-->
पुरोगामी शक्तींचा विजय

पुरोगामी शक्तींचा विजय

संपादकीय पान शुक्रवार दि. 24 फेब्रुवारी 2017 च्या अंकासाठी अग्रलेख 
--------------------------------------------
पुरोगामी शक्तींचा विजय
नुकत्याच झालेल्या शिक्षक मतदारसंघातील पुरोगामी शिक्षक आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील यांच्या झालेल्या दणदणीत विजयानंतर आता पुन्हा एकदा रायगड जिल्ह्यात पुरोगामी शक्तींचा जिल्हा परिषदेत जबरदस्त विजय झाला आहे. शेतकरी कामगार पक्ष-राष्ट्रवादी कॉग्रेस-कॉग्रेस यांच्या आघाडीने जिल्ह्यात संपादन केलेला विजय संपूर्ण राज्याच्या नजरेत भरणारा आहे. देशातील लोकशाहीची प्रक्रिया बळकट करण्यासाठी सेक्युलर शक्ती एकत्र आल्यास प्रतिगामी शक्तींना गाढता येते हे रायगड जिल्ह्यातील जनतेने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. बिहारमध्ये लालूप्रसाद यादव-नितीशकुमार यांनी सेक्युलर पक्षांची एकत्र मोट बांधून जे राजकारण  केले त्याचीच छोटी आवृत्ती आता रायगड जिल्ह्यात दिसली आहे. सुरुवातीपासून शेतकरी कामगार पक्षाचा रायगड जिल्हा हा बालेकिल्ला होता व भविष्यातही तो राहाणार आहे, हे या निवडणुकीने स्पष्टपणे पुढे आले आहे. आज देशात व राज्यात शिवसेना-भाजपा या प्रतिगामी शक्तींची सरकारे आली असताना व याच शक्ती देशात आक्रमकपणे चाल करुन स्थानिक स्वराज्य पातळीवर सर्व पदे बळकावित असल्याचे चित्र दिसत असताना रायगड जिल्ह्याने हे चित्र बदलण्याचा एक चांगला पायंडा पाडला आहे. स्वर्गीय प्रभाकर पाटील यांनी शेकापची बांधणी करताना जिल्ह्यात जे पुरोगामी शक्तींचे बी पेरले होते ते बी आजही मेलेले नाही. उलट संपूर्ण राज्यात प्रतिगामी शक्ती जोमाने डोके वर काढीत असताना रायगड जिल्हा मात्र यला अपवाद ठरला आहे. याचे अनेकांना आश्‍चर्यही वाटेल. परंतु त्यांनी इतिहासात डोकावण्याची गरज आहे. या विजयाचे सर्व श्रेय शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनिल तटकरे यांच्याकडेच जाते. या दोघांनी मिळून संपूर्ण जिल्हा पिंजून काढला व आघाडीच्या बाजुने जोरदार प्रचार केला, शिवसेनेवर घणाघाती प्रचार केला. हे दोन्ही नेते एकत्र येऊन त्यांनी प्रचार केल्यामुळे मतदारांमध्ये एक प्रकारचा विश्‍वास संपादन झाला व आघाडीच्या बाजुने मतदारांचा कौल कसा झुकला याचा कुणालाच अंदाज बांधता आला नाही. कॉग्रेसच्या अलिबाग, पेण,कर्जत या ठिकाणच्या नेत्यांनी पक्षाचा आदेश झुगारुन शिवसेनेशी सोयरिक जुळविली. मात्र रायगडवासियांनी ही सोयरिक झुगारुन लावली. कॉग्रेसच्या नेतृत्वाने अशा दिशाहिन राजकारण करणार्‍या आपल्या स्थानिक नेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. कॉग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना व मतदारांना आपल्या पुढार्‍यांनी शिवसेनेची साथ घ्यावी हे काही पचनी पडले नव्हते. अशा नेत्यांना आताचे निकाल पाहता चांगलीच चपराक बसली आहे. पेण व अलिबागमदील निकाल पाहता या नेत्यांची बोलती आता जनतेने बंद करुन टाकली आहे. राजकारण हे अल्पकालीन फायद्याचे उदिष्ट ठेवून केल्यास त्याचा कधीच फायदा होत नाही. संसदीय राजकारणात निवडणुकीच्या राजकारणात जय-पराजय हा कुणासही चुकलेला नाही. अगदी इंदिरा गांधींचाही पराभव झालेला आहे. अशा वेळी संकुचित दृष्टीकोन ठेवून राजकारण करणार्‍यांना जनता लवकर घरी बसविते, हा इतिहास आहे. यावेळची निवडणूक ही शेकाप-राष्ट्रवादीच्या नेत्यांना अतिशय अवघड जाईल व त्यांचा पराभव होईल, असे अंदाज बांधणार्‍यांचेही सर्व आखाडे चुकले आहेत. या आघाडीला यावेळी धूळ चारली जाईल व शिवसेनेच्या नेतृत्वाखाली रायगडच्या शिवतिर्थावर सरकार स्थापन केले जाईल अशी अनेकांनी राणाभीमदेवी थाटात घोषणा केल्या होत्या. स्थानिक खासदार व केंद्रीय मंत्री अनंत गिते यांनी तर शेकाप संपविण्याचा जणू काही विडाच उचलला होता. त्यांच्यांशी सहमत होऊन अनेक विचारवंतही माना डोलवत होते. मात्र हे सर्व अंदाज या भूमीतील मतदारांनी खोटे ठरविले आहेत. सध्याच्या काळात आघाडीचे राजकारण हे अनिवार्य ठरले आहे. केंद्रात देखील तब्बल तीन दशकानंतर एकाच पक्षाचे सरकार सत्तेत आले आहे. राज्यात तर एकाच पक्षाचे सरकार ही बाब जुनी झाली आहे. अशा स्थितीत जिल्हा परिषदेत एक हाती सत्ता देण्यास मतदार राजा तयार नाही. मात्र आघाडी करताना आपण आपल्याशी वैचारिक बांधिलकी असलेल्या पक्षांशी आघाडी करुन त्यांच्यांशी सत्तेचा सारीपाट मांडणे हे आपण समजू शकतो. शेकापने राष्ट्रवादी व काँग्रेसशी आघाडी करताना हे पथ्थ पाळले होते. या आघाडीला जर सत्ता मिळाली नाही तर शेकाप सत्तेसाठी कोणत्याही पक्षाशी म्हणजे शिवसेनेशी जुळवून घेऊन सत्तेत बसू शकतो असे समीकरणही मांडले गेले. मात्र हे सर्व मनचेच मांडे ठरले. मतदार राजाने आघाडीच्या बाजूने जोरदार कौल दिल्याने सर्वांचीच बोलती बंद झाली आहे. विरोधकांचा शेकापच्या संदर्भात आणखी एक नेहमी आक्षेप असायचा व तो म्हणजे, हा पक्ष आता केवळ साडेतीन तालुक्यापुरता शिल्लक राहिला आहे. मात्र यावेळच्या निवडणुकीने हा पक्ष संपूर्ण जिल्ह्यात आहे हे दाखवून दिले आहे. गेल्या 25 वर्षानंतरशेकापचा प्रथमच पोलादपूर तालुक्यात जिल्हा परिषद सदस्य विजयी झाला आहे. याच तालुक्यात शेकाप व कॉग्रेसने शिवसेनेचा पराभव करुन पंचायत समिती प्रथमच ताब्यात घेतली आहे. पेणमध्ये शेकापचे पाचच्या पाचही जिल्हा परिषदेचे उमेदवार विजयी झाले आहेत. उरण पंचायत समितीमध्येही शेकापने जोरदार मुसंडी मारली आहे. पनवेल तालुक्यात जिकडे भाजपाचे जिल्हाध्यक्ष आहेत व त्यांनी भाजपला येथे शतप्रतिशत जिंकून आणण्याचे वचन दिले होते तेथे सहा ठिकाणी शेकापचे जिल्हा परिषदेचे सदस्य विजयी झाले आहेत. जिल्ह्यातील भाजपासाठी हा एक मोठा पराभवच म्हटला पाहिजे. महाड वगळता प्रत्येक तालुक्यात यावेळी शेकापचा जिल्हा परिषद सदस्य किंवा पंचायत समिती सदस्यतरी आहे. पाली, माणगाव, मुरुड येथेही शेकापला मिळालेला विजय नजरेआड करता येणार नाही. शिवतीर्थावर शेकाप-राष्ट्रवादी कॉग्रेसचा झेंडा फडकणे हा पुरोगामी शक्तींचा विजय आहे तसेच रायगडवासियांनी प्रतिगामी शक्तींना थारा न देण्याच्या बाजुने दिलेला हा कौल आहे.
--------------------------------------------------------------------------------  

0 Response to "पुरोगामी शक्तींचा विजय"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel