-->
कर्मयोगी

कर्मयोगी

संपादकीय पान मंगळवार दि. ०७ जुलै २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
कर्मयोगी
शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस, सहकारमहर्षि, गरीबांना शिक्षण मिळावे यासाठी शिक्षणसंस्था काढणारे व यशस्वी उद्योजक आमदार भाई जयंत पाटील यांचा आज ६०वा वाढदिवस मोठ्या उत्साहाने कार्यकर्ते साजरा करीत आहेत. राज्यातील अनेक भागातून जयंत भाईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणयासाठी कार्यकर्त्यांचे जथ्थे अलिबागमध्ये पोहोचले आहेत. अशा प्रकारचे भाग्य फार कमी राजकीय नेत्यांना लाभते. आपल्या गेल्या ४० वर्षाच्या सामाजिक जिवनात जयंतभाईंनी अनेकांना उभे केले, कार्यकर्त्यांची सुख-दु:ख समजून घेऊन त्यांना वेळोवेळी मदत केली, जाती-धर्माच्या पलिकडे जाऊन साध्या कार्यकर्त्यांना नेते केले आणि
याच प्रेमापोटी हे कार्यकर्ते दरवर्षी मोठ्या संख्येने भाईंना शुभेच्छा द्यायला येत असतात. गेल्या वर्षी त्यांचे एक निकटचे मित्र गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाल्याने भाईंनी वाढदिवस साजरा न करण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे नाराज झालेले कार्यकर्ते आम्ही पाहिलेले आहेत. यंदा तर शष्ठ्‌यब्दी असल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहात आहे. राज्यातील एक पुरोगामी घराणे म्हणून पेझारीच्या पाटील कुटुंबाला सर्व जनता ओळखते. या घराण्याचा याचा पुरोगामी वारसा भाईंनी त्यांच्या
वडिलांकडून घेतला आणि लहान वयातच लाल बावटा खांद्यावर घेतला तो आजपर्यंत. गेल्या चाळीस वर्षात रायगड जिल्ह्यात शेकाप एक नवी ताकद म्हणून उभा राहिला. खरे तर गेल्या दशकात डावी पक्षांची चळवळ देशात नव्हे तर जगात क्षीण झाली. असे असले तरी रायगडात मात्र शेकाप आपला बालेकिल्ला शाबूत ठेवून आहे. यामागच्या यशाचे सर्व श्रेय जयंतभाईंना जाते. शेकापच्या या रायगड पॅटर्नचा अभ्यास खरे तर डाव्या चळवळीने करुन त्यातून बोध घ्यायला पाहिजे. देशातील डाव्या चळवळीने आपला पोथीनिष्ठपणा कधीच सोडला नाही आणि त्यामुळे त्यांची वाढ खुंटली. उलट शेकापने आपल्या डाव्या विचारांशी कधीही तडजोड न करता पोथीनिष्ठपणा जोपासला नाही. यातूनच त्यांची वाढ झाली. यातून डाव्या पक्षांनी बोध घेण्याची हीच योग्य वेळ आहे. समाजवाद म्हणजे गरीबीचे वाटप नव्हे तर समृध्दी आणण्याचा तो एक मार्ग आहे, असे भाई नेहमी सांगतात. भाईंनी कष्टाच्या जीवावर स्वतच्या घरात समृध्दी आणली व त्यातून पक्षालाही उभारी दिली. एक उद्योजक डाव्या विचाराचा असू शकतो काय, असाही प्रश्न डाव्या विचारसरणीच्या मंडळींना पडतो. विदेशात आपल्याला अनेक उद्योगपती डाव्या विचारांचे किंवा डावीकडे झुकलेले दिसतात. भारतात मात्र केवळ भाईच उद्योगपती असूनही डाव्या विचारांचे दिसतात. (आणखी एक अपवाद म्हणजे इन्फोसिसचे सर्वेसर्वा नारायणमूर्ती हे देखील कम्युनिस्ट विचारसारणीने भारलेले होते.) कष्टाने-सचोटीने उद्योग करण्यात चुकीचे काही नाही, कार्ल मार्क्सने उद्योग करु नकात असे कुठेही लिहून ठेवलेले नाही. उलट या देशात जर डाव्या विचारांचे सरकार यावे असे वाटत असेल तर समाजातील प्रत्येक घटक म्हणजे उद्योगपतींपासून ते तळागाळातला
कष्टकरी तुमच्याशी बांधला गेला पाहिजे. म्हणूनच रायगड जिल्ह्यातील व्यापारी असो, लहान उद्योजक असो वा कष्टकरी, शेतकरी असो त्यांना शेकापच्या लाल झेंड्याखाली आणण्याचे काम भाईंनी केले. रायगडातील हा प्रयोग यशस्वी झाल्यावर भाईंनी संपूर्ण राज्यात हा प्रयोग यशस्वी व्हावा व डाव्यांची ताकद वाढावी यासाठी गेल्या काही वर्षात प्रयत्न सुरु केले आहेत. त्याला भविष्यात यश येईलच. आपली चळवळ मजबूत करायची असेल तर आपल्या हाती वृतपत्राचे अस्त्र पाहिजे, हे भाईंनी ओळखले होते. यातूनच त्यांनी कृषीवल या साप्ताहिकाचे रुपांतर छोट्या दैनिकात त्यानंतर मोठ्या स्वरुपातील दैनिकात केले. आज कृषीवलची दररोज १२ पाने निघतात, अत्याधुनिक छपाई होते, याचे सर्व श्रेय भाईंनाच जाते. अलिकडेच कृषीवलने छपाईसाठी लागणार्‍या प्लेटस तयार करणारे अत्याधुनिक सी.टी.पी. मशिन युरोपातून आयात केले. संपूर्ण रायगड जिल्ह्यात असे मशिन नाही. स्वत: जातीने उपस्थित राहून हे मशिन बसवून घेतले. अशा प्रकारे नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची साठाव्या वर्षी भाईंची जिद्द पाहिली की त्यांना सलाम करावासा वाटतो. त्यांच्यात दूरदृष्टी असलेला एक यशस्वी उद्योजक दडलेला आहे. सध्याचे युग हे बुध्दीमत्तेचे युग आहे असे म्हणतात. भाईंनी देखील आपल्या बुध्दीमत्तेच्या जीवावर पैसा कमावला. मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया ही बोटसेवा सुरु केल्यास अलिबाग मुंबईच्या जवळ येईल व या भागाचा कायापालट होईल हे भाईंच्या चाणाक्ष बुध्दीने हेरले. त्याकाळी त्यांनी मांडवा-गेट वे ही बोट सुरु केली त्यावेळी अनेकांनी त्यांना मुर्खात काढले. परंतु ज्यावेळी नंतर ही सेवा यशस्वी झाली त्यावेळी त्यांच्यावर टीका करणारे मुर्ख ठरले. त्यानंतर जयंतभाईंनी कधी मागे वळून पाहिले नाही. उद्योगाचे एक एक नवनवीन शिखर पादाक्रांत केले. केवळ देशात नाही तर आपल्या उद्योजकतेची पताका विदेशातही फडकविली. अर्थात हे करीत असताना राजकारणाशी आपला उद्योग कधीच जोडला नाही. अनेक राजकारणी हे राजकारणात यशस्वी झाल्यावर उद्योजक बनतात. भाईंचे मात्र उलटे आहे. त्यांनी राजकारणातून कमविलेला पैसा राजकारणात घातला. त्यामुळेच अनेक राजकारणी भाईंना मान देतात. त्यांच्याविषयी एक वेगळाच आदर यातून निर्माण झाला आहे. सहकार क्षेत्राबाबतही असेच झाले. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक त्यांच्या ताब्यात आली त्यावेळी डबघाईला आली होती. परंतु सहकार म्हणजे स्वाहाकार नाही हे तत्व अंमलात आणत भाईंनी ही बँक यशाच्या नव्या शिखरावर पोहोचविली. आज ही बँक संपूर्ण राज्यातील जिल्हा सहकारी बँकेत प्रथम क्रमांकाचा मान गेली कित्येक वर्षे मिळवित आहे. अशा प्रकारे सहकारी क्षेत्र एकीकडे बुडीत जात असल्याचे चित्र दिसत असताना भाईंनी ही बँक यशस्वीरित्या चालवून दाखवून सहकार क्षेत्राचे महत्व अधोरेखित केले. शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामाबद्दल त्यांना खरे तर शिक्षण महर्षी म्हटले पाहिजे. परंतु सध्या आपल्याकडे शिक्षणाचा धंदा करुन जे तथाकथित शिक्षण महर्षी म्हणून जन्माला आले आहेत त्यांनी महर्षिपणाला कलंक लावला आहे. भाईंनी मात्र आपल्या पी.एन.पी. एज्युकेशन ही संस्था गरीब मुलांना चांगल्या दर्ज्याचे शिक्षण मिळावे यासाठी स्थापन केली आहे. यात संस्थेत खर्‍या अर्थाने गरीबांना परवडेल अशा खर्चात शिक्षण दिले जाते. आता या संस्थेच्या वतीने जिल्ह्यात ५० इंग्रजी माध्यमाच्या शाळा उभारल्या जाणार आहेत. आपल्याकडे राजकीय नेते मुलांना मराठीत शिका असा सल्ला देतात मात्र आपल्या मुलांना इंग्रजित शिकवितात. भाईंचे नेमके उलटे आहे. आपली मातृभाषा असलेल्या मराठीवर जरुर प्रेम करा, पण या जगाची भाषा म्हणून ओळखली जाते त्या इंग्रजीत शिक्षण घ्या, असे ते सर्वांना सांगतात. इंग्रजीत शिक्षण घेणे की केवळ श्रीमंतांची मक्तेदारी नाही. इंग्रजीतून शिक्षण गरीबांच्या मुलांनाही मिळाले पाहिजे म्हणून त्यांनी इंग्रजी मध्यमांच्या शाळा ग्रामीण भागांसाठी काढण्याचे ठरविले आहे. भाईंना हे सर्व सुचते याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे त्यांच्या रोमारोमात डावा विचार रुजला आहे. त्याळेच ते नेहमी तळागाळातल्यांचा विचार करतात. त्यांनी आपल्या विचाराला मुरड घातली असती तर त्यांना कोणत्याही पक्षाच्या सरकारने लाल दिवा दिला असता, परंतु त्यांच्या मनाला तो विचार कधीही शिवला नाही. साधी राहाणी व उच्च विचारसरणी त्यांनी नेहमीच अंगिकारली. आपल्या घराण्याच्या असलेल्या उज्वल वारशावर कधी ओरखडा येऊ दिला नाही. भाईंनी आपल्या सार्वजनिक जिवनात यशही पाहिले व पराभवहीअनुभवले. मात्र विजयाचा कधी डंका वाजविला नाही की पराभवाने ते खचले नाहीत. त्यामुळेच कर्मयोगी भाई लोकांच्या मनातले ताईत झाले आहेत. कृषीवल परिवारातर्फे भाईंना भविष्यातील वाटचालीबाबत शुभेच्छा. भाई तुम्ही शतायुष्यी व्हा व तुमच्या हातून अशीच जनसेवा घडो, हेच तुमच्यासाठी आमचे नियतीकडे मागणे.
--------------------------------------------------------------------

0 Response to "कर्मयोगी "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel