-->
आली दिवाळी...

आली दिवाळी...

रविवार दि. 15 ऑक्टोबर 2017 च्या मोहोरसाठी लेख -- 
------------------------------------------------
आली दिवाळी...
----------------------------------
एन्ट्रो- दीपावलीत लक्ष दिव्यांच्या ज्योतीचे तेज उधळीत दीपावलीचे आगमन व्हावे आणि सृष्टीलाच चैतन्याचे स्वप्न पडावे, अवघ्या भूतलावर आनंदाच्या रंगाचीच बरसात व्हावी, त्याप्रमाणे मनामनाचे कोपरे या आनंदसरींनी न्हाऊन निघावे. दैनंदिन व्यापातापांचा क्षणभर विसर पडून मांगल्याच्या पदकमलांनी अंत:करण निर्मल व्हावे. कोणा दु:खितांच्या काळजावर या आनंदाची फुंकर मारावी. दुभंगलेली मने सांधण्यासाठी दिवाळीच्या महाउत्सवाचे सुंदर निमित्त व्हावे आणि खरच ही दिवाळीसुद्धा वर्षातील तीनशे पासष्ट दिवस सुख-दु:खाच्या पाठशिवणीचा आणि थंडी, वारा, ऊन, पाऊस, प्रतिकूलता या सगळ्याचा सामना केल्यानंतरच येते कारण दिवाळी प्रत्येकाचा मनातील आशादीप चिरकाल प्रकाशमान करण्यासाठी येते. अशा प्रकारे एकीकडे अंधार असताना या जगात काही प्रकाशमान बाबीही घडत असतात. त्याच बाबी उराशी बाळगून आपण हा प्रकाशाचा उत्सव साजरा करु या...
-----------------------------------
दिवाळी म्हणजे आशा, आकांक्षा वृध्दींगत करणारा दिव्यांचा, प्रकाशाचा सण. आपल्या मनात असलेले दुख:, निराशा क्षणभर विसरुन आपण हा सण साजरा करतो. यामागे भावना असते ती आगामी चांगल्या भविष्यवेधी कालखंडाची, उष:कालाची. असा हा सण साजरा करीत असताना आपल्या मनात नेहमी आनंदच असतो. दरवर्षी काही ना काही तरी संकटे आपल्यावर येतच असतात, तरीही या संकटांवर फुंकर घालीत आपण दिवाळी साजरी करतोच. आपली निराशा विसरुन आपम तेवढ्याच जोमाने दिवाळीचे स्वागत करतो. शेतकरी खुशीत असतो कारण या काळातच पीक चांगलेच बहरुन आलेले असते. कष्टकर्‍यांच्या कष्टाचे चीज झालेले असते. कामगारांच्या हातात बोनस पडल्यामुळे त्यांना घरच्यासाठी खर्च करण्यासाठी एक संधी उपलब्ध होते. देशातील कष्टकर्‍यांची पंढरी असलेल्या मुंबईत पूर्वी गिरणी कामगारांना बोनस जाहीर होई आणि नंतर इतर उद्योगातील कामगारांचे बोनस जाहीर होत. आता गिरणी कामगारच संपला. इतर कामगारांना त्यांच्या पैशातून बोनस देण्याची पध्दत सुरु केली. असो. गेल्या काही वर्षात दिवाळी तीच राहिली मात्र दिवाळीत खर्च करण्याच्या स्त्रोत मात्र आटत गेले आहेत. कामगार-कष्टकरी दिवाळीत आपल्या वर्षाची पुंजी एकत्र करुन नवीन वस्तू खरेदी करतो, भविष्याची तरतुद करण्यासाठी सोन्याची खरेदी करतो. वर्षात झालेल्या कडू आठवणी काही क्षण विसरुन प्रत्येक जण दिवाळी साजरी करतो. यंदाच्या वर्षी महागाईने कळस गाठला आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्या काही थांबत नाहीत. त्याच्या जोडीला किटकनाशाकांची फवारणी करणार्‍या शेतकर्‍यांना आता मृत्यूने गाठले आहे. यंदा पाऊस चांगला असला तरीही भारनियमन काही संपलेले नाही. अशात शेतकरी कसेतरी आपले दिवस कंठीत आहे. अनेकांच्या रोजगारांवर नोटाबंदीनंतर गदा आली असताना नवीन रोजगारांच्या संधीही खुंटल्या आहेत. त्यामुळे नव्या नोकर्‍यांची निर्मीती नाही व जुन्या नोकर्‍या टिकविणे अवघड आहे, अशा स्थितीत आपल्या रोजगाराचे गाडे अडले आहे. तरी देखील यंदाची दिवाळी जशी परवडेल तशी सर्वसामान्य माणसे साजरी करीत आहेत. केंद्र व राज्य सरकारने निवडणुकीपूर्वी अनेक मोठ्या आश्‍वासनांची खैरात केली होती. मात्र प्रत्यक्षात लोकांच्या हाती निराशाच आली आहे. दिवाळीच्या या प्रकाशात अंधाराची चर्चा कशाला? असा प्रश्‍न अनेकांना पडला असेल. मुंबईसारख्या महानगरात तर सतत आकाशदिव्यांचा झगमगाट असतो, पण दिवाळीच्या दिवसांत सर्वत्र आकाशदिव्यांच्या रांगा उजळल्या असतानाच लालबत्तीच्या भेसूर प्रकाशाआड ओथंबलेल्या अश्रूंचा ओलावा कधी कोणाला जाणवतो? त्या जव्हार मोखाड्याच्या पाड्यांवर कुपोषणाचे संकट कायम असते. तिथल्या निष्पाप जीवांना प्रकाशाचा खरा अर्थ सांगण्याची हीच वेळ आहे, असे आपल्याला कधीच कसे वाटत नाही? राजाला रोजच दिवाळी असते आणि दीनदुबळ्यांसाठी रोजच शिमगा असतो त्यांच्या वाट्याला वर्षातून किमान एक दिवस प्रकाशाचा किरण पसरावा यासाठी आपल्या संवेदना कधीच कशा हेलावत नाही? एका टोकाला चंगळवादाचा कळस गाठला जात असतो. दुसरीकडे याकडे अचंबित आणि हतबलपणे पाहणारे गरीब, अश्राप जीव दिसत असतात. शेजारच्या अंधाराचे भान आपल्याला नसते. या दीपावलीत लक्ष दिव्यांच्या ज्योतीचे तेज उधळीत दीपावलीचे आगमन व्हावे आणि सृष्टीलाच चैतन्याचे स्वप्न पडावे, अवघ्या भूतलावर आनंदाच्या रंगाचीच बरसात व्हावी, त्याप्रमाणे मनामनाचे कोपरे या आनंदसरींनी न्हाऊन निघावे. दैनंदिन व्यापातापांचा क्षणभर विसर पडून मांगल्याच्या पदकमलांनी अंत:करण निर्मल व्हावे. कोणा दु:खितांच्या काळजावर या आनंदाची फुंकर मारावी. दुभंगलेली मने सांधण्यासाठी दिवाळीच्या महाउत्सवाचे सुंदर निमित्त व्हावे आणि खरच ही दिवाळीसुद्धा वर्षातील तीनशे पासष्ट दिवस सुख-दु:खाच्या पाठशिवणीचा आणि थंडी, वारा, ऊन, पाऊस, प्रतिकूलता या सगळ्याचा सामना केल्यानंतरच येते कारण दिवाळी प्रत्येकाचा मनातील आशादीप चिरकाल प्रकाशमान करण्यासाठी येते. अशा प्रकारे एकीकडे अंधार असताना या जगात काही प्रकाशमान बाबीही घडत असतात. त्याच बाबी उराशी बाळगून आपण हा प्रकाशाचा उत्सव साजरा करु या...
-----------------------------------------------------------

0 Response to "आली दिवाळी..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel