-->
वेध मान्सूनचे...

वेध मान्सूनचे...

सोमवार दि. 22 मे 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
वेध मान्सूनचे...
सध्या ऊन्हाच्या तीव्र झळांनी होरपळून निघणार्‍या देशवासीयांसाठी एक चांगली खबर आली आहे. केरळात मान्सूनचे आगमन कोणत्याही क्षणी होईल असे वातावरण तयार झाले आहे. हवामानखात्याच्या अपेक्षेनुसार केरळात यंदा मे महिन्याच्या अखेरीस मान्सून सुरु होईल. हे गृहीत धरल्यास यंदा पाऊस जूनच्या पहिल्या आठवड्यात राज्यात पोहोचेल अशी अपेक्षा आहे. गेल्या वर्षी पाऊस जूनच्या दुसर्‍य आठवड्यात आला असला तरी त्याला वेग घ्यायला जुलै उजाडला होता. यंदा पाऊस जून महिन्यातच सुरु होऊन लगेचच वेग गाठेल का ते पहावे लागेल. मात्र यंदा सलग दुसर्‍या वर्षी पाऊस चांगला असेल. राष्ट्रीय हवामान विभागाने यंदा मान्सून सरासरीच्या 96 टक्के होईल, अशी खूशखबर दिली आहे. त्यातच एल निओचा मान्सूनवर परिणाम होणार नाही, असेही स्पष्ट केले आहे. येत्या आठवड्यात पुन्हा एकदा पावसाचा दुसरा अंदाज जाहीर होईल. सध्या जाहीर झालेल्या अंदाजानुसार, देशभरातील सर्व 36 हवामान विभागांत पावसाचे प्रमाण समाधानकारक असेल़  हे अनुमान जून ते सप्टेंबर या कालावधीसाठी असून, त्यात 5 टक्के कमी वा अधिक फरकाची शक्यता असू शकते. भारतातील एकूण लोकसंख्येपैकी 68 टक्के लोकसंख्या ग्रामीण भागामध्ये राहात असून, 50 टक्के लोक रोजगारासाठी कृषी क्षेत्रावर अवलंबून आहेत़  आपल्याकडे मान्सूनच्या पावसावर मोठ्या प्रमाणावर शेती अवलंबून असून त्याचा परिणाम संपूर्ण अर्थव्यवस्थेवर होत असतो़ त्यामुळे मान्सून कसा असणार, याकडे सर्वांचे लक्ष असते़  गेल्या सहा-सात वर्षांपासून मान्सूनच्या आगमनावर एल निओचा प्रभाव होता़ त्यामुळे मान्सूनचे आगमन अनेकदा लांबले होते़ परंतु यंदाच्या अंदाजामुळे देशवासीयांना दिलासा मिळाला आहे. सांख्यिकी आणि सी.एफ.एस. या दोन्ही मॉडेलचा आधार घेऊन हा अंदाज जाहीर करण्यात आला आहे़  त्यासाठी प्रामुख्याने पाच घटकाचे मार्चपर्यंत निरीक्षण करण्यात आले. त्यात उत्तरी अटलांटिक आणि उत्तरी प्रशांत महासागरातील डिसेंबर व जानेवारीतील तापमान, भूमध्य रेखीय दक्षिण हिंद महासागरातील फेब्रुवारीचे तापमान, फेब्रुवारी व मार्चमधील पूर्व एशियाचे समुद्र स्तरावरील दबाव, जानेवारीतील उत्तर-पश्‍चिम युरोपातील जमिनीवरील हवेचे तापमान, जानेवारी, फेब्रुवारीतील प्रशांत महासागरातील पाण्याचे तापमान याचा विचार करण्यात आला. एल निओचा प्रभाव 2014 आणि 2015 साली मोठ्या प्रमाणात जाणवल्याने मान्सूनवर त्याचा परिणाम झाला होता़ भारताचे सरासरी पाऊसमान 887़5 मिमी आहे़ 2014 मध्ये 781 मिमी पाऊस झाला होता़ तो सरासरीपेक्षा 12 टक्के कमी होता़ 2015 मध्ये 76़.6 मिमी पावसाची नोंद झाली होती़ तो सरासरीपेक्षा 14 टक्के कमी होता़ गेल्या वर्षी संपूर्ण देशात चांगला पाऊस झाला असला तरी तो 862़2 इतका झाला होता़  यंदा 96 टक्के पाऊस होण्याचा प्राथमिक अंदाज आहे़  एल निओ चा प्रभाव 34 टक्के असण्याची शक्यता असताना देशभरात पाऊस सामान्य अथवा सामान्यपेक्षा अधिक झाला आहे़  यंदातर एल निओचा प्रभाव नसल्यामुळे चांगलाच पाऊस होईल. हवामान खाते पावसाचा अंदाज वर्तविताना सामान्य, सामान्याहून कमी व सामान्याहून अधिक अशा परिमाणात वर्तविते. ही वर्गवारी दीर्घकालीन सरासरीच्या आधारे केली जाते. सन 1951 पासूनच्या 50 वर्षांत देशात झालेल्या मान्सूनच्या पावसाच्या सरासरीस एल.पी.एफ .असे संबोधिले जाते. ही दीर्घकालीन सरासरी 89 सेमी (890मिमी) एवढी आहे. एलपीएच्या 96 ते 104 टक्के एवढा पाऊस असेल तर त्याला सामान्य असे म्हटले जाते. तर 90 टक्क्याहून कमी पाऊस असल्यास सामान्याहून कमी, सामान्याहून अधिक 105 ते 110 टक्के पाऊस, अतिवृष्टी 110 टक्कयांहून अधिक पाऊस असे संबोधिले जाते. भारतीय उपखंडात नैऋत्य मान्सून व आग्नेय मान्सून असे पावसाचे दोन हंगाम आहेत. जून ते सप्टेंबर या नैऋत्य मान्सूनच्या हंगामात एकूण पावसाच्या 70 टक्के पाऊस पडतो. आग्नेय मान्सूनचा हंगाम ऑक्टोबरनंतर सुरू होतो व तो पाऊस प्रामुख्याने पूर्व किनारपट्टीवरील राज्यांमध्ये सक्रिय असतो. देशात जून ते सप्टेंबर या काळात नैऋत्य मान्सून व आग्नेय मान्सून मिळून सरासरी 96 सेंमी पाऊस अपेक्षित आहे. मात्र, तो सर्वत्र त्या प्रमाणात पडणार का, हे आत्ताच सांगता येत नाही. गेल्या वर्षीचा पावसाळा हा देशात सर्वत्रच दिलासादायक होता. त्यामुळे शेतकरी खर्‍या अर्थाने सुखावला होता. अगदी ज्या भागात दोन-तीन वर्षे दुष्काळ होता अशा भागातील नद्या व तलावही दुथडी भरुन वाहू लागले होते. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती यावेळी तेवढी गंभीर नाही. त्यातच सरकारने जलयुक्त शिवार योजना राबवून अनेक भागातील तलाव पुनरुज्जीवीत केले. याचा चांगला परिणाम अनेक भागात दिसत आहे. आता त्या शिवार योजनेतही भ्रष्टाचार झाल्याचे आढळले आहे. पावसाने गेल्या वर्षी कृपादृष्टी ठेवल्याने शेतकर्‍यांचे जीवन सुखकारक झाले. असे असले तरी शेतकर्‍यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढतच चालले आहे. अर्थात त्याला सरकारी धोरणे जबाबदार आहेत. यंदा देखील चांगला पाऊस अपेक्षित असल्याने व प्रत्यक्षात तसा चांगला पाऊस पडल्यास हे सलग चांगल्या पावसाचे दुसरे वर्ष असेल. त्यामुळे एकूणच शेती क्षेत्राला नव्हे तर संपूर्ण अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीमुळे देशाचे अर्थचक्र थंडावले होते. त्याला गती मिलणे सध्या तरी अवघड आहे. अशा वेळी चांगला पावसाळा झाल्यास केवळ शेतकरीच नाही तर सर्वानांच चांगले दिवस येतील.
--------------------------------------------------------------

0 Response to "वेध मान्सूनचे..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel