसविला आहे. आज गोव्याचे सर्व अर्थकारण पर्यटनावर अवलंबून आहे. कोकणात जर पर्यटन जर मजबूत करावयाचे असेल तर रस्ता हा उत्तम असण्याची गरज आहे. सर्व काही सुरळीत झाल्यास हा महामार्ग येत्या दोन वर्षात पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन वर्षांनी कोकणातील चाकरमनी गणपतीला वेगाने आपल्या घरी पोहोचेल, सध्यासारखी त्याची रखडपट्टी होणार नाही, अशी अपेक्षा करु या. या मार्गाचे चौपदरीकरण झाल्याने तसेच भविष्यात कोकण रेल्वेवरील काही मार्ग घाटाला जोडले जाणार असल्यामुळे या भागाचे चित्र झपाट्याने बदलणार आहे. त्याचबरोबर जैतापूर प्रकल्प, नियोजित मोठी रिफायनरी हे प्रकल्प येऊ घातले आहेत. गेल्या चार दशकापूर्वी पश्‍चिम महाराष्ट्राचे चित्र बदलण्यास सुरुवात झाली. यातून या भागात संपत्ती आली, समृध्दी आली. कोकणाला मात्र संपत्ती व समृध्दी गेले काही वर्षे हुलकावणी देत आहे. कारण यासाठी चांगले रस्ते असणे ही प्राथमिक गरज आहे. सरकार सध्या कोकणाच्या विकासाबाबत गांभीर्याने विचार करते आहे असे दिसते. मात्र हे नियोजित सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे. बाप्पाला निरोप देताना आपण हे प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ देत अशी एकमुखी मागणी करु या.
-----------------------------------------------------------

0 Response to "चौपदरीकरणाला वेग द्या"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel