-->
गांधी घराणे आणि कॉँग्रेस

गांधी घराणे आणि कॉँग्रेस

रविवार दि. 18 ऑगस्ट 2019 च्या अंकासाठी चिंतन - 
-----------------------------------------------
गांधी घराणे आणि कॉँग्रेस
------------------------------------
स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभागी असलेला व सर्वाधिक काळ सत्ता उपभोगलेल्या कॉँग्रेस पक्षाला सध्या अतिशय वाईट दिवस आले आहेत. कधी नव्हे एवढ्या कठीण काळातून कॉँग्रेस जात आहे. सध्या सत्तेवर असलेल्या भाजपाने तर कॉँग्रेसला संपुष्टात आणण्याचा विडाच उचलला आहे. अर्थात भाजपाचे हे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी कॉँग्रेसजनानींच घेतली असल्याचे विदारक चित्र दिसते. कारण गेल्या काही महिन्यात ज्या गतीने कॉँग्रेसजन भाजपावासी होत आहेत ते पाहता भाजपा आता हाऊसफुल्ल झाला आहे. यात त्यांची वैचारिक बांधिलकी शून्य आहे. आहे तो फक्त सत्तासुंदरीचा लोभ. अशा वेळी भाजपाला ही गर्दी सावरणे काठीण होणार असले तरीही कॉँग्रेसला नवीन रक्त पक्षात आणून सावरण्याची गरज होती. ही संधी राजीनामा दिलेल्या राहूल गांधी यांनी गमावली. आता 19 वर्षे पक्षाध्यक्षपदी राहिल्यावर 20 महिन्यांच्या अंतराने पुन्हा पक्षाध्यक्ष झालेल्या सोनिया गांधी वयाच्या 72व्यावर्षी पक्षाला ही नवसंजिवनी देऊ शकणार का, हा सवाल आहे. मात्र एक बाब स्पष्ट आहे की, सध्याच्या स्थितीत भाजपाने कितीही घराणेशाहीचा आरोप केला तरीही काँग्रेस पक्षाला केवळ गांधी घराणेच वाचवू शकते. निदान तसा विश्‍वास तरी सध्या शिल्लक राहिलेल्या कॉँग्रेसजनांना वाटतो. अर्थात या विश्‍वासामागे इतिहास आहे. इंदिरा गांधींनी 77 साली पक्षाला पुन्हा मिळवून दिलेली सत्ता, सोनिया गांधींनी 2004 व 2009 साली पक्षाला सत्तेकडे पोहचविणे या घटना यासाठी पुरेशा बोलक्या आहेत. योगायोगाने 2019 मध्ये काँग्रेसमध्ये नेहरू-गांधी परिवाराच्या राजकारणास 100 वर्षे पूर्ण होत आहेत. 1919 मध्ये पहिल्यांदा नेहरू कुटुंबातून मोतीलाल अध्यक्षपदी निवडून आले होते. त्यानंतर 1929 मध्ये वडिलांच्या जागी जवाहरलाल नेहरू अध्यक्ष झाले. या 100 वर्षांपैकी 50 वर्षे काँग्रेसची सूत्रे नेहरू-गांधी परिवाराच्याच हाती राहिली आहेत. 1978 मध्ये काँग्रेसमध्ये उभी फूट पाडून इंदिरा गांधींनी काँग्रेस (आय) ची स्थापना केली. त्यांची पक्षाध्यक्षपदी व नंतर पंतप्रधानपदी निवड झाली. 1978 ते 2019 पर्यंत 41 वर्षापैकी 33 काँग्रेस वर्षे पक्षाची धुरा नेहरू-गांधी परिवाराकडे राहिली आहे. 134 वर्षांच्या काँग्रेसचे आतापर्यंत 88 अध्यक्ष झाले आहेत. काँग्रेसची स्थापना 1885 मध्ये झाल्यानंतर व्योमेशचंद्र बॅनर्जी पहिले अध्यक्ष झाले. 1885 ते 1933 पर्यंत काँग्रेसमध्ये अध्यक्षपदाची मुदत एक वर्ष होती. 1933 नंतर दोन किंवा जास्त वर्षे अध्यक्षपदावर राहता येत होते. काही वर्षे वगळल्यास दरवर्षी निवडणूक झाली. सर्वाधिक 11 वेळा पंडित नेहरू अध्यक्ष झाले. 1919 मोतीलाल नेहरू 58 व्या वर्षी काँग्रेसचे 36 वे अध्यक्ष झाले होते. 1929 साली पंडित नेहरु 40 वर्षांचे असताना 48 वे अध्यक्ष झाले. ते 11 वेळा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. 1959 साली इंदिरा गांधी वयाच्या 42 व्या वर्षी काँग्रेसच्या 69 व्या अध्यक्ष झाल्या. 1984 मध्ये राजीव गांधींवर चाळिशीत 83 वे अध्यक्ष म्हणून जबाबदारी आली. 1998  साली सोनिया गांधी 54 व्या वर्षी 87 व्या अध्यक्ष झाल्या व 19 वर्षे अध्यक्ष राहिल्या. वयाच्या 47 व्या वर्षी काँग्रेसचे राहूल गांधी 88 वे अध्यक्ष बनले. 17 महिने अध्यक्षपदी राहिल्यावर त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला. लोकसभा निवडणुकीनंतर पक्षाच्या दारुण झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राहूल गांधी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला व त्या निर्णयावर ते शेवटपर्यंत ठाम राहिले. शेवटी अडीज महिन्यांनतर काँग्रेसच्या कार्यकारीणीच्या बैठकीत पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी यांची एकमताने निवड करण्यात आली. ही निवड हंगामी असली तरी नजिकच्या काळात त्यांना पूर्णवेळ अध्यक्ष केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण सध्या काँग्रेस पक्षापुढे भविष्याविषयी अंधार दिसत असताना तसेच कार्यकर्त्यांच्या मनोबलाचे खच्चीकरण झालेले असताना गांधी घराण्याच्या व्यतिरिक्त कुणाची अध्यक्षपदी नियुक्ती करणे म्हणजे पक्षात फूट पडून परिस्थिती अधिकच गंभीर झाली असती. सोनिया गांधींना हा धोका दिसत असावा त्यामुळेच त्यांनी त्यांची प्रकृती ठीक नसतानाही ही जबाबदारी स्वीकारली असावी. सध्याच्या स्थितीत काँग्रेस पक्षाला एकसंघ ठेवणारे नेतृत्व हे गांधी घराण्यातीलच पाहिजे हे वास्तव आहे. प्रियांका गांधी या अध्यक्षपदाची जागा घेऊ शकल्या असत्या परंतु त्यांनी सावकाश जाण्याचे ठरविलेले दिसते. त्यामुळे फक्त सोनिया गांधींनाच पुन्हा अध्यक्ष करणे हाच एकमेव पर्याय शिल्लक होता. दोन वर्षापूर्वी सोनिया गांधींनी आपली खुर्ची खाली करुन राहूल गांधींचा अध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा केला. माञ राहूल गांधी हे त्यात शंभर टक्के यशस्वी झाले नाहीत म्हणजे पक्षाला सत्तेच्या शिखरावर नेण्यास असमर्थ ठरले. माञ त्यांनी त्यासाठी प्रामाणिकपणाने प्रयत्न केले हे ही तेवढेच खरे. अतिशय कठीण काळात राहूल यांच्याकडे पक्षाचे नेतृत्व आले. मध्यप्रदेश, राजस्थान व पंजाब या मोठ्या राज्यात काँग्रेसकडे सत्ता आली. कर्नाटकात विरोधकांचे सरकार आणले (नंतर ते भाजपाने पाडले) व गुजरात विधानसभा निवडणकीत भाजपाच्या नाकी नऊ आणले हे राहूल गांधीचे मोठे यश होते. माञ लोकसभा निवडणुकीत त्यांनी जिवाचे रान करुनही यश लाभले नाही. याचे कारण त्यांची लढाई एकखांबी होती. सर्व काँग्रेस कार्यकर्ते व नेते देखील सत्व गमावून बसले होते व सत्ताधार्‍यांविरोधात लढण्याची त्यांची मानसिकताच संपली होती. राहूल गांधींनी आपल्या राजीनामापञात हे वास्तव मांडले होते. भाजपाने त्यांच्या विरोधात सोशल मिडियातून एवढी जबरदस्त मोहीम उघडूनही राहूल आपल्या वैचारिक बैठकीपासून ढळले नव्हते. परंतु लोकसभेतील पराभवानंतर त्यांचेही मनोधैर्य खचले. शेवटी त्यातूनच ते आपल्या राजीनाम्यावर ठाम राहिले. शेवटी पक्षाला अशाच काळात नेतृत्व दिले पाहिजे याची जाणीव सोनिया गांधीना झाली आणि त्यांनी हे नेतृत्व स्वीकारले आहे. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर सोनिया गांधी या तब्बल सात वर्षे राजकारणात नव्हत्या. त्या आपल्या दोघा मुलांना घेऊन विदेशात जातील अशाही कंड्या त्यावेळी पिकविण्यात आल्या. त्यावेळी त्यांच्यावर झालेल्या कोणत्याही आरोपाला त्यांनी उत्तर दिले नाही. विदेशात जन्म होऊनही त्या एखाद्या भारतीय स्ञी प्रमाणे या देशाशी प्रामाणिक राहिल्या. इथेच राहून त्यांनी मुलांना मोठे केले आणि त्यांच्या भारतीयत्वावर सवाल करणार्‍यांना चोख उत्तर दिले. 98 साली त्यांनी काँग्रेस पक्षाची सुञे हाती घेतली त्यावेळी पक्ष सत्तेवर नव्हता. विस्कळीत झालेला होता. पक्षातील बड्या धेंडांना आवर घालणे या बाईला जमेला का असे सर्वांना वाटत होते. परंतु या सर्व नेत्यांच्या हळूहळू मुसक्या आवळत पक्ष संघटना मजबूत केली. 2004 साली पक्षाला सत्तेच्या दारात नेऊन ठेवले. त्यानंतर पाच वर्षांनी पक्षाला पुन्हा एकदा सत्ता मिळवून दिली. काँग्रेससोबत समविचारी पक्षांची मोट बांधली व सत्तेचा गाडा हाकण्याची सुञे डॉ. मनमोहनसिंग यांच्यासारख्या पारदर्शी, अभ्यासू व अर्थतज्याच्या हाती दिली. पक्षाची सुञे त्यांच्याकडे तब्बल 19 वर्षे होती. यात त्यांनी 2014 चा दारुण पराभवही पाहिला. आता पुन्हा एकदा पक्षाने त्यांच्यावर विश्‍वास व्यक्त केला आहे. यातून पुन्हा पक्षाला सावरुन गतवैभव प्राप्त करुन देतील का, हा मोठा सवाल आहे. सध्या प्रतिगामी शक्ती देशात कधी नव्हे एवढ्या आक्रमक झाल्या आहेत. सोशल मिडियाने देशात एक नवे वळण घेतले आहे. सत्तेतील भाजपा आजवर देशाचा असलेला इतिहास फुसून नवा इतिहास लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे. खोटे सतत बोलून ते खरे वाटावे अशा स्थितीला जनतेला आणत आहे. स्वातंञ्यानंतर देशाने जी मूल्ये पाळली त्याला तिलांजली देण्याचा पध्दतशीर प्रयत्न केला जात आहे. अशा स्थितीत सोनिया गांधींपुढे अनेक आव्हाने आहेत. पक्षाला सत्तेत बसवणे हे आव्हान दुय्यम आहे. त्यापेक्षाही विस्कटलेली संघटना पुन्हा मजबूत करावी लागेल. तसेच गांधी-नेहरुंच्या विचारांची बैठक पक्की करत पक्षाला बळ द्यावे लागेल. 98 साली त्यांनी ज्यावेळी पक्षाची सुञे हाती घेतली होती त्यापेक्षा सध्याची आव्हाने फार मोठी आहेत. त्यावेळी त्यांनी धीरगंभीरपणाने कामे करीत वाटचाल केली पक्षाला वैभव प्राप्त करुन दिले. आता पक्ष व कार्यकर्ते त्यांच्याकडून वयाच्या 72 व्या वर्षी हीच अपेक्षा करीत आहेत. पक्षाला सोनियांचे दिवस खरोखरीच येतील का ते आता सांगणे कठीण आहे. माञ सोनिया गांधी यांना याबाबत विश्‍वास असावा त्यामुळेच त्यांनी सुञे पुन्हा हाती घेतली आहेत. काँग्रेससाठी हा विश्‍वासच आश्‍वासक ठरावा. गांधी घराणे व कॉँग्रेस पक्ष यांचे एक अतूट नाते आहे. कोणाला ती घराणेशाही वाटेल परंतु आहे ही वस्तुस्थिती आहे.
--------------------------------------------------------------------------------

0 Response to "गांधी घराणे आणि कॉँग्रेस"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel