-->
भिडे गुर्जींचा जादूचा  हिंदुत्ववादी आंबा!

भिडे गुर्जींचा जादूचा हिंदुत्ववादी आंबा!

बुधवार दि. 13 जून 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
भिडे गुर्जींचा जादूचा
हिंदुत्ववादी आंबा!
कट्टर हिंदुत्ववादी, शिवभक्त, सध्याच्या केंद्र व राज्यातील भाजपा सरकारचे जीवलग दोस्त भिडे गुर्जींच्या घरी असलेला आंबा काही औरच आहे. जगात अस्तित्वात नाही असा आंबा या रसायनशास्त्रात उच्च पदवी घेतलेल्या माणसाच्या दारी आहे. माझ्या शेतातील आंबा खाल्ला तर अपत्यप्राप्ती होते. अगदी मुलगा पाहिजे असल्यास मुलगाही होतो, असे त्यांनी नुकतेच नाशिक येथे सांगताना हा आंबा 180 जोडप्यांनी खाल्ला असता त्यातील 150 अपत्यांना मूल झाले असा त्यांनी दावा देखील केला. भिडेंच्या या दाव्यावर काय बोलावे असाच प्रश्‍न आहे. कारण गुर्जी हे रसायनशास्त्रातील उच्च शिक्षीत आहेत. त्यांना विज्ञान काय आहे, याची पूर्ण कल्पना आहे. मूले कशामुळे होतात? आंबे खाल्याने होतात का? असे प्रश्‍न आम्हाला त्यांना विचारणे योग्य वाटत नाही. कारण त्यांच्या वयाचा व रसायनशास्त्रातील ज्ञानाचा आम्ही आदर करतो. परंतु काही तरी मनाला खटकतेच. कदाचित सत्ता आल्यापासून या देशातील हिंदुत्ववाद्यांना आपले हात गगनाला पोहोचल्यासारखे झाले आहेत. त्याच हा भाग असावा. कारण महाभारतात इंटरनेट होते, गणपती हे प्लॅस्टिक सर्जरीचे त्या काळात होत होती याचे उत्तम उदाहरण, डार्वीनचा सिध्दांत वेदात मांडलेला असणे, अशी जी काही अलिकडेच्या काळात विधाने एैकू येतात त्यावरुन आपण पुराणात सध्या वावरतो आहोत की काय असा भास होतो. खरेतर आपल्याकडे आता नव्याने काहीच संशोधन करण्याची गरज राहिलेली नाही. आपल्या वेदातून, रामायण, महाभारतातून बरेच काही हिंदुत्ववाद्यांकडून शिकून घेऊन त्याची अंमलबजावणी करण्याची गरज आहे, असे वाटू लागले आहे. ज्या जोडप्यांना अपत्यप्राप्ती होत नाही त्यांनी यापुढे डॉक्टरांकडे जाण्याऐवजी भिडे गुर्जींकडे जावे. कदाचित हे लिहीपर्यंत तेथे त्यांच्या घराबाहेर आंबा खाण्यासाठी भलीमोठी लाईन लागलीही असेल. कारण आंब्याचा सिझन संपत आलेला आहे, त्यामुळे पुढील सिझन सुरु होईपर्यंत थांबण्यापेक्षा तो लवकर खावा व अपत्यप्राप्ती करुन घ्यावी, अशी अनेकांची समजूत होण्याची शक्यता आहे. एक आंबा खाल्ला की मुल होण्याची चिंता मिटली. यात आणखी एक शंका आमच्या मनात आहे, जर आंबा खाणारे जोडपे हे कदाचित हिंदू वगळता मुस्लिम किंवा अन्य धर्मिय असेल तर ते त्यांना हे औषध लागू पडण्याची शक्यता नसावी. कारण हे हिंदुत्ववाद्यांनी हिंदूंसाठीच तयार केलेले जालीम औषध असू शकते, अशी आम्हाला दाट शंका आहे. यानिमित्ताने आजवर अपत्यप्राप्तीसाठी झालेले जागतिक पातळीवरील संशोधन निरर्थक आहे, असे वाटते. कदाचित गुर्जींकडे अजूनही विविध रोगांवर जालीम औषधे असू शकतात. हळूहळू काळाच्या ओघात ते उघड होईलही. गुर्जींकडे असा जादूसारखा वाटणारा आंबा आहे, हे कळायला आपल्याला ऐवढी वर्षे लागली. त्यामुळे नजीकच्या काळात अन्य फळेही प्रकाशझोतात येतील, अशी आपण अपेक्षा करु या. मूल होणारा आंबा जर उपलब्ध असेल तर संततीनियमनासाठी फणस असू शकतो. आम्हाला वाटते, या आंब्याचा प्रयोग फक्त हिंदूंवरच व्हावा. कारण हिंदूंना आपली लोकसंख्या वाढविण्याची आवश्यकता आहे, नाहीतर उद्या भारताचा पाकिस्तान होण्याचा धोका आहेच, असे सध्या वारंवार बिंबविले जाते. कदाचित या बागेत असाही एखाादा आंबा असू शकतो, की जो जुळी, तिळी मुले देऊ शकेल. त्यामुळे हिंदूंची लोकसंख्या झपाट्याने वाढू शकेल. याचा फायदा शेवटी भाजपालाच मिळणार आहे, कारण तेवढे मतदार झपाट्याने वाढणार आहेत. यातून पुढील पन्नास काय शंभर वर्षे सत्ता ही भाजपाचीच राहाणार आहे. गेल्या दशकात झाला नाही एवढा विकास 48 महिन्यात झाल्याचे आपण सध्या जाहीरातीत एैकतो, वाचतो. भाजपा जर शंभर वर्षे सत्तेत राहिला तर विकसीत असलेल्या अमिरेका, युरोप व चीनची काही खैर नाही. मात्र त्यासाठी या आंब्याचे पेटंट तातडीने घेण्याची आवश्यकता आहे. नाही तर हळदीसारखे व्हायला नको. गुर्जींच्या बागेतल्या या आंब्याचे त्यांनाच पेटंट मिळो, एखाद्या अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनीला ते मिळता कामा नये, याची देखील आपल्याला दक्षता घेतली पाहिजे. कारण या आंब्याचा बाठा जर एखाद्या अमेरिकन कंपनीच्या हाती लागला तर ते त्याचे उत्पादन अन्य कोणत्याही देशात सुरु करतील व नको त्या देशाची लोकसंख्या वाढेल. गुर्जींचे हे संशोधन एवढे भ्रन्नाट आहे, की कदाचित त्यांना याबाबत मॅगससे किंवा नोबेलही मिळू शकते. त्यासाठी आवश्यक ते जागतिक पातळीवर लॉबिंग आपल्या देशाचे सततचे फिरतीवर असलेले पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी करु शकतील. कारण मोदी हे गुर्जींना गुरुप्रमाणे मानतात. मग शिष्याने गुरुसाठी एवढी शुल्लक गोष्ट का करु नये? पण काय करणार, हिंदुत्वाचेही अनेक मारेकरी असतात. अगदी याचे उत्तम उदाहरण सांगायचे म्हणजे राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी या आंब्याची थट्टा उडवत, अशा आंब्याचे संशोधन झाल्याचे एैकिवात नाही. आपल्या वनक्षेत्रात असा आंबा नाही असे म्हणण्याचे धाडस त्यांनी केले आहे. कदाचित त्यांना याबद्दल शिक्षा भोगावी लागेल किंवा त्यांंना हा आंबा कुठे सापडेलही. असो. गुर्जींच्या या हिंदुत्ववादी आंब्याची महती एैकून केवळ आपणच नव्हे तर सारे जग अचंबित झालेले आहे. अजून राहिलेल्या या दीड वर्षांच्या राजवटीत असे बरेच संशोधन बाहेर येऊ शकते.
----------------------------------------------------------

0 Response to "भिडे गुर्जींचा जादूचा हिंदुत्ववादी आंबा!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel