-->
उपोषणाचे फार्स

उपोषणाचे फार्स

शुक्रवार दि. 13 एप्रिल 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
उपोषणाचे फार्स
महात्मा गांधींनी देशाला स्वातंत्र्यलढ्याच्या काळात उपोषणासारखे आंदोलनाचे प्रभावी अस्त्र दिले. अहिंसेच्या मार्गाने आपल्याला स्वातंत्र्य मिळविले पाहिजे, यासाठी महात्मा गांधी आग्रही होते. यासाठी उपोषण हा प्रभावी उपाय आहे, असे गांधींना नेहमी वाटे. महात्मा गांधींच्या हत्यार्‍यांनाही हे अस्त्र आज प्रभावी वाटत आहे. गांधींच्या विचाराचा हा मोठा विजय म्हटला पाहिजे. महात्माजींचे उपोषणाचे अस्त्र आजही सत्ताधार्‍यांना व विरोधकांना आपलेसे वाटत आहे. परंतु दुर्दैव असे आहे की, हे अस्त्र आपले राजकीय हीत साध्य करण्यासाठी वापरेल जात आहे. विरोधी कॉग्रेस असो किंवा सताधारी भाजपा या दोघानांही गांधींचा विचार कधीच सोडला आहे. भाजपाने विचार सोडला असे म्हणणे चुकीचे आहे, कारण भाजपाला गांधींचा विचार कधीच मान्य नव्हते, परंतु राजकीय स्वार्थासाठी त्यांनी गांधींना आपलेसे केले आहे. भाजपाची मातृ संघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे असलेले नथूराम गोडसे हेच गांधींचे हत्यारे होते, हे उघड सत्य आहे. सध्या ही चर्चा करण्याचे निमित्त म्हणजे, कॉग्रेस व भाजपाने सध्या केलेली उपोषणे. पहिले उपोषण कॉग्रेसने केले. काँग्रेसने आयोजित केलेल्या उपोषणाचा मात्र राजधानीत मोठाच फज्जा उडाला. काँग्रेस कार्यकर्ते उपोषणाला जाण्यापूर्वी छोले-भटुरे चापून खात असल्याचे छायाचित्र भाजपच्या कार्यकर्त्यांनी व्हायरल केले आणि पक्षाध्यक्ष राहुल हेही उपोषणासाठी तास-दोन तास उशिरानेच आले. त्यामुळे त्या उपोषणाचे फार्समध्ये रूपांतर झाले आणि त्याची वृत्तवाहिन्यांनी मनसोक्त खिल्ली उडवली. सध्या वृत्तवाहिन्यांना कॉग्रेसची खिल्ली उडविणे हा आवडीचा विषय आहे, त्याची संधी मात्र कॉग्रेसने त्यांना या निमित्ताने उपलब्ध करुन दिली. त्यापाठोपाठ भाजपाने उपोषणास्त्र काढले. बहुदा त्यांना कॉग्रेसने उपोषण केल्यामुळे पोटात दुखले असावे. त्यामुळे त्यांनी उपोषण केले. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. संसदेचे अर्थसंकल्पी अधिवेशन हे विरोधकांनी घातलेल्या गदारोळात वाहून गेल्याबद्दल आत्मक्लेश करण्याच्या हेतुने भाजपने उपोषणाचा निर्णय घेतल्याचे सांगितलेे. यंदा अर्थसंकल्पी अधिवेशनात संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज केवळ विरोधकांमुळे वाया गेले, असा भाजपचा आरोप आहे. मात्र, विरोधी पक्षाच्या भूमिकेत असताना संसदेचे कामकाज बंद पाडण्याबाबत भाजपची नेमकी भूमिका काय होती, याची या पार्श्‍वभूमीवर त्यांना आठवण करून देणे जरुरीचे आहे. यंदाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात काहीही कामकाज होऊ शकले नाही, म्हणून उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी राज्यसभेचे सभापती या नात्याने सारा दोष काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांवर टाकला. मात्र, यूपीएच्या कालावधीत सुषमा स्वराज व अरुण जेटली यांनी संसदेचे कामकाज चालवू न देणे, हाही विरोधाचा एक लोकशाहीमार्ग असल्याचा अफलातून युक्तिवाद केला होता. खरे तर कॉग्रसने देखील आपल्या सत्तेच्या काळात भाजपाने विरोधक म्हणून संसदेचा किती काळ फुकट घालविला याची आकडेवारी काढली पाहिजे. ही आकडेवारी सध्याच्या गेलेल्या दिवसांपेक्षा निश्‍चितच जास्त असेल. संसदेतील गोंधळाचे एक चक्रच यामुळे पूर्ण झाले असल्यामुळे भाजपने संसदेतील गोंधळाचे कारण पुढे करत उपोषण करण्याचा नैतिक अधिकार जसा गमावला आहे, त्याचबरोबर काँग्रेसलाही वाढत्या दलित अत्याचारांबाबत उपोषण करण्याचा काहीच हक्क नव्हता. मोदी सरकारच्या राजवटीत दलितांवरील अत्याचारांत वाढ झाली, हे खरे असले तरी याचा अर्थ काँग्रेस राजवटीत दलितांवर अत्याचार होत नव्हतेे काय? उत्तर प्रदेशात तर केवळ अखिलेश यादव यांच्या काळातच नव्हे, तर मायावती यांच्या राजवटीतही दलितांवर अत्याचार होतच होते. यंदा संसद न चालण्यामागचे खरे कारण हे वायएसआर काँग्रेस आणि तेलुगू देसम या पक्षांनी मोदी सरकारविरोधात आणलेले अविश्‍वास ठराव हे होते. खरे तर अगदी शिवसेना विरोधात गेली असती, तरीही हे ठराव मंजूर होऊ शकले नसते. तरीही भाजपने या ठरावांवरील चर्चा टाळण्याचा निर्णय घेतला; कारण कर्नाटकातील निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर अविश्‍वास ठरावांवरील चर्चेत निघणारे मोदी सरकारचे वाभाडे भाजपला परवडणारे नव्हते. त्यामुळेच काँग्रेसने गोंधळ करण्याचे थांबवल्यावरही प्रथम तेलंगणा राष्ट्रीय समिती आणि अण्णाद्रमुक या आपल्याच दोन मित्रपक्षांना पुढे करून, सुरू झालेल्या गोंधळाचे निमित्त करून मिनिटा-दोन मिनिटांत काम स्थगित करण्यात आले आणि अविश्‍वास ठरावावरील चर्चा टाळण्यात मोदी सरकार व भाजपने यश मिळविले. या पार्श्‍वभूमीवर आता मोदी आणि भाजप कार्यकर्ते, तसेच काँग्रेस यांची उपोषणे हा निव्वळ कांगावाच आहे. सध्याच्या राज्यकर्त्यांना उपोषणाचे महत्वही नाही किंवा त्यामागे गांधींची जी भावना होती, जो आत्मक्लेष होता तेवढी संवेदनक्षमता या राज्यकर्त्यंमागे नाही. मोदींना जर खरोखरीच आत्मक्लेष करावयाचा असेल तर त्यांनी गोध्रानंतर झालेल्या दंगलीबाबत संपूर्ण देशाची माफी मागावी. मोदी व शहा कायम आपल्या विचारांशी ठाम आहेत व गुजरातमधील दंगलींचे वेगळ्या भाषेत समर्थन करतात, त्यांना त्यादंगलीविषयी खेद वाटत नाही. कॉग्रेसने व तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी निदान इंदिरा गांधींच्या हत्येनंतर झालेल्या दिल्लीतील दंगलीबाबत शीख समाजाची माफी मागितली आहे, याची आठवण होते. एकूणच उपोषणाचे फार्स सध्या देशात जोरात रंगू लागले आहे, त्याला एक वर्षांनी येणार्‍या निवडणुकीची पार्श्‍वभूमी आहे.
----------------------------------------------------

0 Response to "उपोषणाचे फार्स"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel