-->
पुन्हा बैलगाडी शैर्यत

पुन्हा बैलगाडी शैर्यत

संपादकीय पान बुधवार दि. 01 मार्च 2017 च्या अंकासाठी अग्रलेख 
--------------------------------------------
पुन्हा बैलगाडी शैर्यत
महाराष्ट्रातील ग्रामीण भागात शेतकर्‍यांसाठी करमणुकीचे एक प्रमुख साधन असलेल्या व अस्मितेचा प्रश्‍न असलेल्या बैलगाड्यांच्या शैर्यती पुन्हा एकदा सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे सध्यातरी वातावरण आहे. शेकापचे सरचिटणीस आ. भाई जयंत पाटील यांनी या शैर्यती सुरु करण्यासाठी घेतलेल्या परिश्रमांना यश येणार असे दिसत आहे. सरकारने येत्या अधिवेशनात यासंबंधी विधेयक मांडण्याचे मान्य केले आहे व अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यात हे विधेयक मंजूर झाले तर येत्या गुढीपाडव्यापासून शैर्यतीला प्रारंभ होऊ शकतो. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत प्रचारादरम्यान मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात बैलगाड्यांच्या शैर्यतीला परवानगी देण्यासाठी विधेयक संमंत करण्याचे आश्‍वासन मतदारांना दिले होते. रायगड जिल्ह्याच्या अलिबाग येथील मुख्यालयाच्या ठिकाणी शेकापच्या वतीने शेतकर्‍यांनी बैलगाड्या घेऊन मोर्चाही काढण्यात आला होता. या मोर्च्यामुळे मुख्यमंत्र्यांवरील दबाव वाढला होता. आता शेवटी सरकार यासाठी अधिवेशनात विधेयक मांडणार आहे. सर्व शेतकर्‍यांचा हा एक मोठा विजयच म्हटला पाहिजे. प्राणीप्रेमाचा पुळका आलेल्या पेटा या संघटनेने या शैर्यतींवर बंदी घालण्यासाठी न्यायालयात अर्ज केला आणि न्यायालयाने ते मान्यही केले. मात्र न्यायालयाचा हा निर्णय मान्य करुन शेतकरी मात्र हिरमुसला झाला. प्राणीप्रेमाचे जर निमित्त केले जात आहे तर श्रीमंतांच्या रेसकोर्समध्ये करोडो रुपयांचा सट्टा लावण्यात येणारी घोड्यांची शर्यत का सुरु आहे? मग श्रीमंतांचे जर चोचले सरकार खपवून घेते तर गरीब शेतकर्यांच्या बैलगाडीच्या शर्यतीवरच का बंदी असाही प्रश्‍न उपस्थित होतो. आपल्याक़डे एकीकडे माणूस सुरक्षित नसताना प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी भांडणारे तथाकथित प्राणी मित्र संघटना या खर्‍या अर्थाने शेतकर्‍यांच्या विरोधात आहेत, असा त्याचा स्पष्ट अर्थ आहे. तामीळनाडूत न्यायालयाचा आदेश धुडकावून राज्य सरकारने तामीळनाडूतील जल्लीकटू सुरु करण्याचा मार्ग मोकळा केला. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील राज्य सरकारने वटहुकून काढून बैलगाड्यांच्या शर्यती पुन्हा सुरु कराव्यात, ही शेकापने हजारोंचा मोर्चा जिल्हाधिकारी कचेरीवर काढून केलेली मागणी समर्थनीय ठरते. तामिळनाडूवासी त्यांची अस्मिता जपत, सणाला महत्व देत जल्लीकटूसाठी रणांगणात उतरले. न्यायालयाचा विरोध झुगारुन आंदोलन उठविले. इतकेच नाही तर चक्क सेलिब्रिटींनीही त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. मग असे असताना मराठी माणसांचे रक्त का थंडावले? मराठी माणसांनी आपल्या अस्मितेसाठी का एकत्र येऊ नये असा प्रश्‍न उपस्थित झाला होता. महाराष्ट्राला बैलगाडी शर्यतींची शेकडो वर्षांची परंपरा लाभली आहे. महाराष्ट्र हे शेतकर्‍यांचे राज्य असल्याने बैलांना या राज्यात अनन्यसाधारण महत्व आहे. शेतकरी आपल्या बैलजोडीला जीवापाड जपत असतो. त्यांच्यावर पुत्रवत प्रेम करणारा शेतकरी खर्चही वारेमाप करतो. असे असताना आपल्या बैलांना जीवघेण्या यातना तो कसा देऊ शकेल, असा सवाल गाडीवानांकडून केला जात होता. बैलगाडी शर्यत सर्वसामान्यांचा व्यवसाय नसून केवळ मनोरंजन आणि बैलांच्या दृष्टिने शेतीच्या कामातून निर्माण झालेला थकवा दुर करण्याचा एक उपक्रम असाच अर्थ आहे. संपूर्ण महाराष्ट्रात बैलगाडी मालकांची संख्या हजारांच्या आसपास आहे. शर्यतीत धावणर्‍या बैलांची किंमत कमीत कमी 30 हजारांपासून तीन लाखांपर्यंत आहे. बैलगाडी शर्यतीत धावणर्‍या बैलांना उत्तम खुराक दिला जातो. त्यात दररोज हिरवा चारा, कडवळ, मका, लसूण घास, शेंगदाणा पेंड, मक्याचा भरडा, अंडी, नारळाच्या पोग्या आदींचा समावेश असतो. या खुराकाचा रोजचा खर्च 500 ते 1000 रुपयांच्या दरम्यान असतो. अशा पद्धतीने जोपासलेले बैल शर्यतींसाठी तयार असतात. विशेष म्हणजे शर्यतींसाठी चांगल्या बैलाची किंमत लाखो रुपयांच्या घरात असते. यातून होणारी उलाढाल संबंधित शेतकर्‍यांच्या दृष्टीने महत्त्वाची ठरते. साहजिक शर्यतीच्या काळात छोट्या व्यावसायिकांना, कारागिरांना चांगला रोजगार उपलब्ध होतो. ग्रामीण भागातील अर्थकारणाला यामुळे गती मिळते. या शर्यतीच्या माध्यमातून रोजगार निर्मितीलाही चालना मिळत असते. असे असताना बैलगाड्यांच्या शर्यतींवर बंदी आणल्याने ही रोजगारनिर्मिती ठप्प झाली. त्यामुुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला फटका बसणे साहजिकच आहे. शर्यतीवर बंदी आणल्याने बैलगाडी मालकांना बैलांची जोपासना शर्यतीच्या दृष्टिने करणे कठीण झाले आहे. शर्यतीच्या बैलांना लागणर्‍या मालाचा खप होत नसल्याने मका, शेंगदाणा आदी उत्पादनाद्धारे बैलांचे खाद्य बनविणार्‍या शेतकर्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे. जर्सी, देसी, गावठी, खिल्लारी असे बैलांचे विविध प्रकार आहेत. खिल्लारी जातीचा बैल शर्यतीसाठी उत्तम समजला जातो. पुणे, सातारा, कर्नाटक, म्हैसूर, कोल्हापुर आदी ठिकाणी खिल्लारी बैलांची पैदास केली जाते. बैलगाडी शर्यत प्रेमींकडून खिल्लारी प्रकारच्या बैलांना विशेष मागणी असल्याने बैलांची पैदास करणारे शेतकरी आठवडा बाजारात बैलांची विक्री करतात. चाकण, बेला, पुशेगांव, किणवी, साजगांव आदी ठिकाणी भरणार्‍या यात्रा किंवा आठवडा बाजार बैल विक्रीसाठी प्रख्यात आहेत. चाकण आणि पुशेगांव येथे भरणार्या पारंपारिक यात्रांमध्ये देशातून शेतकरी आपले बैल विक्रीसाठी व खरेदीसाठी येतात. मात्र बैलगाडी शर्यतीवर बंदी आणल्याने शेतकर्‍यांना आपले बैल विकणे कठीण झाले आहे. बैलगाडी शर्यतींसाठी नियमावली निश्‍चित करणे आणि त्याच्या काटेकोर पालनावर भर देणे हाच मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे. त्यातून बैलगाडी शर्यतीची परंपराही सुरू राहील आणि या शर्यतींच्या नावाने प्राण्यांचा छळ होत असेल तर तोही थांबण्यास मदत होईल.
------------------------------------------------------------

0 Response to "पुन्हा बैलगाडी शैर्यत"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel