-->
नवीन राजकीय समिकरणे?

नवीन राजकीय समिकरणे?

रविवार दि. 14 जुलै 2019 च्या अंकासाठी चिंतन - 
-----------------------------------------------
नवीन राजकीय समिकरणे?
-------------------------------------
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याने तसेच वंचित बहुजन आघाडीतून लक्ष्मण माने फुटून बाहेर पडल्याने राज्यातील राजकारणात आता काही नवे घडणार अशी शक्यता निर्माण झाली आहे. राज ठाकरे यांनी दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन मतपत्रिकेवर मतदान घ्यावे अशी मागणी केली आहे. अर्थात ही मागणी मान्य होणार नाही हे सर्वांनाच माहित आहे. सोनिया गांधी यांच्याशी देखील याच मुद्यावर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले असले तरीही याशिवाय निश्‍चितच राजकीय मुद्यावर चर्चा झाली असणार यात काही शंका नाही. लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज ठाकरे यांनी महाराष्टात आपले उमेदवार उभे न करता मोदींच्या विरोधात सभा घेतल्या होत्या. त्यांच्या आक्रमक शैलीतील भाषणांचा जनतेवर फार प्रभाव पडल्याचे जाणवत होते. मात्र तशी अपेक्षित मते काही पडली नाहीत. लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहता आगामी विधानसभा निवडणूक विरोधकांसाठी मोठे आव्हान ठरणार आहे. राज ठाकरे यांना आपले अस्तित्व टिकवायचेही आहे व कॉग्रेसलाही सत्ताधार्‍यांच्या विरोधात मोट बांधावयाची आहे. आजपर्यंत राज सोबत जाण्यास कॉँग्रेसमधील बहुतेकांचा विरोधच होता. आता बहुदा हळूहळू काळाची गरज म्हणून विरोध मावळत जाईल असे दिसते. उपराकार लक्ष्मण माने यांंनी गेल्याच आठवड्यात बहुजन वंचित आघाडीची वैचारिक दिवाळखोरी उघड केली आणि त्यांच्या या बंडोखोरीमुळे राज्यात पुरोगामी शक्तींची नवीन राजकीय समीकरणांची बांधणी सुरु झाल्याचे सुचित झाले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीमुळे कॉँग्रेस-राष्ठ्रवादी आघाडीला 12 जाागंवर फटका सहन करावा लागला आहे. त्यामुळे बाळासाहेब आंबेडकरांची वंचित आघाडी ही भाजपाची बी टीम असल्याची जी टीका होत होती त्यावर शिक्केमोर्तब झाले. आता देखील वंचित आघाडीने जी जागांची ऑफर दिली आहे ते पाहता त्यांना कॉँग्रेसशी आघाडी करण्याची इच्छाच नाही असेच दिसते. म्हणजेच पुन्हा वंचित आघाडी आता लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही स्वतंत्रपणाने लढवून भाजपाचाच फायदा करुन देणार हे स्पष्ट आहे. मात्र प्रकाश आंबेडकरांचा प्रतिगामी पक्षांना मदत करण्याचा हा डाव उधळून लावण्याचे वंचित आघाडींच्या नेत्यांनी ठरविले आहे. त्यातून लक्ष्मण माने यांनी बंडखोरी करुन आपण स्वतंत्र लढणार असल्याचे सुचित केले होते. त्यानंतर दोनच दिवसांनी त्यांनी आमदार जयंतभाईंच्या वाढदिवसांच्या अलिबाग येथील कार्यक्रमाला हजेरी लावली. आज देशात प्रतिगामी शक्ती एवढ्या आक्रमक झाल्या आहेत की त्यांना कोणताच विरोधक नको आहे. देशातील पुरोगामी विचार व पक्ष त्यांना संपवायचे आहेत. अशा वेळी देशातील सेक्युलर पक्षांनी एकत्र येऊन या विरोधात लढा देण्याची आवश्यकता आहे. लोकसभा निवडणुकीत काही प्रमाणात विरोधक एकत्र आले असेल तरीही त्यांना फारसे यश आले नाही. रायगडमध्ये मात्र तटकरे यांचा विजय झाल्याने त्यांच्या रुपाने रायगडातील विरोधकांचा आवाज लोकसभेत घुमणार आहे. रायगडमध्ये जो आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला तोच प्रयोग आता राज्यात नेण्याची गरज आता आहे. कॉँग्रेसला आता व्यापक आघाडीचा विचार करावा लागणार आहे. त्याासाठी त्यांच्या काही नेत्यांची मानसिक तयारी नाही, परंतु ते त्यांना करावे लागणार आहे. राज यांचे परप्रांतीयांविरोधातील धोरण पाहता काँग्रेससाठी कालपरवापर्यंत राज अडचणीचे ठरत होते. मात्र आता बदललेल्या राजकारणात कॉँग्रेसला राज यांना स्वीकारावे लागणार आहे असेच दिसते. यावेळी कॉँग्रेसला तर शून्यापासूनच सुरुवात करावी लागणार आहे. त्यामुळे मनसेला सामावून घेण्याचे धाडस दाखवू शकतात. असे खरोखरीच झाल्यास कॉँग्रेसचे ते एक राजकीय शहाणपण म्हणावे लागेल. विधानसभा निवडणुका आता तोंडावर आल्या आहेत. राष्ट्रवादी, शेकाप यांच्यासह अनेक लहान पक्षांना सोबत घेऊन जावे लागणार आहे. त्याव्दारे विरोधी मतांची विभागणी टाळता येईल. सध्याच्या स्थितीत कॉँग्रेससाठी मनसेला सोबत घेणे फायदेशीर ठरु शकते. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत मनसे उमेदवारांनी लाख, दीड लाख मते घेतली होती. तर विधानसभा निवडणुकीत 13 जागांपर्यंत मुसंडी मारत दमदार एन्ट्री केली होती. तसेच नाशिकसारख्या महानगपालिकेवरही व खेड या नगरपरिषदेवर मनसेने झेंडा फडकवला. परंतु हे यश मनसेला राखता आले नाही. मनसेचे इंजिन रुळावरुन घसरलेे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीपासून त्यांची जी घसरण होत गेली ती त्यांना सावरताच आलेली नाही. सध्याच्या या पडत्या काळात सावरायचे असेल, तर कुणाची ना कुणाची साथ घेण्यावाचून मनसेला पर्याय नाही. शिवसेना-भाजपा एकत्र असल्यामुळे राज ठाकरे त्यांचाया सोबत जाऊ सकत नाहीत. त्यामुळे त्यांच्यापुढे कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीच्या सोबत जाण्याशिवाय काहीच पर्याय नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व राज यांचे अलीकडे सूर जुळल्यासारखे दिसत होते. राज यांनी पुण्यात पवार यांची घेतलेली मुलाखत, हा त्यासाठीचा टर्निंग पॉईंट होता. सोनिया व राज यांच्यातील तीस-पस्तीस मिनिटांतील चर्चाही पुढे याच वळणाने जाईल असे दिसते. राज्यीतल युतीला टक्कर देण्यासाठी आघाडीला सर्व विरोधकांना एकत्र करावे लागणार आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसे या समदु:खी पक्षांना एकत्र यावेच लागेल. शिवसेनेने राज यांच्या भूमिकेची खिल्ली उडविली, असली तरी एकेकाळी सेनेनेही काँग्रेसला पाठिंबा दिला होता, हा इतिहास विसरता येणार नाही. सेनेचा उल्लेख वसंतसेना, असा केला जायचा. आज त्याच मार्गाने मनसे जात असेल, तर त्यात नवीन काहीच नाही. विरोधकांचे गणित बिघडविणाऱया वंचित बहुजन विकास आघाडीचा स्वतंत्रपणे निवडणुका लढविण्याकडे कल आहे. वंचितमधील लक्ष्मण माने फुटले आहेत. त्यांच्या सोबत आता आणखी काही नेते वंचितमधून बाहेर पडतील असा अंदाज आहे. लोकसभेत वंचितने आपले उपद्रवमूल्य दाखवून दिले आहेच. वंचितचे हे आव्हान सौम्य करावयाचे असेल तर सत्ताधार्‍यांच्या सर्व विरोधकांना एकत्र आणावे लागणार आहे. यासाठी कॉँग्रेसला पुढाकार घ्यावा लागणार आहे. त्यामुळे राजकीय अपरिहार्यतेपोटी का होईना राज कॉँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जातील असे दिसते. मनसेचा मुंबई, नाशिक, पुण्यासारख्या शहरातील प्रभाव नाकारता येत नाही. शिवाय राज यांच्या माध्यमातून स्टार प्रचारकही आघाडीला उपलब्ध होऊ शकतो. राजकारणात कुणी कुणाचा कायमस्वरुपी मित्र वा शत्रू नसतो, असे म्हणतात. सगळया आघाडया, युत्या या फायद्यासाठीच असतात. विचारसरणी वगैरे हा मुद्दा दुय्यम ठरतो. निदान आजचे राजकारण तरी त्याच वळणाचे आहे. मनसेची भूमिका आघाडीतील सर्वच घटक पक्षांना शंभर टक्के मान्य होणारी नसली तरीही भाजपा-शिवसेनेला सत्तेतून हुसकाविण्यासाठी तरी सर्वांना एकत्र यावे लागणार आहे. मनसेने एकेकाळी नरेंद्र मोदींचे कौतुक केलेही होते. परंतु ती चूक त्यांना आल्पावधीत उमगली व राज यांनी तेवढ्याच आक्रमकतेने मोदी म्हणजेत भाजपा विरोधी भूमिका घेतली. त्यांच्यातील हा बदल स्वागतार्ह म्हटला पाहिजे. मनसेमुळे राज ठाकरे यांच्या रुपाने आघाडीला एक उत्तम वक्ता मिळेल तसेच सत्तेपर्यंत पोहोचण्याची ते स्वप्ने पाहू शकतात.
----------------------------------------------------------------

0 Response to "नवीन राजकीय समिकरणे?"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel