-->
नारायण राणेंचे एक वर्तुळ पूर्ण

नारायण राणेंचे एक वर्तुळ पूर्ण

रविवार दि. 08 ऑक्टोबर 2017 च्या मोहोरसाठी लेख -- 
------------------------------------------------
नारायण राणेंचे एक वर्तुळ पूर्ण
---------------------------------------
एन्ट्रो- सध्या कोणालाही पक्षाची वैचारिक बैठक नको आहे. फक्त हव्या आहेत त्या सत्तेच्या चाव्या. कारण सत्ता असली की आपण समाजसेवा करु शकतो, सत्तेशिवाय ते शक्य नाही अशी राजकारण्यांची ठाम समजूत झालेली आहे. राणेंची जी सध्या मर्यादीत ताकद सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे तिकडे त्यांच्या पक्षाला चांगला पाठिंबा लाभेल, यात काही शंका नाही. परंतु आता अशा प्रकारे सतत पक्षांतरे केल्याने त्यांची प्रतिमा मलिन होणार आहे हे नक्की. गेल्या विधानसभेला अशक्य वाटणारा पराभव राणेंना मालवणकरांनी दाखवून दिला आहे, हे विसरता येणार नाही. शेवटी राणेंसारखा जनपाठिंबा असलेला नेता देखील सत्तेशिवाय फार काळ जगू शकत नाही, हेच यावरुन पुन्हा एकदा सिद्द झाले आहे. राणेंकडे जिल्ह्यातील सर्व आर्थिक, राजकीय ताकदीच्या नाड्या ताब्यात आहेत. परंतु ती सत्ता त्यांना पुरेशी वाटत नाही तर राज्यातील एक प्रमुख ताकद म्हणून आपल्याकडे पहावे असे त्यांना वाटते. सत्तेच्या चाव्या असणे केव्हांही चांगले, परंतु ती सत्ता जनतेसाठी राबविणेे सोपे नाही. अर्थात तीन पक्षांचे वर्तुळ पूर्ण करणार्‍यां राणेंना हे सांगण्याची काही गरज नाही.
-------------------------
माजी मुख्यमंत्री व कॉँग्रेसला नुकताच हात दाखविलेले कोकणचे नेते नारायण राणे यांनी अखेर सर्वांचे अंदाज खोटे ठरवित भाजपात प्रवेश न करता स्वतंत्र पक्षाची घोषणा केली आहे. त्यांच्या या पक्षाला आता भाजपाप्रणित आघाडीने सत्तेत सहभागी होण्यासाठी आमंत्रण दिले आहे. त्यामुळे राणेंनी भाजपात प्रवेश केला नसला तरी सत्तेच्या वर्तुळात मात्र जरुर प्रवेश केला आहे असे म्हणता येईल. राणेंच्या भाजपाच्या जवळीकीमुळे त्यांचे राजकारणातील एक वर्तुळ आता पूर्ण झाले असे म्हणता येईल. त्यांची राजकीय कारकिर्द शिवसेनेपासून सुरु झाली. त्यांनी शिवसेनेत काम करायला सुरुवात केली त्यावेळी बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेतला नव्हता. त्यावेळी शिवसेना केवळ मराठी माणसांसाठी झटणारी एक संघटना होती. त्याकाळी शिवसेनेचा राजकारणापेक्षा समाजकारणावर जास्त भर होता. मात्र 90च्या पुढे त्यांनी हिंदुत्वाची झुल पांघरली आणि राणेंसारखे शिवसेनेच अनेक नेते त्यावेळी हिंदुत्वाचा गजर करु लागले. अर्थात शिवसेनेचे हिंदुत्व हे जेवणात लोणचे जसे खातात त्याप्रमाणे होते. आजही ते हिंदुत्वाचा मोठा आव आणीत असले तरीही त्यांना मराठी माणसांची संघटना असेच संबोधिले जाते. आता शिवसेनेने मराठी माणसांच्या भल्यासाठी काय केले हा एक संशोधनाचा विषय ठरेल. असो. 35 वर्षाच्या शिवसेनेतील व सरकारमधील विविध पदे उपभोगल्यावर नारायणरावांनी पक्षसंघटनेचा त्याग करुन कॉग्रेसमध्ये प्रवेश केला. शिवसेनेतील दुसर्‍या पिढीशी त्यांचे काही जुळत नव्हते. त्यामुळे त्यांनी आता आपल्याला शिवसेनेत किंमत उरणार नाही हे वेळीच ओळखून पक्षाचा त्याग केला. त्यानंतर त्यांना कॉग्रेसने सन्मानाने पक्षात घेतले. त्यांना मंत्रिमंडळात दुसरे स्थान दिले. एका मुलाला खासदार व दुसर्‍याला आमदार केले. असे असले तरीही त्यांचे विरोधात बसल्यावर कॉग्रेस नेत्यांशी सूर काही जुळेनात. परिणामी त्यांनी भाजपात प्रवेश करण्यासाठी गेले चार महिने फिल्डिंग लावली. शेवटी भाजपाने त्यांना आयत्या वेळी टांगच दिली व त्यांना पक्ष स्थापनेचा सल्ला दिला. आता त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार आहे. राणेंचे आता वर्तुळ पूर्ण झाले असे म्हणण्याचे कारण एकच की, सुरुवातीला हिंदुत्ववादी पक्षात त्यानंतर कॉग्रेससारख्या सर्वधर्मसमभाव मानणार्‍या पक्षात एक तपाहून जास्त काळ व आता पुन्हा हिंदुत्ववादी पक्षाशी चुंबाचुंबी. त्यांचे अशा प्रकारे राजकीय वर्तुळ पूर्ण झाले. त्यांच्या भाजपा प्रवेशाला अनेकांचा विरोध होता. खुद्द मुख्यमंत्र्यांनाच राणे पक्षात नको होते, हे काही लपून राहिलेले नाही. मात्र केंद्रीय नेतृत्व नेतृत्वास प्रामुख्याने अमित शहा यांना राणेंनी पक्षात प्रवेश करावा असे वाटत होते. भाजपाची पितृसंघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा राणेंच्या प्रवेशाला सुरुवातीला विरोध होता. मात्र नंतर त्यांचा विरोध मावळला असे सांगण्यात येते. संघ अशा राजकीय बाबतीत उघडपणे कधीही वाच्यता करीत नाही, मात्र पडद्याआड कारवाया करीत असतो. त्यामुळे त्यांची राणेंच्या संदर्भात भूमिका कोणती हे कधीच स्पष्ट झाले नाही. मात्र राणेंचा प्रवेश लांबला व अखेरीस रद्द झाला त्यावरुन संघाचाही त्यांना विरोध होता हे स्पष्टच आहे. नारायण राणे यांचे पुत्र अध्यक्ष असलेल्या स्वाभिमानी संघटनेचे आता पक्षात रुपांतर केले जाणार आहे, असेच म्हणावे लागेल. कारण स्वाभिमानी ही संघटना राणेंनी कॉँग्रेस पक्षात असल्यापासून समांतर सुरु ठेवली होती. खरे तर अशा प्रकारची समांतर संघटना कॉँग्रेस पक्षात खपवून घेतली जात नाही. असे असले तरीही राणेंकडे याबाबत कॉँग्रेस पक्षाने उदारमतवादी दृष्टीकोन ठेवून दुर्लक्ष केले होते. राणेंच्या या स्वाभिमानी पक्षाचे अस्तित्व राज्यवापी असणार अशी घोषणा केली असली तरीही अर्थातच याचे कार्यक्षेत्र कोकणापूरतेच म्हणजे बहुतांशी सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरतेच मर्यादीत असेल. आपल्या राज्यात अशा प्रकारे वन मॅन आर्मी असणारे पक्ष काही कमी नाहीत. सदाभाऊ खोत, राजू शेट्टी, विनायक मेटे, महादेव जानकर, बच्चू कडू, रामदास आठवले व राज ठाकरे यांच्या जोडीला आता नारायण राणे आले आहेत, असे आपल्याला म्हणता येईल. अर्थात अशा प्रकारचा पक्ष स्थापन करुन आपली सत्तेच्या घोडेबाजारात किंमत वाढवून घेणे फारच फायदेशीर असते. प्रामुख्याने ज्यावेळी एखाद्या पक्षास स्पष्ट बहुमत मिळत नाही त्यावेळी अशा पक्ष नेत्यांची चांगलीच चलती होते. नारायण राणेंचा स्वाभिमानी पक्ष आता भाजपाच्या वळचणीला लागला आहे. दोन वर्षांनी निवडणूक झाल्यावर कॉँग्रेसला जर सत्तेच्या जवळ जाण्याची संधी मिळाली तर राणे पुन्हा कॉँग्रेसच्या कळपात जाऊ शकतील. अर्थात त्यांनी कॉँग्रेस सोडताना नाही तरी केंद्रीय नेतृत्वावर टीका केलेली नाही. उलट पक्षाध्यक्ष सोनिया गांधी व राहूल गांधी यांचे नेहमीच सहकार्य लाभले असे सांगून पुढे काळाच्या ओघात कॉँग्रेस पक्षाशी जवळीक करण्याचा आपला पर्याय खुला ठेवला आहे. अर्थात असे राजकारण करुनही लोक जर स्वत:ला स्वाभिमानी म्हणवून घेतात यावरुन आपले राजकारण किती खालच्या पातळीचे झाले आहे, हे दिसते. सध्या कोणालाही पक्षाची वैचारिक बैठक नको आहे. फक्त हव्या आहेत त्या सत्तेच्या चाव्या. कारण सत्ता असली की आपण समाजसेवा करु शकतो, सत्तेशिवाय ते शक्य नाही अशी ठाम राजकारण्यांची समजूत झालेली आहे. राणेंची जी सध्या मर्यादीत ताकद सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे तिकडे त्यांच्या पक्षाला चांगला पाठिंबा लाभेल, यात काही शंका नाही. परंतु आता अशा प्रकारे सतत पक्षांतरे केल्याने त्यांची प्रतिमा मलिन होणार आहे हे नक्की. गेल्या विधानसभेला अशक्य वाटणारा पराभव राणेंना मालवणकरांनी दाखवून दिला आहे, हे विसरता येणार नाही. शेवटी राणेंसारखा जनपाठिंबा असलेला नेता देखील सत्तेशिवाय फार काळ जगू शकत नाही, हेच यावरुन पुन्हा एकदा सिद्द झाले आहे. राणेंकडे जिल्ह्यातील सर्व आर्थिक, राजकीय ताकदीच्या नाड्या ताब्यात आहेत. परंतु ती सत्ता त्यांना पुरेशी वाटत नाही तर राज्यातील एक प्रमुख ताकद म्हणून आपल्याकडे पहावे असे त्यांना वाटते. सत्तेच्या चाव्या असणे केव्हांही चांगले, परंतु ती सत्ता जनतेसाठी राबविणेे सोपे नाही. अर्थात तीन पक्षांचे वर्तुळ पूर्ण करणार्‍यां राणेंना हे सांगण्याची काही गरज नाही.
-------------------------------------------------------------------------------------------------

0 Response to "नारायण राणेंचे एक वर्तुळ पूर्ण"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel